धावपळीच्या वेळी झोप नीट झाली नाही, कामाच्या नादात जेवणाच्या वेळा चुकल्या, पाणी प्यायचे लक्षातच राहात नाही. अशा ऐकायला किरकोळ वाटणाऱ्या तक्रारी आपल्यातील अनेक जण करत असतात. एखादवेळी असे होत असेल तर हरकत नाही . मात्र सातत्याने असे होत राहील्यास त्याचे रुपांतर पित्तात होते आणि शरीर या परिस्थितीला प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करते. मग डोके जड होणे, छातीत जळजळ होणे असे त्रास जाणवू लागतात. अशी जळजळ होत असतानाही अनेकदा आपण कुपथ्य करून ती आणखी वाढवतो. मात्र आहारातील काही किमान गोष्टींचे पालन केल्यास असे होणार नाही, तेव्हा जाणून घेऊयात अॅसिडीटी होऊ नये म्हणून करता येतील अशा गोष्टी. * चहा घेणे टाळावे * जेवणात तुरीची डाळ टाळावी. मुग डाळ घ्यावी * जेवणात मसालेदार पदार्थ टाळावे * दही, ताक टाळावे * अॅसिडीटी झाली असल्यास जेवणात शक्यतो मुगाचे वरण भात, दुध भात, खीर असे घ्यावे * जागरण टाळावे * जेवण करून लगेच झोपणे टाळावे * चिंच असलेले पदार्थ टाळावेत * दुधाचा भरपूर समावेश करावा * एकाच वेळी अती खाऊ नये, त्याऐवजी दर थोड्या वेळाने थोडे थोडे खावे. * पाणी भरपूर प्यावे * शेंगदाणे टाळावेत पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना हा त्रास लगेच होतो. अशा व्यक्तींनी आपल्याला कोणत्या गोष्टींचा जास्त त्रास होतो याचे निरीक्षण करावे व त्या टाळाव्यात. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्याने एकच उपाय योजना सगळ्यांना लागू होत नाही. उदा. काहींना लिंबू पाणी पिण्याने बरे वाटते पण आम्लपित्त असणाऱ्यांना हे लिंबू त्रास देते. शेवटी आपली प्रकृती आपण जाणून घ्यायची असते. थोडी शारीरिक हालचालही महत्वाची असते. त्यामुळे ठराविक व्यायाम करावा. बरेच जण आहारतज्ज्ञांचे न ऐकता अति कमी खाऊन वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ही जळजळ निर्माण करतात. मात्र २ खाण्यात ३ तसा पेक्षा जास्त अंतर बरेच दिवस असले तर हा त्रास सतत होतो. म्हणून जर बाहेर असाल तर राजगिरा लाडू, साळीच्या लाह्या, खजूर असे पदार्थ जवळ ठेवले तर पटकन तोंडात टाकता येतात. बरेच जण सकाळची न्याहारी न करता बाहेर पडतात किंवा घरात असलेल्या स्त्रिया एकटीसाठी कुठे काही करत बसा म्हणून न्याहारी टाळतात. यामुळे सुद्धा जळजळ व पचनाच्या तक्रारी वाढतात . भूक लागल्यावर लगेच खाणे व योग्य तेच खाणे महत्वाचे असते. रात्रीच्या वेळी खूप जड जेवण केल्याने, रात्री मांसाहार जास्त केल्यानेही अॅसिडीटीचा त्रास वाढतो. रात्रीचे जेवण हे हलके असावे कारण रात्रीच्या जेवणा नंतर आपली हालचाल होत नाही, म्हणून पचनाला हलके पदार्थ खावेत. दुसरी सगळ्यात मोठी पचनाच्या तक्रारीला हातभार लावणारी बाब म्हणजे मानसिक ताणतणाव. हल्लीच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात हा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आपली मानसिकता आपल्या हातात असते, दुसऱ्याकडून केलेल्या अतीअपेक्षेमुळे निराशा येऊन मनात तणाव निर्माण होतो. घरात असणाऱ्या बाईला एकटेपणामुळे हा ताण जाणवतो. यासाठी आपले मन कोणत्या तरी आवडीच्या चांगल्या कामात गुंतवणे, छंद जोपासणे, सकारात्मक विचार करणे गरजेचे असते. अनेक महिने पित्तशामक औषधे घेऊनही काही फायदा होत नाही. कारण त्याचे मूळ हे ‘मनात’ असते. या साठी शास्त्रीय संगीताचा खूप उपयोग होतो. आपले मन आपल्या जवळच्या व्यक्ती जवळ मोकळे केल्याने सुद्धा बरे वाटते. आपल्या आयुष्याची दिशा आपण ठरवून जी वस्तुस्थिती आहे ती स्विकारून आनंदाने पुढे जाणे हा मार्ग अवलंबला तर मनाची व शरीराची तक्रार उरणार नाही. म्हणूनच समतोल आहार व समतोल विचारांबरोबर आनंदाने जगूया व इतरांना आनंद देऊया.