रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स आणि व्होडाफोन या दोन कंपन्यांनी एकत्र येत आपला स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमतही अतिशय कमी राहील असे कंपनीने सांगितले आहे. भारत २ अल्ट्रा ४जी असे त्याचे नाव असून त्याची किंमत ९९९ रुपये असेल असेही सांगण्यात आले आहे. याआधी बीएसएनएल, आयडिया आणि एअरटेलनेही आपले फिचर फोन लाँच करत असल्याची घोषणा केली होती. नोव्हेंबरपासून ग्राहकांना मायक्रोमॅक्सचा हा फोन उपलब्ध होईल. प्रत्यक्षात या फोनची किंमत २८९९ इतकी असेल मात्र ग्राहकांना १९०० रुपये कॅशबॅक मिळणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनच्या युजरला दरमहिना व्होडाफोनचे १५० रुपयांचे रिचार्ज ३६ महिने करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना १९०० रुपयांची कॅशबॅक मिळू शकणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ९०० रुपये ग्राहकांच्या व्होडाफोन एम-वॉलेटमध्ये १८ महिन्यांनंतर जमा होतील तर त्यानंतर आणखी १८ महिन्यांनी पुढील १००० रुपये जमा होतील. मात्र त्यासाठी १५० रुपयांचे रिचार्ज करणे बंधनकारक आहे.

याशिवाय बीएसएनएलने लाव्हा आणि मायक्रोमॅक्स या स्मार्टफोन मेकर कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी २,५०० रुपयांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन वेगवेगळ्या ऑफर्ससोबत मार्केटमध्ये घेऊन येणार असल्याचे समजते. स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी बीएसएनएलने मायक्रोमॅक्स आणि लाव्हा कंपनीसोबत भागीदारी केली आहे. मात्र या स्मार्टफोनची नक्की किंमत किती असेल, याबाबत सध्या विचार सुरु आहे.

रिलायन्स जिओने ४ जी फीचर फोन लाँच केल्यानंतर एअरटेलनेही २,५०० रुपयांत स्मार्टफोन आणणार असल्याची घोषणा केली होती. एअरटेलचा हा स्मार्टफोन दिवाळीमध्ये मार्केटमध्ये येणार असल्याची चर्चा होती. मात्र तो फोन अद्याप बाजारात दाखल झालेला नाही. या स्मार्टफोनसह एअरटेल अनेक ऑफर्स देणार आहे. या ऑफर डाटा आणि कॉलिंग संदर्भात असणार आहेत.