शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश असावा असे आपण वारंवार ऐकतो, वाचतो. यातही प्रकृतीनुसार कोणत्या व्यक्तीने कोणते फळ खाल्लेले चांगले ते किती प्रमाणात खावे याच्या काही मर्यादा असतात. मात्र कोणत्या फळासोबत कोणते फळ किंवा भाजी खाल्यास ते आरोग्यासाठी चांगले नसते ते पाहणेही तितकेच आवश्यक आहे. विरुद्ध गुणधर्म असणारी फळे ही केवळ घातकच नसतात तर पोटाच्या विकारांचे महत्त्वाचे कारण ठरु शकतात. ही फळे किंवा भाज्या एकमेकांसोबत खाल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. पाहूयात ही फळे कोणती. संत्री आणि गाजर संत्री आणि गाजर कधीच एकाचवेळी आपल्या आहारात येणार नाही याची काळजी घ्यावी. अनेकदा समारंभामध्ये जेवायला गेल्यावर आपण त्याठिकाणी सॅलेडमध्ये गाजर घेतो आणि फ्रूटडिशमधील संत्रेही खातो. कधीतरी घरीही असे होऊ शकते. मात्र त्यामुळे अॅसिडीटी होत असून छातीत जळजळ होते. इतकेच नाही या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने किडनीला इजा होऊ शकते. पपई आणि लिंबू पपई ही प्रकृतीने उष्ण असते तर लिंबू अॅसिडीक असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास अॅनिमिया होण्याचा धोका असतो. याशिवाय हे दोन्ही पदार्थ एकत्रित खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे असंतुलन होते. लहान मुलांच्या प्रकृतीसाठीही अशाप्रकारे लिंबू आणि पपई एकत्रित खाणे घातक ठरु शकते. पेरु आणि केळ केळ आणि पेरु ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. या दोन्ही फळांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. मात्र ही दोन्ही फळे एकत्रित खाल्ल्यास आपल्याला भविष्यात काही आजारांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये अॅसिडीटी, गॅसेस आणि डोकेदुखी अशा त्रासांना सामोरे जावे लागते. संत्री किंवा अननस आणि दूध या दोन्ही गोष्टी एकत्र खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. फ्रूटसॅलेडसारख्या पदार्थांमध्ये आपण अननस आणि संत्री हे दोन्ही घटक एकत्र करुन खातो. मात्र त्यामुळे आरोग्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात. दूध किंवा त्याच्याशी निगडीत पदार्थांमध्ये संत्री आणि अननस घातल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होतात. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)