विदेशी मंत्रालयातर्फे पासपोर्ट काढण्यासाठीचे नियम डिसेंबर २०१६ मध्ये बदलण्यात आले होते. त्यानंतरही आणखी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले. नागरीकांना पासपोर्ट मिळणे सोपे व्हावे यासाठी हे बदल करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. या बदललेल्या नियमांची अंमलबजावणी मागील काही महिन्यांपासून सुरु झाली आहे. पासपोर्ट काढणाऱ्या नागरीकांना या बदललेल्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. पाहूयात काय आहेत हे बदललेले नियम. १. जन्माच्या दाखल्याची आवश्यकता नाही - पासपोर्ट नियमावलीनुसार २६ जानेवारी १९८९ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या व्यक्तींना जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला दाखवणे बंधनकारक आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना या दाखल्याची प्रत अर्जासोबत जोडावी लागते. मात्र या नियमात आता बदल करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी संसदेत नव्या नियमांबाबत माहिती दिली. दाखल्याऐवजी नागरिकांना आधार किंवा पॅन कार्ड वापरता येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्डही सादर करता येईल. २. पालकांपैकी एकाचे नाव पुरेसे - याआधी पासपोर्टसाठी पालकांमधील दोघांची नावे देणे आवश्यक होते. मात्र आता यामधील एकाचेच नाव आणि बाकी माहिती असल्यास चालणार आहे. त्यामुळे सिंगल पॅरेंट असणाऱ्यांसाठी तसेच मूल दत्तक घेतलेल्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. या लोकांना आपल्या मुलाचा पासपोर्ट काढायचा असल्यास हा नियम फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय पासपोर्टवर वडिलांचे नाव नसेल तरीही चालणार आहे. ३. जोड कागदपत्रांची संख्या कमी केली - पासपोर्ट काढण्यासाठी अनेक कागदपत्रे जोडावी लागत होती. मात्र यातील काही कागदपत्रे कमी करण्यात आली आहेत. तर काही मर्ज करण्यात आली आहेत. अॅनेक्श्चर ए,सी,डी,ई, जे आणि के हे फॉर्म कमी करण्यात आले आहेत. याशिवाय पासपोर्टच्या फॉर्मला लावण्यात येणारी जोड कागदपत्रे अटेस्टेड असण्याचीही आवश्यकता नाही. याआधी पोसपोर्टशी निगडीत प्रत्येक कागदपत्र नोटरी, प्रथमवर्ग न्यायालयीन मॅजिस्ट्रेट आणि कार्यकारी मॅजिस्ट्रेट यांच्याकडून अटेस्टेड करुनच जोडावे लागत होते. मात्र आता ही सूट देण्यात आली आहे. ४. लग्नाचा आणि घटस्फोटाचा दाखला आवश्यक नाही - पूर्वी पासपोर्टसाठी नागरीकांना लग्नाचा दाखला आणि घटस्फोट झाला असेल तर तो दाखला लावणे बंधनकारक होते. मात्र ही अट आता शिथिल कऱण्यात आली असून हे दोन्ही सर्टीफिकेट लावले नाहीत तरी चालणार आहे. ५. अनाथ आणि लग्नाशिवाय झालेल्या मुलांचा पासपोर्ट मिळणे होणार सोपे - अनाथ मुलांना पासपोर्ट मिळावा यासाठी ते राहत असलेल्या संस्थेने दिलेले पत्र पुरेसे आहे. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांचा दाखला नसला तरीही त्यांना पासपोर्ट मिळू शकतो. ज्या मुलांचा लग्नाशिवाय जन्म झालेला आहे त्यांनी एक्स्टंट अॅनेक्श्चर सी भरुन देणे बंधनकारक आहे. ६. सरकारी कर्मचाऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही - सरकारी कर्मचाऱ्यांना पासपोर्ट काढायचा असल्यास याआधी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक होते. मात्र आता हे प्रमाणपत्र नसेल तरीही चालणार आहे. पासपोर्ट घाईने हवा असले आणि हे प्रमाणपत्र मिळण्यास वेळ लागत असेल तर स्वघोषित प्रमाणपत्र पासपोर्टच्या कागदपत्रांसोबत द्यावे लागणार आहे. मात्र कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांना आपण अशाप्रकारे पासपोर्टसाठी नोंदणी केली असल्याचे सांगणे केव्हाही हिताचेच आहे. ७. आधारकार्ड आवश्यक - आता आधारकार्ड आणि यूआयडी क्रमांक कोणत्याही कामासाठी आवश्यक असून पासपोर्टसाठी नागरीकांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.