रिओतील नेमबाजाच्या अपयशाची पाच सदस्यीय समितीकडून चौकशी

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय नेमबाजांना एकही पदक पटकावता आले नाही. त्यांच्या या अपयशाची चौकशी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने नेमलेल्या आढावा समितीच्या प्रमुखपदी नेमबाज अभिनव बिंद्राची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली.

भारताला ऑलिम्पिक स्पध्रेत पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारा अभिनव पाच सदस्यीस समितीचा प्रमुख असेल. ही समिती खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणार असून त्रुटी शोधून काढणार आहेत. त्यांनी सुचवलेल्या सुचनांवर असोसिएशन काम करणार आहे आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये या चुका पुन्हा होऊ नये, याची काळजी घेणार आहे.

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या अभिनवने निवृत्ती जाहीर केली आहे आणि त्यामुळे आपण कोणत्याही नेमबाजाला प्रश्न विचारणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. मात्र आढावा समितीच्या मुल्यांकनासाठी उपलब्ध राहणार असल्याचे त्याने सांगितले. या समितीमध्ये अभिनवसह माजी टेनिसपटू मनिषा मल्होत्रा, असोसिएशनचे सचिव राजीव भाटीया आणि दोन पत्रकारांचा समावेश आहे. ही समिती अपयशाला कारणीभूत कारण शोधून काढतील आणि त्यानंतर चार आठवडय़ांच्या कालावधीत अध्यक्षांना अहवाल सादर करेल. या समितीची पहिली बैठक ३० व ३१ ऑगस्टला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.