यावेळी धनत्रयोदशी २८ ऑक्टोबरला आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनादरम्यान कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. धन्वंतरी विष्णुचा अवतार असल्याचे मानले जाते. जगात आरोग्यशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भगवान विष्णुंनी दिवाळीच्या दोन दिवस अगोदर धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरीचा अवतार धारण केला होता. भगवान धन्वंतरीच्या प्रकटीकरणाच्या दिवशीच धनत्रोयदशी साजरी केली जाते. याव्यतिरिक्त अन्य कारणांनीदेखील धनत्रयोदशी साजरी केली जाते. कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धन्वंतरीचा जन्म झाला होता यामुळे या तिथीला धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते. धन्वंतरी जेव्हा प्रकट झाले होते तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. धन्वंतरी हातात कलश घेऊन प्रकट झाले असल्याकारणामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी नवीन खरेदी केल्याने धनामध्ये १३ पट वाढ होत असल्याचे काही ठिकाणचे मानणे आहे. देवतांचे वैद्य असलेल्या धन्वंतरीना वैद्यशास्त्राचे देव मानले जाते. त्यामुळे डॉक्टरांसाठी हा दिवस फार महत्वाचा असतो. यादिवशी घराबाहेर आणि आंगणात दिवे लावण्याचीदेखील प्रथा आहे. या दिवशी सोने अथवा चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. आपल्यावर धनाची कृपा व्हावी म्हणून या दिवशी अनेकजण भांडी आणि दागिन्यांची खरेदी करतात. धातूमुळे नकारात्मक उर्जा नष्ट होत असल्याचे मानले जाते. एवढेच नव्हे तर धातूमधून निर्माण होणारी तरंग लहरी थेराप्यूटिक प्रभाव निर्माण करतात. यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चादी खरेदीची परंपरा पुर्वापार चालत आली आहे. केवळ सोने अथवा चांदीच नव्हे तर या दिवशी अन्य वस्तूंचीदेखील खरेदी केली जाते. अनेकजण या दिवशी बाईक अथवा कार घेणे पसंत करतात.