निद्रानाशापेक्षाही झोपेतील स्वप्नांचा कालावधी गमावणे हे जास्त हानीकारक आहे, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत हा धोका कधीच कुणी अधोरेखित केला नव्हता. झोपेतील स्वप्नांचा भाग नष्ट होण्याने नराश्याचा विकार जडतो असेही आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आले आहे. आपल्या झोपेचे आरईएम व नॉन आरईएम असे दोन भाग असतात. आरईएम भागात झोपेमध्ये डोळ्याच्या हालचाली जलद होत असतात पण तरीही ही झोप महत्त्वाची असते. नॉन आरईएम भागात डोळ्यांच्या हालचाली होत नाहीत, ही शांत निद्रा समजली जाते. झोपेच्या सुरुवातीच्या भागात नॉन आरईएम प्रकारची निद्रा असते. पहाटेच्या वेळी आरईएम प्रकारची निद्रा सुरू होते. त्यामध्ये माणसाला स्वप्ने पडतात. आरईएम प्रकारची झोप बिघडली तर स्वप्ने पडत नाहीत, त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यातून नराश्याचे विकार जडतात, असे मत अॅरिझोना विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक रॉबिन नायमन यांनी व्यक्त केले. ‘दी अॅनल्स ऑफ न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. आरईएम झोप व स्वप्नांचा कालावधी कमी होणे यावर काही वेळा आपण झोपेसाठी औषधे घेतो त्याचा विपरीत परिणाम होऊन स्वप्नांचा भाग असलेली झोप जाऊ शकते. ही झोप गमावल्याने मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत असल्याने ही झोप सुधारणे हा नवीन उपचार पद्धतीमधील वेगळा दृष्टिकोन असू शकतो.