सकाळचा नाश्ता अजिबात चुकवू नये असे भारतीय आहारशास्त्र सांगते. रात्रभर पोट रिकामे असल्याने पोटात खड्डा पडलेला असतो. शरीराला दिवसभराच्या कामांसाठी उर्जा मिळावी यासाठी सकाळी पोटभर आणि पौष्टिक नाश्ता करणे अतिशय आवश्यक असते. मात्र भारतात बहुतांश लोक बाहेर नाश्ता करतात. शिक्षण- नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहणारे, ऑफिस दूर असणारे किंवा यांसारखी अनेक कारणे यामागे असू शकतात. तर काही जण केवळ आवड म्हणून नाश्ता घराबाहेर करण्याला प्राधान्य देतात. 'अमेरिकन एक्सप्रेसने' केलेल्या एका अभ्यासानुसार, लोकांचा नाश्त्यावर होणारा खर्च सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. २०१६ मध्ये नाश्त्यावर केला जाणारा खर्च हा २०१५ मध्ये केल्या जाणाऱ्या खर्चापेक्षा ५६ टक्क्यांनी जास्त असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. मुंबई, पुणे, बंगळूरु, चेन्नई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सकाळच्या वेळात रेस्तराँमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे यामध्ये नोंदविण्यात आले आहे. मागील काही काळापासून भारतात नाश्त्याच्या बाबतीत मोठ्याप्रमाणात जागरुकता केली जात असून त्याचाच हा परिणाम असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. नाश्त्याच्या पदार्थांमध्येही दिवसागणिक बदल होत असून इडली, डोसा, पुरी-भाजी यांच्या पलिकडे जात पॅनकेक, वेफल्स अशा पाश्चिमात्य पदार्थांचाही समावेश कऱण्यात येत आहे. नाश्त्याची होम डिलिव्हरीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बाहेर खाण्याच्या खर्चावर शहरांनुसार बदल असल्याचेही चित्र आहे. बंगळुरुमध्ये २०१६ मध्ये या खर्चात ६७ टक्क्यांनी वाढ झाली असून दिल्लीमध्ये ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये हा खर्च ६३ टक्क्यांनी वाढल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. अमेरिकन एक्सप्रेस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज अडलखा याबाबत म्हणाले की, क्विक सर्व्हिस रेस्तराँ वेगाने वाढत आहेत. याचे कारण म्हणजे बाहेर खाणे अतिशय सोयीचे झाले आहे.