अपुऱ्या झोपेमुळे नैराश्य, मानसिक तणाव, हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात आदी विकारांना सामोरे जाण्याची शक्यता असते, असे संशोधन नुकतेच तज्ज्ञांनी मांडले आहे. त्यामुळे नियमित आणि पुरेशी झोप आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

अपुऱ्या झोपेबाबत तज्ज्ञांकडून सल्ला घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. डॉक्टर तसेच रुग्णांमध्ये याबाबत असलेला जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहे. दिवसेंदिवस अपुरी झोप असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. अपुरी झोप हा एक प्रकारचा रोग असून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची काही लक्षणे सांगितली आहेत. झोपताना जोरात घोरणे, श्वास अडकणे ही याची लक्षणे आहेत. यामध्ये श्वास अडकल्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह काही सेकंदांसाठी थांबतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर जाण्याचेही काही सेकंदांसाठी बंद होते. या वेळी मेंदू जागा होतो. काही सेकंदांसाठी नाकातील हवेची बंद झालेली वाट सुरळीत होते आणि पुन्हा श्वासोच्छ्वास चालू होतो. यामुळे रात्रीची झोप अपुरी होते आणि दिवसा झोप येत राहते. यामुळे कामात लक्ष केंद्रित करताना अडथळा निर्माण होतो, डोके दुखते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)