जीवघेण्या अपघातात मेंदूला इजा झाली तर पेशींची जादा वाढ होऊन नंतर फेफऱ्याचा रोग होण्याची शक्यता असते. शिवाय बोधनशक्तीही कायमची कमी होऊ शकते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. या संशोधनात रुटगर्स विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक विजी सनथकुमार यांचाही समावेश आहे. सनथकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अपघातात मार लागल्याने मेंदूला इजा होते तेव्हा लगेचच्या काळात नवीन न्यूरॉन्सची संख्या वेगाने वाढते, पण काही आठवडय़ांनी तो वेग पूर्ववत होतो. त्या म्हणाल्या, की नेहमीच्या परिस्थितीत जेव्हा मेंदूच्या पेशी नाश पावतात तेव्हाच दुरुस्तीसाठी नवीन पेशी म्हणजे न्यूरॉन्स निर्माण होत असतात. अपघातानंतर काही आठवडय़ांनी नवीन मेंदूपेशी तयार होण्याचा वेग मंदावतो, पण सुरुवातीला या पेशींचे प्रमाण वाढते त्यामुळे अशा अवस्थेत केमोथेरपीसारखी औषधे वापरता येतात. जेव्हा नवीन पेशी तयार होण्याचा वेग सुरळीत होतो तेव्हा मेंदूची हानी होण्याची शक्यताही कमी होत जाते. मेंदूला आघातानंतर पेशींची संख्या नियंत्रित करणे त्यामुळे आवश्यक ठरते. वयोमाने हिपोकॅम्पसमधील पेशींची पुनर्निर्मिती क्षमता कमी होते, त्यामुळे स्मृती व आकलनावर परिणाम होतो, पण मेंदूला आघात होतो तेव्हा ती प्रक्रिया वयाशी संबंधित नसते तर आघाताशी संबंधित असते. वयपरत्वे नवीन न्यूरॉन्स तयार होण्याची प्रक्रिया मंदावणे हे नैसर्गिक असते, पण अपघातानंतर ती त्यापेक्षा जास्त वेगाने कमी होत जाते. ‘जर्नल स्टेम सेल रिपोर्ट्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.