आपली त्वचा मुख्यतः चेहरा तजेलदार आणि तुकतुकीत असावा असे तमात महिला वर्गाला वाटत असते. मात्र कधी शारीरिक तक्रारींमुळे तर कधी स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ न झाल्याने चेहऱ्यावरचे तेज हरवून जाते. मग काही जणी घरगुती उपायांनी तर काही जणी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरुन त्वचा चांगली कशी दिसेल याचा प्रयत्न करतात. मात्र या प्रसाधनांमध्ये असणाऱ्या रसायनांमुळे त्वचा आणखी खराब होते. आपले दिसणे हे जसे प्रदूषणासारख्या बाह्य गोष्टींवर अवलंबून असते त्याचप्रमाणे ते आपण काय खातो यावरही असते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारायचा असेल तर काही पदार्थांचा आहारात समावेश करणे अत्यावश्यक आहे. कोणते आहेत हे पदार्थ पाहूयात १. ऑलिव्ह ऑईल - ऑलिव्ह ऑईल हे त्वचा, केस आणि एकूणच आरोग्यासाठी अतिशय चांगले असते, त्यामुळे आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश करावा. ऑलिव्ह ऑईलमध्ये अॅंटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने शरीरातील पेशींची क्रिया चांगली होते. त्यामुळे तुमचे वय वाढले तरीही तुमच्या चेहऱ्यावरुन ते सहज दिसून येत नाही. २. ओटस - हे अतिशय सर्वोत्तम अन्न आहे. ओटसमध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेटस असल्याने त्याचा शरीराला अतिशय चांगला उपयोग होतो. ओटसमध्ये प्रथिनांचे प्रमाणही चांगले असते, याशिवाय ओटसमुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. ३. टोमॅटो - टोमॅटोचा आहारात समावेश केल्यास त्वचेचे सूर्याच्या अतिनिल किरणांपासून संरक्षण होते. चेहऱ्याची त्वचा उजळ करायची असल्यास त्याच्या आहारातील समावेशाबरोबरच चेहऱ्याला टोमॅटो लावल्यास त्याचा फायदा होतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंटस असल्याने तसेच त्यात असणाऱ्या लायकोपीन या घटकामुळे त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते. ४. ग्रीन टी - ग्रीनटीमधील अनेक घटक आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्वचेला आवश्यक असणारी पोषक तत्वे आणि ऑक्सिजन ग्रीन टी मधून मिळतो, रक्ताचे वहन चांगल्यापद्धतीने होण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे त्वचा नैसर्गिकपणे उजळण्यास मदत होते. ५. आक्रोड - सुकामेवा आरोग्यासाठी कायमच चागंला असतो. मात्र धावपळीत आपण हे खायला विसरतो. विशेषतः शाकाहारी असणाऱ्यांसाठी तर आक्रोड अतिशय पोषक आहे. ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि प्रथिनांसाठी दररोज आक्रोड खाणे अतिशय महत्त्वाचे आहे. अॅलर्जीसारख्या त्वचेच्या तक्रारी कमी होण्यासाठीही याचा फायदा होतो. ६. पाणी - शरीराच्या अनेक अडचणी या जास्तीत जास्त पाणी प्यायल्याने कमी होतात. मात्र हल्ली कामाचा ताण आणि दिवसातील जास्त काळ घराबाहेर असण्यामुळे पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे शरीर म्हणावे तितके शुद्ध होत नाही. रक्ताभिसरण, पोटाच्या सर्व क्रिया आणि एकूणच शरीराचा कारभार सुरळीत चालण्यासाठी शरीलाला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे. मानसी जैन