सण आणि खाणे हे तर अगदी परममित्रच म्हणावे लागतील. आपल्याकडे वेगवेगळ्या सणांना वेगवेगळ्या पदार्थांचे महत्त्व असते. यात अनेक सणांमध्ये उपवास करणे ही आपली प्रथा आहे. काही दिवसांवर आलेल्या गणपतींमध्येही महिला हरीतालिका, ऋषीपंचमी, गणेशचतुर्थी असे उपवास करताना दिसतात. हे उपवास २ प्रकारचे म्हणता येतील. उपास (उपाशी राहणे) आणि दुसरा म्हणजे उपवास ज्यामध्ये आपण उपवासाचे पदार्थ खातो. यामध्ये आपण भगवंताचे नामःस्मरण करुन मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. हे दोन्ही प्रकार जर एकत्र मनाशी आले तर तो खरा भगवंतापर्यंत पोहोचला असं म्हणावं लागेल. म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ न खाता उप म्हणचे जवळ आणि वास म्हणजे सहवास, भगवंताच्या मनाने सहवासात राहणे, असा उपवास करावा.

उपवास करताना ‘ही’ काळजी घ्यायला हवी

१. उपवासाचे पदार्थ खाताना व उपास करताना तब्येतीची काळजी घेऊन करावा. ज्यांना मधुमेह, रक्तदाब यांसारखे त्रास आहेत त्यांनी शक्यतो उपवास करणे टाळावे.

२. पित्ताचा त्रास असेल तर उपवासाचे पदार्थ जरा जपून खावेत. पूर्ण वेळ उपाशी राहून उपास केल्याने पित्त वाढते. उपाशी पोटी आंबट पदार्थ खाल्याने पित्त वाढते.

३. उपवासामध्ये राजगिरा, दूध, रताळे यांचा वापर उत्तम. फळे, ताक, दही, काकडी यांचाही समावेश ठेवावा.

४. मधुमेही लोकांनी उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे कार्बोदके जास्त देणारे पदार्थ असल्याने मधुमेही लोकांनी याचा अती वापर टाळावा.

५. उपवासाला अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. ढगाळ हवेला जड पदार्थ पचत नाहीत म्हणून हलका आहार घ्यावा. जड आणि तळलेले पदार्थ टाळणे उत्तम.

६. वजनवाढीच्या दृष्टीकोनातून विचार केला तर चुकीच्या पद्धतीने केलेला उपवास हा वजन वाढवतो. आणि उपवासाचे पदार्थ कधीतरी खायला मिळतात असे म्हणून जर जास्तच खाणे झाले तर वजनवाढ होतेच.

म्हणून उपास करता करता ‘उपवास’ उत्तम करणे. ज्याची सध्या जास्त गरज आहे. तणावाच्या परिस्थितीत वातावरणात हा उपवास आपल्या मनाला स्थिर करून शांतता व समाधान देईल ज्यांनी प्रकृती नेहमी उत्तम राहिल.

श्रुती देशपांडे, आहारतज्ज्ञ