तुमच्या आमच्या, सर्वाच्या जीवनात दोन प्रकारच्या ‘कडकीचा’ अनुभव आपण घेत असतो. आपण दोन-चार मित्र हॉटेलात जातो. वयाने मोठी व्यक्ती फक्त ‘चहा’ मागवते. का तर, आज ‘कडकी’ आहे. खिशात चार जणांच्या चहापुरतेच पैसे आहेत. असो. दुसरी शारीरिक कडकी म्हणजे तळहात, तळपाय नेहमी गरम राहतात. डोळ्यांची आग होते, लघवीला गरम हाते. प्रत्यक्ष थर्मामीटरमध्ये ताप दिसत नाही, पण तापाची सारखी भावना होते. शौचास कडक होते व काही वेळा शौच करताना रक्त पडते; रात्री खूप उशिरा झोप लागते. अशी पित्ताची विविध लक्षणं आलटूनपाटलून दिसतात. कडकी विकाराची गंमत अशी की कडकी कमी झाली तर काहींना लगेचच सर्दी, नाक वाहणे सुरू होते. कृश व्यक्तींची कडकी लवकर बरी होत नाही. कारण त्यांच्या पित्तसदृश लक्षणांना वाताच्या रुक्ष, लघू या गुणांची जोड असते. त्यामुळे त्यांच्या कडकीच्या जोडीला उलटीची भावना, आम्लपित्त या रोगांचाही सामना करायला लागतो. कडकी विकाराच्या निर्मूलनाकरिता दोन प्रकारे उपचार करावे लागतात. मानवी शरीरात रसधातूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जे खातो-पितो, त्यातून रसधातू तयार होतो. रसधातू शीत गुणांचा आहे. रसधातूपासून रक्ताची निर्मिती होते. रक्त हे उष्ण निर्दालक आहे. त्यामुळे कडकी विकारात उष्णता कमी होईल, पण पंडुता, सर्दी, कफ, खोकला, दमा होणार नाही; अशी काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदिक चिकित्सक कडकीकरिता अंगावर पुरळ उठते का, शरीराची आग होते का, खाज सुटते का याचा मागोवा घेत असतात. कडकी पित्तप्रधान असली तर प्रवाळ, मौत्यस्य, उमळसरी अशी औषधे दिली जातात. कडकी क्वचितच कफप्रधान असते; त्यावेळेस संबंधित व्यक्तीस बारीक ताप येणार नाही याकरिता लघु मालिनी वसंत, ज्वरांकुश, अम्लपित्तवरी अशी औषधी योजना केली जाते. कडकी विकारांत रसरक्त वाहिन्यांत आम दोष वाढलेला असतो. आपण जो आहार घेतो, त्याचे सूक्ष्म पचन मंदावलेले असते. मिरी हा आपल्या नेहमीच्या परिचयाचा असा पदार्थ आहे की; तो शरीरात रसरक्त वाहिन्यांत खोलवर पोचून सूक्ष्म पचनाचे उत्तम काम करतो. एकदोन मिरेपूड व आठदहा तुळशीची पाने असे मिश्रण सकाळी व सायंकाळी जेवणाअगोदर तीनचार तास घ्यावे. ज्यांच्या अंगात खूप खूप कडकी आहे, त्याच्या जोडीला शरीरभर खाज आहे; त्यांनी गेरू किंवा कावेचे चूर्ण पाव चमचा एक वेळ अवश्य घ्यावे. दही, लोणची, पापड, शिळे अन्न, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, ज्यूस, उसांचा रस असे खाणे-पिणे कटाक्षाने टाळावे. चाकवत, राजगिरा, तांदुळजा, सुरण अशा भाज्या व पुदिना, आले अशी चटणी नियमितपणे, खावी. डाळिंब, सफरचंद, ताडेगोळे, पांढरे खरबूज अशी फळे शरीरांतील नेहमीची गरमी कमी करायला निश्चित मदत करतात. रात्रौ उशिरा जेवण, मांसाहार, शंकास्पद अन्न अवश्य टाळावे. कावीळ मानवी जीवनात सर्वानाच केव्हा ना केव्हा काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, शोक या षड्रिपूंचा सामना करावा लागतो. या षड्रिपूंमध्ये काम-इच्छा-वासना यांना काही वेगळे स्थान आहे. तुमच्या आमच्या जीवनात काम म्हणजे चांगल्या अर्थाने भूक, आवड. वासना नसेल तर जीवनच व्यर्थ ठरेल. संत, महंत मंडळींचे ठीक आहे. त्यांचे पुढे उदाहरण असते निष्काम कर्मयोग्याचे. असो. तुम्ही-आम्ही जर जेवणखाणच नकोसे केले म्हणजे सगळाच कारभार आटपला असे समजावे. कावीळ हा शब्द ‘कामला’ या मूळ संस्कृत शब्दाचा मराठी प्रतिशब्द आहे. बहुतेक सर्वाना कावीळ या रोगलक्षणांचा केव्हा ना केव्हा सामना करावाच लागतो. माझे लहानपणी एककाळ काविळीची जबरदस्त साथ आली होती. कामला म्हणजे ‘कामाचा लय’; खाण्या-पिण्याची अजिबात इच्छा वा रुची नसणे. या रोगाचे सर्वसामान्यपणे दोन प्रकार आढळतात. रुद्धपथ कामला व बहुपित्त कामला. रुद्धपथ कामला किंवा नेहमीचा काविळीचा प्रकार हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. या विकारात डोळे, नखे, मूत्र या सगळ्यांना गडद पिवळा रंग येतो. मल मात्र पांढरा किंवा क्वचित काळा असतो. आपल्या पोटात यकृत व प्लीहा या दोन अवयवांकडून पित्ताचे स्राव येणाऱ्या अन्नात मिसळत असतात. ते स्राव आमाशय व पक्वाशय या दोन आतडय़ांमध्ये असणाऱ्या पित्ताशयाकडूनही अन्नावर पचनाचे काम सतत करत असतात. कावीळ या विकारांत विविध कारणांनी हे पित्ताचे स्राव अन्नात न मिसळता रक्तांत मिसळतात. त्यामुळे लघवी पिवळी होते, क्वचित लाल होते. भूक नाहीशी होते. बहुपित्त कामलेत मल, मूत्र, नखे सर्वच पिवळ्या किंवा लालसर रंगाची असतात. मला स्वत:ला खूप वर्षांपूर्वी, पुण्याहून मुंबईला रेल्वेने जात असताना, काविळीचा सामना करावा लागला होता. लघवी गर्द पिवळी, किंचित लाल आढळल्याबरोबर मी लगेचच उकळलेले पाणी प्यायला सुरुवात केली. कोरफडीच्या एका संपूर्ण पानाचा गर दिवसभरात खात होतो. तेल, तूप, लोणी, शेंगदाणे, खोबरे, मिठाई काही दिवस पूर्णपणे वर्ज्य केली. माझ्याकडे आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, कुमारीआसव, गंधर्वहरीतकी इ. खूप खूप औषधे होती. पण ती न घेता एक दिवस फक्त साळीच्या लाह्य खाऊन काढला. दुसऱ्या दिवसापासून चार दिवस ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, उकडलेल्या भाज्या खाल्ल्या. कावीळ झालेल्या व्यक्तीने वरील उपचारांशिवाय पूर्णपणे उताणे झोपून विश्रांती घेतली तर लवकर आराम पडतो. कावीळ विकारांकरिता आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, अम्लपित्तवरी, कुमारीआसव व गंधर्वहरीतकी चूर्ण नियमितपणे घ्यावे. पोटदुखी त्रास देत असल्यास जेवणानंतर प्रवाळ पंचामृत गोळ्या घ्याव्या. कडक पथ्ये पाळावीत. कावीळ विकारात एरवी अन्नात मिसळणारे पित्ताचे स्राव अन्नात न मिसळता रक्तांत मिसळतात. त्यामुळे लघवी पिवळी होते, क्वचित लाल होते. भूक नाहीशी होते. सौजन्य - लोकप्रभा response.lokprabha@expressindia.com