कविवर्य कुसुमाग्रज श्रद्धांजली विशेषांकात प्रसिद्ध झालेला आठवणीपर लेख.. मला १८ जानेवारी १९९९ ला नाशिकला जावं लागलं ते सरस्वती पारितोषिक स्वीकारण्यासाठी. तात्यासाहेबांना भेटावं असं नेहमीच वाटायचं. परंतु तसा खास योग असा आला नाही. मुंबईत जागतिक मराठी परिषदेचा षण्मुखानंदमध्ये समारंभ झाला, त्यावेळी रंगमंचावर त्यांना पाहून आदराने हसणं झालं, परंतु बोलण्याची वेळ अशी आलीच नाही. त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मी त्यांचं एक तरुणपणातलं वर्तमानपत्रात आलेल्या छायाचित्राचं कात्रण मुद्दाम जपून ठेवलं होतं. सोज्वळ आणि देखणा माणूस.. काळ्या रंगाच्या फ्रेमचा चष्मा.. मला आजही ते सारं आठवतं. सैगल भर मार्गात कधी ऐकता तव मंजुळ गान अडखळुनी जागी थांबतो क्षणभर बेभान शब्दाशब्दांच्या घटांतुन ओसंडे भाव पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षांव! मंद लयींमधली आर्तता अन् मोहक झार तप्त कांचनाची जणू तू खेचतोस तार! प्रशान्त ओहळते स्वरातिल सुंदर मार्दव हे गहन भावनांची गमे ही जान्हवीच वाहे! घालविल्या रात्री आठवे, त्या गोदाकाठी घाटावर माथे टेकता विश्रान्तीसाठी, काळोखातुनि ये दुरोनी दिव्य तुझा नाद जीर्ण देवळांच्या तटावर घुमवित पडसाद! हृदयातील रणे जाहली क्षणामध्ये शांत आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात अशीच संगीते आळवी तुझी कलावन्ता, घडिभर जागव रे आमुची अशीच मानवता! (‘विशाखा’मधून.. ) १९ जानेवारी १९९९ ला मात्र त्यांना भेटण्याचा योग आला. आम्ही भावंडं त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे पाहिलं आणि मला फार वाईट वाटलं. इतक्या देखण्या पुरुषाची ती स्थिती पाहवत नव्हती. खूप थकले होते ते. आम्हाला पाहून तशाही परिस्थितीत हसत हसत उठून बसले. त्यांच्या डोळ्यांत पाहताना मला तेव्हा वाटलं, हे खरे अमृताचे डोळे. माणसानं किती निष्पाप व निर्मळ असावं याचं जिवंत उदाहरण. त्या क्षणी त्यांनी मला पाठवलेलं एक पत्र आठवलं. त्यांचा आवडता गायक होता सैगल. मी गायलेली सैगलची गाणी त्यांनी ऐकली होती आणि माझं भरभरून कौतुक करून त्यांनी एक पत्र धाडलं होतं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं, ‘तुम्ही सैगलची सगळी गाणी म्हणा.’ त्यांना मी जपून ठेवलेल्या त्यांच्या छायाचित्राच्या कात्रणाबद्दल सहजपणे बोलले, ‘तुम्ही खूप छान दिसत होता.’ तशाही अवस्थेत ते म्हणाले, ‘कुठला बरं तो फोटो?’ मी त्यांना वर्णन करून सांगितलं. पुन्हा ते मोकळेपणाने हसले. तात्यासाहेब म्हणाले, ‘नाशिकला येता का कधी?’ मी सांगितलं, ‘माझ्या आईची देवी इकडचीच आहे. १९६२ ते १९८२ पर्यंत आम्ही नेहमी येत होतो; परंतु तुमच्या भेटीचा योग नव्हता.’ तिथे रोटरीच्या मंडळींची धावपळ चालली होती. माझ्या हस्ते तात्यासाहेबांना ‘नाशिकभूषण’ हे मानपत्र द्यायचं होतं. त्यांच्या हाताला लावलेल्या सलाइनच्या पट्टय़ा वगैरे पाहून माझ्यानं राहवेना. मी म्हणाले, ‘नका रे त्यांना त्रास देऊ.’ अशाही परिस्थितीत जेव्हा त्यांना ते मानपत्र देण्यात आलं, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ‘नाशिकभूषण’ हा शब्द चुकीचा लिहिला गेलाय. ते म्हणाले ‘अरे, भूषणमधला भू चुकीचा लिहिलाय. तो दीर्घ आहे. इथं ऱ्हस्व लिहिला गेलाय.’ त्यांचं ‘युगामागून चालली रे युगे ही’ हे पृथ्वीचं गीत मला खूप आवडायचं. मीच त्याला चाल लावून अस्ताई करून गात असे. बाळनं (हृदयनाथनं) तात्यासाहेबांना सांगितलं, ‘मला तुमची काही गीतं स्वरबद्ध करायची आहेत.’ ते म्हणाले, ‘जी आवडतील ती सारी करा.’ बस- तेवढाच त्यांचा प्रसाद घेऊन आम्ही मुंबईला परतलो. असा अथांग कविमनाचा माणूस पुन्हा होणे नाही. पुन्हा ‘गर्जा जयजयकार’ही नाही आणि ‘नटसम्राट’देखील नाही. आता आहेत फक्त आठवणी! लता मंगेशकर (लोकरंग- २१ मार्च १९९९)