भारतात रस्त्यालगत जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे हवेत एक हजार पटीने विषारी वायूचा संसर्ग होत असून त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या परिसरात सातत्याने कचरा जाळला जातो, त्या परिसरातील रहिवाशांवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. जगभरात वर्षभरातून किमान दोन अब्ज टन कचरा तयार होतो, त्यापैकी अध्र्याची विल्हेवाट जाळून लावण्यात येते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रगत देशांमध्ये विविध मार्ग आहेत. अनेक देशांमध्ये कचरा क्षेपणभूमीवर नेऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. पण संपूर्ण कचरा हा क्षेपणभूमीवर नेला जात नसल्याने त्याची जाळून विल्हेवाट लावली जाते, असे दिसून आले आहे. अनेक शहरांमध्ये कचरा विल्हेवाटीची योग्य व्यवस्थाच नसल्याने कचरा जाळल्याशिवाय पर्यायच नसतो, असे अमेरिकी संशोधकांना आढळून आले आहे. ‘‘भारतातील कोणत्याही शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. बंगळुरूसारख्या प्रगत शहरातही हा प्रकार आढळतो. कचरा जाळणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, हे कुणाच्याही लक्षात येत नाही,’’ असे अमेरिकेतील डुके विद्यापीठातील संशोधक हेडी वेरलॅण्ड यांनी सांगितले. जाळण्यात येणाऱ्या या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या वातावरणात हजार पटीने विषारी वायूचा विसर्ग होत असतो. दिवसभरात शरीरात येणाऱ्या विषारी हवेच्या संसर्गाएवढी विषारी हवा कचरा जाळल्याने केवळ १ मिनिटाच्या कालावधीत शरीरात दाखल होत असल्याचे डुके विद्यापीठातील प्राध्यापक मायकेल बरजीन यांनी सांगितले. यासाठी संशोधकांनी बंगलोरच्या उपनगरातील रस्त्यालगतच्या कचऱ्याचे नमुने घेऊन त्याच्या विघटनातून होणाऱ्या विषारी वायूचे रासायनिक परीक्षण केले. या वेळी संशोधकांनी अमेरिका आणि भारतातील हवेतील विषारी वायूच्या प्रादुर्भावाचेही परीक्षण केले. त्या वेळीदेखील दोन्ही नमुन्यांतील राखाडी रंगांमधील भिन्नता प्रकर्षांने दिसून आली. (टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)