ब्रिटनमधील संशोधन
स्मार्टफोनवरचे ई-मेल बंद करणे हा सुखाचा एक मार्ग आहे, कारण तसे केल्यास मानसिक ताण कमी होतो, असे नवीन संशोधनातून दिसून आले आहे. ज्यांच्या स्मार्टफोनवर आपोआप ई-मेल स्वीकारले जातात, त्यांच्यासाठी ती एक डोकेदुखी असते, कारण ते पाहावे लागतात व त्यातून ताण येतो; त्याला ‘ईमेल प्रेशर’ असे म्हटले जाते.
१९७० मध्ये प्रथम ई-मेलची सुरुवात झाली, त्यानंतर त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढतच गेला. झटपट संदेशवहनासाठी ई-मेल हे उपयोगी साधन आहे, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींसाठी तर त्याचे महत्त्व अधिक आहे, शिवाय व्यक्तिगत वापरही मोठा आहे. काही व्यावसायिकांच्या मते ई-मेल हे संदेशवहनाचे लोकप्रिय साधन असले तरी त्यामुळे नैराश्य येते, कामातील उत्पादकता कमी होते. ई-मेलची संख्या सतत वाढतच जाते आणि ते पाहण्यात वेळ जातो, त्यामुळे मूळ काम बाजूला राहते.
ई-मेलबाबत संशोधन करताना ब्रिटनमधील फ्यूचर वर्क सेंटर या संस्थेने व्यवसाय, उद्योग व इतर नोकरी अशा क्षेत्रांतील दोन हजार लोकांची पाहणी केली. त्यात असे दिसून आले की, तंत्रज्ञान, नोकरी-व्यक्तिगत जीवन यांचा समतोल, व्यक्तिमत्त्व यावर ई-मेलमुळे परिणाम होत असतो. जे लोक आपोआप ई-मेल स्वीकारणारे स्मार्टफोन वापरतात, त्यांना जास्त ताण येतो.
दिवसभर ई-मेल संपर्कात राहिल्याने ताण येतो. सकाळी किंवा रात्री एकदम ई-मेल बघितले तरी ताण येतोच. ई-मेल सेवा वापरणारे व न वापरणारे किंवा कमी वापरणारे यात ई-मेल सेवा सतत वापरणाऱ्यांना ताण जास्त येतो, ई-मेलमुळे व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप होतो. एखादी व्यक्ती असा ताण कितपत पेलू शकते यावर हा व्यक्तिगत जीवनावरचा परिणाम अवलंबून असतो.
जेव्हा ई-मेल वापरायचा असेल तेव्हाच लॉग इन करून तो वापरावा, अन्यथा सतत ई-मेल येण्याची व ते समजण्याची जी व्यवस्था स्मार्टफोनमध्ये असते. त्यामुळे सतत व्यत्यय येत राहतो, कारण स्मार्टफोनच्या पडद्यावर तुम्हाला नवीन ई-मेल आला आहे हे कळत असते.
ई-मेलचे दुष्परिणाम :
* नोकरी व व्यक्तिगत जीवनात असमतोल
* व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम
* नोकरीतील कार्यक्षमतेवर परिणाम