देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या चिकुनगुनिया आणि डेंग्यूने थैमान घातले असून त्याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. जर या विकारांवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याची भीती पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीमध्ये चिकुनगुनिया आणि डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील बहुसंख्य नागरिक भारतातील इतर भागांत अथवा विदेशात राहणाऱ्या आपल्या मित्रांना आणि कुटुंबांना प्रवास न करण्याचा सल्ला देत आहेत. शहरामध्ये जवळपास दहा वर्षांनंतर चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर हा पर्यटन करण्यासाठी सर्वात उत्तम काळ समजला जातो. हे तीन महिने पर्यटन क्षेत्राला महसूल मिळविण्यासाठी प्रमुख मानले जातात. डेंग्यू आणि चिकुनगुनियामुळे दिल्लीमध्ये कमीत कमी ३५ लोकांचा मृत्यू झाला असून, २,८०० पेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली आहे. दिल्लीमध्ये पर्यटक येण्याचे प्रमाण ३५ टक्के आहे.

चिकुनगुनिया आणि डेंग्यूचा सर्वाधिक प्रभाव दिल्लीवर झाला असून जयपूर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, जैसलरमेर आणि पश्चिमेतील राज्यांमध्येही पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात रोडावली असल्याचे असोचॅमने म्हटले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)