१९६०७० च्या दशकांत अभिजनवर्गाच्या कलावादी साहित्याविरोधात बंड करून जीवनवादी साहित्याची चळवळ जन्माला आली. तेव्हा सत्यकथाच्या अंकांची केली गेलेली होळी हा प्रस्थापित साहित्याविरुद्धचा प्रतीकरूप निषेध होता. आज साहित्यक्षेत्रात अशा प्रकारची बंडखोरी का होताना दिसत नाही? आज सारेच आलबेल आहे का? या प्रश्नांचा मागोवा घेणारे लेख. तेव्हाचे बंडखोरकवी सतीश काळसेकर आणि आजचे लेखक अवधूत डोंगरे यांनी या विषयांचा घेतलेला परामर्श. तसेच या विषयाबद्दलची राजीव काळे यांची टिप्पणी..

‘सत्यकथा’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या अंकांची केलेली होळी ही मराठी साहित्यातील महत्त्वाची घटना आहे. ‘मौज’च्या कार्यालयासमोरच ही होळी झाली. हा सर्व प्रकार म्हणजे त्याकाळच्या आम्हा नव्याने लिहू लागलेल्या तरुणांतील बंडखोरीचा आविष्कार होता. आज या घटनेकडे बघताना त्याला ‘बंडखोरी’ म्हणावे की नाही, असाही प्रश्न कोणी विचारेल. परंतु त्या काळाच्या संदर्भात याकडे पाहिलं तर ती निश्चितच बंडखोरी होती. ‘सत्यकथा’चे अंक जाळले गेले ते १९६९ मध्ये; परंतु तसे होण्यामागे महाराष्ट्रातील तत्कालीन साहित्यिक-सांस्कृतिक वास्तवाची पाश्र्वभूमी होती. त्याकरता या घटनेच्याही आधीच्या काळाकडे पाहावं लागेल.

Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Manasamajhavan a disturbing novel by sangram gaikwad
अस्वस्थ करणारी कादंबरी
gadchiroli, inauguration of yuva sahitya sammelan, dr kishor kavthe
“तरुणाईने मुस्कटदाबीला संवैधानिक मार्गाने उत्तर दिले पाहिजे”, साहित्यिक डॉ. किशोर कवठे यांचे आवाहन; गडचिरोलीत युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
sahitya academy award winning author sukhjit biography away, author Sukhjit biography, Sahitya Academy award, story writer sukhjit, मराठी बातम्या, मराठी न्युज, लेटेस्ट न्युज, ताज्या
व्यक्तिवेध : सुखजीत

तो काळ १९६० नंतरचा होता. त्या काळाकडे पाहताना असं ध्यानात येईल, की या काळात केवळ साहित्यच नव्हे, तर जीवनाच्या अनेक क्षेत्रांत काही महत्त्वाचे बदल होऊ घातले होते. आणखी संदर्भ द्यायचा झाल्यास- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा-चौदा वर्र्षांनी हे सर्व घडत होतं, हेही ध्यानात घ्यायला हवं. स्वातंत्र्यानंतरच्या या काळात शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचू लागलं होतं. त्यातून नव्याने शिक्षित झालेली आम्हा तरुणांची पिढी साठच्या दशकापर्यंत तयार झाली होती. या तरुणांनी विशीतून पंचविशीत प्रवेश केला होता. आमच्यातील वसंत गुर्जर, गुरुनाथ धुरी यांच्यासारखे काहीजण सोडले तर आम्हा कोणाकडेच स्वत:चं घरही नव्हतं. बहुतेकजण आपापल्या नातेवाईकांकडे राहत होतो. माथ्यावर छप्पर नसलेल्या आम्हा तरुणांना अभिव्यक्तीची आस मात्र प्रचंड होती. अठरापगड जातींतून आलेल्या आमच्याकडे स्वत:चं असं अनुभवविश्व होतं. ते साहित्यातून आम्हाला मांडायचं होतं. परंतु तत्कालीन साहित्यात मात्र ते उमटताना दिसत नव्हतं. याचं कारण म्हणजे आमच्या आधीच्या पिढीतील लिहिणारे लोक आणि आमच्या पिढीत अंतर पडले होते. गिरगावच्या संस्कृतीत वाढलेल्या अभिजनवर्गाचं जगणं, त्यांचे अनुभव यांच्यापेक्षा कष्टकरी गिरणगावात वास्तव्य असलेल्या आम्हा मंडळींचं अनुभवविश्व वेगळं होतं. ‘सत्यकथा’ हे त्याकाळच्या अभिजनवर्गाच्या साहित्याचं केंद्रस्थान होतं. त्यांना आमचं लेखन पचणं अवघड होतं. ते त्यांना रुचणारं नव्हतं. आमच्यातील काहीजणांनी सत्यकथेकडे आपलं लेखन पाठवलं. ते छापूनही आलं. असं असलं तरी आमची वाङ्मयासंदर्भातली धारणा वेगळी होती. आमच्या अनुभवविश्वाशी त्यांचा ताळमेळ बसणं अवघड होतं. त्यातून बंडखोरीची ठिणगी आमच्यात पडली असण्याची शक्यता आहे. ‘मौज’च्या कार्यालयासमोर ‘सत्यकथा’चे अंक जाळण्याची घटना ही आम्हाला आजही प्रतीकात्मकच वाटते; आणि तशी ती होतीही. हे अंक खुद्द श्री. पु. भागवतांकडूनच आमच्याकडे आले का, हे सांगता येणं कठीण आहे. ‘सत्यकथा’ हे मासिक आणि ‘मौज’ प्रकाशन हे अभिजनवर्गाच्या साहित्याचं प्रतिनिधित्व करणारे होते. आणि श्री. पु. भागवत हे त्याचे सर्वेसर्वा. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची सभ्यता होती. अभिजनवर्ग अंतर्गतरीत्या काहीही करो; त्याच्या बाह्य़ वर्तनात मात्र सभ्यता असतेच. त्यामुळे हे अंक ‘मौज’च्या कार्यालयातून दिले असणेही शक्य आहे. गुरुनाथ सामंत हे ‘मौज’च्या कार्यालयात काम करत. अंकांची होळी करताना ते तिथे उपस्थित होते.

या ‘सत्यकथा’पुराणाला आणखी एक संदर्भ आहे, तो म्हणजे लघु-नियत/अनियतकालिकांच्या चळवळीचा. या चळवळीचा पहिला ऊर्जेचा काळ होता तो १९६४ ते १९७५ दरम्यानचा. नामदेव ढसाळ हा त्या चळवळीचा शेवटचा माणूस. अशोक शहाणे यांनी ‘मनोहर’ मासिकात नोव्हेंबर-डिसेंबर १९६३ च्या अंकात लिहिलेला ‘आजकालच्या मराठी साहित्यावर क्ष-किरण’ हा लेख या सर्वाच्या मुळाशी होता. याशिवाय शहाणे यांनीच ‘भारूड’च्या एका अंकात १९६४ मध्ये लिहिलेला ‘आजचे मराठी वाङ्मय- परिस्थिती आणि इलाज’ हा लेखही यादृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याच्या प्रभावातून सुरुवातीला ‘असो’, ‘अथर्व’, ‘तापसी’, ‘वाचा’, ‘चक्रवर्ती’ यांसारखी अनेक लघुनियतकालिकं या काळात निघाली. सत्यकथेच्या होळीसंदर्भातलं एक निवेदन आपल्याला ‘चक्रवर्ती’च्या ३ मे १९६९ च्या अंकात वाचायला मिळतं. याशिवाय १९६९ मध्ये ‘येरू’ या नियतकालिकात राजा ढाले यांनी लिहिलेला ‘सत्यकथेची सत्यकथा’ हा लेखही त्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

मी का लिहितो, हे सांगायचंय आणि ते लोकांना सांगायचंय, ही आमची निकड होती. पण त्यासाठी आमच्याकडे व्यवस्था, साधनसंपत्ती नव्हती. मात्र, अभिजन व प्रस्थापितांकडे काही किमान साधने होती. ते चालवत असलेल्या वाङ्मयीन मासिकांतून एक प्रकारची वाङ्मयीन मक्तेदारीच निर्माण होऊ लागली होती, हे आम्हाला स्पष्टपणे जाणवत होतं. आणि हे केवळ आपल्याकडेच घडत होतं असंही नाही. जगभरच ते होऊ लागलं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी लघुनियतकालिकं निघू लागली होती. ‘लिटिल मॅगझिन’ची एक चळवळच आकार पावत होती. मराठी साहित्य त्याला अपवाद होऊ शकत नव्हतं. आपल्याकडेही विविध वाङ्मयीन लघुनियतकालिकं येऊ लागली. प्रस्थापित व्यवस्थेला या लघुनियतकालिकांनी जोरदार धडक दिली. परंतु आम्ही केवळ आमच्याच लघुनियतकालिकांमध्ये लिहिणार, एवढय़ापुरती ही चळवळ मर्यादित नव्हती. प्रस्थापित वाङ्मयव्यवस्थेत एका विशिष्ट गटाचीच सत्ता कळत- नकळत तयार होत असते. त्यातून या एका गटाचीच वाङ्मयावर मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता असते. असे झाले की लिहिणाऱ्यांना प्रस्थापित व्यवस्थेवरच अवलंबून राहावं लागतं. मग प्रस्थापित स्वत:च्या कलानुसार कोणाला उजेडात आणावं अन् कोणाला अंधारात लोटावं, याचा निर्णय घेऊ लागतात. अशावेळी या मक्तेदारीला रोखून धरणं आवश्यक ठरतं. आम्ही सुरू केलेल्या लघुनियतकालिकांच्या चळवळीने हेच केलं. प्रस्थापितांविरोधातील बंडखोर आवाजांना या चळवळीने शब्दरूप दिलं. त्या काळात निघालेल्या या लघुनियतकालिकांतील मजकुराकडे पाहिल्यास यातील तीव्रता जाणवू शकते. लघुनियतकालिकांतील लेखनाची एक सूची पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आहे. ‘लघुनियतकालिकांची वर्णनात्मक सूची’ या रफिक सूरज या अभ्यासकाच्या पुस्तकाने हे प्राथमिक स्वरूपातलं असलं तरी काहीएक काम झालं आहे. त्या सूचीवर एक नजर टाकल्यास लघुनियतकालिकांतील अभिव्यक्तीचा बाज ध्यानात येईल. हे केवळ मराठीतच नव्हे तर सर्वत्र होत होतं. त्यावेळी दिल्लीला झालेल्या ‘लिटिल मॅगझिन’संदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेसाठी राजा ढाले, वसंत गुर्जर, चंद्रकांत खोत, प्रदीप नेरुरकर व मी गेलो होतो. लघुनियतकालिकं काढण्यासंदर्भातली आमची भूमिका तपासण्यासाठी ‘अबकडई’चा १९७२ सालचा पाचवा अंक उपयोगी ठरू शकतो. आडव्या आकारातील या अंकात लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अनेकांच्या भूमिका स्पष्ट करणाऱ्या मुलाखती छापल्या होत्या. त्यातून या चळवळीची कारणमीमांसा झालेली आहे. त्या मुलाखती पुस्तकरूपाने येणं आवश्यक आहे.

लघुनियतकालिकांच्या या चळवळीत आम्ही दोन शब्द प्रामुख्याने वापरत होतो- लघुनियतकालिकं आणि अनियतकालिकं. याचं कारण आम्ही काढत असलेले अंक दर महिन्याला वा विशिष्ट आवर्तनात येणं आमच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. त्यासाठी आमच्यावर कोणतेही र्निबध नव्हते. ते छापणं किंवा न छापणं हे आमच्या हाती होतं. तो अधिकार आम्ही व्यवस्थेच्या हाती देण्यास तयार नव्हतो. आम्हाला जेव्हा हवं तेव्हा आणि आमच्याकडील साधनांच्या उपलब्धतेनुसार आम्ही अंक काढत होतो. या काळातील लघुनियतकालिकांच्या मांडणी व छपाईकडे पाहिल्यास एक बाब नक्कीच ध्यानात येईल. ती म्हणजे हे सर्व करताना झालेले प्रयोग. आम्ही ‘चक्रवर्ती’चे अंक काही दिवस दैनिकस्वरूपातही काढले. याशिवाय रद्दी कागद, पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र अशा अनेक प्रकारच्या कागदांचा वापरही वेळोवेळी झाला. लघुनियतकालिकांत कविता हा साहित्यप्रकार आम्ही प्रामुख्याने वापरला. याचं कारण लिहिणाऱ्यांची सुरुवात कवितेपासूनच होत असते. हा साहित्यप्रकार व्यक्त करण्यास सुलभ आहे. त्यात रचनेचे बदल, भाषेचे प्रयोग आणता येतात. शिवाय त्यामागे व्यावहारिक कारणंही होती. निर्मिती ही परिस्थितीजन्य मर्यादेतून होत असते; ती स्वायत्त नसते. आम्हाला आमच्या साधनांच्या मर्यादेत कादंबरीसारखा साहित्यप्रकार छापणं शक्य नव्हतं. दीर्घलेखन वेगळं आणि कविता वेगळी. आमच्यातील काहीजण पुढे दीर्घलेखनाकडेही वळले; परंतु सर्वाना ते शक्य नव्हतं. या चळवळीतील लिहिणाऱ्यांनी आपल्या लेखनातून संताप, राग व्यक्त केलेला दिसेल. त्यासाठी कधी शिवराळ भाषेचाही वापर करण्यात आला. काही वेळा वाद खासगी पातळीवरही झाले. पंचविशीतील तरुण मुलं हे सर्व बोलत होती. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे सांगू पाहत होती. ते ठासून सांगताना हे सारं करावं लागतं. त्यामुळे या सगळ्याकडे समजूतदार नजरेने पाहण्याची आज आवश्यकता आहे.

केवळ अभिव्यक्तीच नव्हे, तर तिच्या आशयाच्या बाबतीतही या चळवळीने योगदान दिले आहे. जगताना जगण्याचे काही प्रश्न असतात, त्यांना साहित्यात अंतर्भूत करणं आवश्यक असतं. हे तत्कालीन साहित्यातून होत नव्हतं. त्यात एक प्रकारचं साचलेपण आलं होतं. त्यामुळे वाङ्मयीन संस्कृतीचा प्रवाह खळाळता ठेवणं आवश्यक झालं होतं. ते लघुनियतकालिकांच्या चळवळीने केलं. जगणं आणि लिहिणं यांतलं अंतर कमीत कमी करत जाणं.. शक्य असल्यास मिटवूनही टाकण्याचा यामागे प्रयत्न होता. कारण जेव्हा अठरापगड जातींचे लोक लिहू लागतात तेव्हा त्यांना लिहिण्याच्या प्रक्रियेत जाच नको असतो. वारकऱ्यांना जसं पंडिती काव्य परवडणारं नव्हतं, तसंच वृत्तं-छंदांबाबतीत आमचं होतं. आमच्यासाठी ‘कसं सांगायचं’ यापेक्षा ‘काय सांगायचं’ हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे आमच्या अभिव्यक्तीत आणि तिच्या आशयात वेगळेपणा नव्हता. हे केवळ लिहिण्याच्या बाबतीतच मर्यादित नव्हतं. त्यावेळी झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपालाही आम्ही पाठिंबा दिला होता. या संपात आम्ही तरुण लेखक-कवींनी एकदिवसीय उपोषणही केलं होतं. गिरणी कामगारांच्या संपातही आम्ही सहभागी झालो होतो. गिरण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ संपाला पाठिंबा देण्यासाठी होणाऱ्या निदर्शनांतही आम्ही कवी सहभागी व्हायचो, तिथे जाऊन कविता वाचायचो. इतकंच नव्हे तर वेश्या-वस्त्या, रेल्वेस्थानके, स्मशानभूमी, सार्वजनिक बागा, बसप्रवास अशा ठिकाणी आम्ही तेव्हा कवितावाचन केलं. साहित्यव्यवहाराच्या अशा अनेक शक्यतांचा वापर आम्ही केला. हे केवळ मुंबईपुरतंच सीमित नव्हतं. हे औरंगाबादमध्येही काही प्रमाणात झालं. पुणे-नागपूर येथेही. विविध ठिकाणी मंडळी तयार झाली होती. काही काळानंतर ते एकमेकांशी जोडलेही गेले. ‘वाचा’, ‘चक्रवर्ती’ इत्यादी अंकांमधून विविध ठिकाणच्या लोकांचं लेखन वाचायला मिळेल. ही वर्गीय एकजूट नव्हती, परंतु या चळवळीमुळे सर्व जातींचे आणि विचारांचे लोक एकत्र येऊन वाङ्मय व्यवहारात सहभागी होऊ लागले, हे मात्र नक्की.

आमच्या व्यक्तिगत व सर्व प्रकारच्या मर्यादेत हे सर्व घडलं. त्याच्या परिणामांकडे पाहताना हेही ध्यानात घ्यायला हवं, की ती चळवळ म्हणजे काही क्रांती नव्हती. क्रांती होणं आणि बंड होणं यांत फरक आहेच. त्यामुळे आज त्या काळाच्या संदर्भातच या बंडाकडे पाहायला हवं. काहीजणांचा आमच्या पिढीवर असा आक्षेप असतो की, या चळवळीतील अनेक लेखक-कवींना नंतर प्रस्थापित व्यवस्थेनं सामावून घेतलं. भाऊ पाध्ये, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचा स्वीकार मुख्य प्रवाहाने केला. सरकारी पुरस्कारांची मोहोरही अनेकांच्या साहित्यकृतींवर उमटली. पण हे बदल आपोआप झाले नाहीत. त्याला बंडाचं परिमाण होतं. येथे एक बाब आपण ध्यानात घ्यायला हवी, की व्यवस्था ही गोष्ट फार चिवट असते. तिच्याविरुद्धच्या वेगवेगळ्या आवाजांना आपल्यात कसं आणि कितपत सामावून घ्यायचं, हे ती ठरवत असते. याहून महत्त्वाचं म्हणजे कुठलीही प्रस्थापित व्यवस्था तिच्याविरुद्धच्या संघर्षांला कळत-नकळत सामावून घेतच पुढे जात असते. संघर्ष करणारेही तिच्यात सामावतात, याचं कारण निरंतरपणे समांतर जाणं कोणालाही शक्य नसतंच. त्यामुळे या सगळ्याकडे आपण समंजसपणे पाहायला हवं. पुढे आम्ही वयाने वाढत गेलो, कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर पडत गेली. आमच्यातले काहीजण केवळ वाङ्मय क्षेत्रात न थांबता पुढे राजकीय-सामाजिक क्षेत्रांतही कार्यरत झाले. त्या अर्थाने पाहता ही चळवळ तिच्या पुढच्या टप्प्यावर गेली असंही म्हणता येईल. परंतु पुढे या चळवळीत विस्कळीतपणा आला, हेही तितकंच खरं आहे. यात आणखीही एक बाब नोंदवावीशी वाटते; ती म्हणजे- आम्ही जसा आमच्या आधीच्या पिढीला विरोध केला, तसा आमच्या नंतरच्या पिढीने आमच्याविरुद्ध करायला हवा होता. आमच्या मध्यमवर्गीय नागरी जाणिवांना विरोध करणं शक्य होतं. परंतु तो झाला नाही, याची खंत आहे. कदाचित या पिढीकडे अभिव्यक्तीसाठी साधनांची विपुलता असल्याने त्यांना याची गरज वाटली नसेल. ही विपुलता सर्वत्र आहे असंही माझं म्हणणं नाही. त्यामुळे आजही विरोधाची गरज आहे. ही गरज असणारी माणसं आहेत. मात्र, ती सर्व परिघावर आहेत. त्यामुळे पुढल्या काळात तसा विरोध होईलही. शेवटी कोणत्याही वाङ्मयाला समकालीन संघर्षांपासून दूर राहता येत नाही, हेच खरं.

 ‘सत्यकथेची जाहीर होळी

शनिवार, दि. १ मार्च १९६९ : आज सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी ‘सत्यकथा’ मासिकाच्या कचेरीसमोर मराठीतील तापसी तरुणांनी ‘सत्यकथा’ या वाङ्मयीन मासिकाची होळी केली. होळी करताना तापसी तरुणांचे आजचे म्होरके श्रीयुत राजा ढाले यांनी आपली भूमिका आधी समजावून सांगितली व मग अंकाला घासलेट ओतून अग्नी दिला। असे करण्यापूर्वी काही क्षण तापसी तरुणांचे एक प्रतिनिधी म्हणून सुप्रसिद्ध कवी वसंत गुर्जर यांनी ‘सत्यकथा’ जाळण्यासंबंधीचे श्रीयुत राजा ढाले + तुळसी परब + वसंत गुर्जर यांच्या सह्या असलेले एक निवेदन ‘सत्यकथे’च्या कचेरीत जाऊन श्रीयुत राम पटवर्धन यांजकडे सादर केले व आम्ही इथून पुढे विधायक कार्य करू असे तोंडी आश्वासन दिले : तेव्हा श्रीयुत राम पटवर्धन यांनीही आमचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील असे भरघोस तोंडी आश्वासन दिले। या समारंभाला वरील तिघांशिवाय मराठी नियतकालिकांचे आद्य संपादक रमेश समर्थ तसेच मनोहर ओक : जयंत नेरूरकर : प्रदीप नेरूरकर : सतीश काळसेकर : पां. सी. वाडकर : प्रेमानंद मयेकर : श्रीकांत सिनकर : रमेश रघुवंशी : एकनाथ पाटील व ‘सत्यकथे’चे एक प्रतिनिधी श्रीयुत गुरुनाथ सामंत हे हजर होते। कार्यक्रम शांतपणे पार पडावा यासाठी दोन पोलिसांची आयोजनं करण्यात आली होती। आमंत्रण पत्रिकेप्रमाणे ५ मार्च रोजी होऊ घातलेला कार्यक्रम १ मार्च रोजीच उरकण्यात आला, कारण २ मार्चपासून आठवडाभर जमावबंदी हुकूम पोलीस कमिशनर अमलात आणणार होते.

दैनिक चक्रवर्ती, अंक पहिला, मे १९६९

lokvangmaya@gmail.com