अपघात किंवा आघातानंतर कोमात गेलेली व्यक्ती वर्षभरात शुद्धीवर येऊ शकेल की नाही याची चाचणी वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. मेंदूला इजा झाल्यास माणूस कोमात जातो, पण काही चाचण्या करून त्याची संवेदनशीलता येण्याची शक्यता तपासली जाते. मेंदूला गंभीर इजा झालेल्या व्यक्ती कोमात जातात, पण त्या शुद्धीवर येतील की नाही हे माहिती नसते. अशा आघातात काही रुग्ण असे असतात, ज्यांच्यात थोडीशी संवेदनशीलता असते. जरी ते प्रतिसाद देत नसले तरी ती असते. वैज्ञानिकांच्या मते मेंदूने ग्रहण केलेले ग्लुकोज किंवा साखर मापनाचे ठरावीक आकडे व्यक्ती शुद्धीवर येऊ शकेल की नाही याचा अंदाज देऊ शकतात. सर्व प्रकारच्या रुग्णांत मेंदूची ऊर्जा त्या व्यक्तीच्या स्थितीवरून सांगता येते, असा दावा येल विद्यापीठाचे रॉन कुपेर्स यांनी केला आहे. त्यांच्या मते व्यक्ती शुद्धीवर येण्यासाठी किमान ऊर्जा आवश्यक असते. आताच्या संशोधनानुसार एखादी व्यक्ती नंतरच्या काळात शुद्धीवर येईल की नाही याचे निदान घटक तयार करण्यात आले आहेत. ते नेहमीच्या वैद्यकीय तपासण्यांसारखे आहेत. मेंदूतील ग्लुकोजच्या चयापचयाचा नकाशा व प्रमाण १३१ व्यक्तींमध्ये काढण्यात आले. त्यांची शुद्ध मेंदूला इजा झाल्याने हरपलेली होती. त्यांच्या मेंदूतील ग्लुकोजचे प्रमाण प्रतिमा चित्रणाने मोजण्यात आले त्यासाठी किरणोत्सारी शोधक रेणू रक्तात सोडण्यात आला. त्यातून असे दिसून आले, की प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद वेगळा होता. ज्या व्यक्तींचे ग्लुकोज चयापचय ४२ टक्के होते ते पूर्ण बेशुद्ध असल्याचे व वर्षभरात तरी शुद्ध न येण्याची लक्षणे त्यांच्यात दिसून आली. ज्या रुग्णात ऊर्जेची विशिष्ट मर्यादा तपासणीत दिसून आली. ते वर्षभरानंतर शुद्धीवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मेंदूतील चयापचयाचा दर हा ९४ टक्के असेल तर ती व्यक्ती शुद्धीवर येण्याची शक्यता जास्त असते. शुद्ध येणे हे ऊर्जेवर अवलंबून असते. कालांतराने गंभीर इजा असलेले रुग्णही शुद्धीवर येतील की नाही हे सांगता येईल, असे सांगण्यात आले. ‘करंट बायॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. (टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)