औपचारिक स्तरावर संभाषण सुरु करायचे असल्यास काही गोष्टींची आवर्जून काळजी घेणे गरजेचे असते. आता यामध्येही टप्प्याटप्याने संभाषण पुढे नेणे गरजेचे असते. आपण पहिल्यांदाच कोणाशी संवाद करत असू तर काय काळजी घ्यावी, वागण्याची, बोलण्याची पद्धत कशी असावी? याविषयी माहिती करुन घेणे गरजेचे आहे. तर सुरुवातीच्या काळात संभाषण करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेऊयात. १. sms चा वापर: एका अनोळखी व्यक्तीला भेटीसाठी विचारण्याआधी त्याला सुरुवातीलाच फोन करू नका. समोरच्या व्यक्तीचा आवाजाचा पोत, त्याचे कामाचे वेळापत्रक आपणास ठाऊक नसल्याने तुम्ही त्याच्याशी बोलताना गोंधळून जाऊ शकता आणि अशावेळी समोरच्या व्यक्तीचा मेंदू तुमच्याबद्दलची एक प्रतिमा तयार करू शकतो, अशावेळी पहिल्यांदा तुम्ही sms चा वापर करून त्याच्याशी संपर्क करु शकता. smsवर बोलण्याची सोयीची अशी वेळ विचारु शकता. संभाषणकलेत पहिल्यांदा अशा साध्या मार्गांचा अवलंब केल्यास आपले चांगले इंप्रेशन पडते. समोरची व्यक्ती कदाचित गडबडीत असल्यास एक ते दोन दिवस वाट पाहून पुन्हा एखादा sms करायला हरकत नाही. कारण समोरची व्यक्ती गडबडीत असल्याने पहिल्या sms ला उत्तर देण्याचे राहून गेलेले असू शकते. २. योग्य वेळेची आणि ठिकाणाची निवड: तुम्ही ज्या व्यक्तीला भेटणार आहात तो कोणत्या वयाचा, कोणत्या कामासंदर्भात भेटायचे आहे, किती वेळासाठी भेटायचे आहे आणि भेटीतून काय साध्य करायचे आहे यावर तुम्ही भेटण्याचे ठिकाण आणि वेळ ठरवली पाहिजे. तुम्ही तुमच्या कामासंदर्भात,नोकरीबद्दल, ऑफिसबद्दल भेटणार असाल तर शक्यतो सकाळची वेळ घ्यावी. अशा व्यक्तींसोबत नाष्ता किंवा कॉफीसाठी प्लॅन करु शकता. यामध्येही ठिकाण ठरविताना त्या व्यक्तीच्या सोयीचा आधी विचार करावा. जर काही खाजगी कारण असेल तर ऑफिस संपल्यानंतरची संध्याकाळची वेळ घ्यायलाही हरकत नाही. ३. कपड्यांचे निरीक्षण: तुम्ही कितीही नाही म्हटले तरी पहिल्या भेटीत दोन्ही व्यक्ती एकमेकांचे निरीक्षण खूप बारकाईने करत असतात. यामध्ये समोरच्या व्यक्तीने घातलेल्या कपड्यांवरुन दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या व्यक्तीमत्वाबद्दल एक मत तयार करतात. तेव्हा 'ज्या प्रकारचे संभाषण त्या प्रकारचे कपडे' हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. संभाषण सुरू करण्यापूर्वी… (भाग १) ४. हसा, हसवा आणि हात मिळवा : ‘हसण्याने’ तुम्ही हजारो लोकांना जिंकू शकता, आणि ‘हसवण्याने’ त्यांच्या हृदयात कायमची जागा मिळवू शकता. पहिल्या भेटीत समोरासमोर आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य समोरच्या व्यक्तीला आल्हादायक बनवू शकते आणि गप्पांची सुरुवात छान होऊ शकते. तुम्ही पहिल्या पाच मिनिटात समोरच्या व्यक्तीला थोडेसे हसवू शकलात तर तुम्ही जिंकला आहात हे नक्की. कारण हसल्याने माणूस हा त्याच्या नैसर्गिक स्वभावावर येतो आणि तुमच्याशी तो मनमोकळे बोलू शकतो आणि तेव्हाच तुम्ही त्याच्या हातात हात देऊन (शेकहॅंड करुन) तुमचा विषय सुरु करू शकता. ५. संभाषणाचा शेवट 'पुन्हा भेटू' असा करा: संभाषणाचा शेवट हा नेहमी पुन्हा भेटण्याचे निमंत्रण असले पाहिजे. बऱ्याचदा एखादी भेट ही खूप गंभीर विषयाला घेऊन असते, तर कधी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी असते. तेव्हा पहिल्या भेटीत कधीच तुमचे निर्णय सांगू नका. 'आपण पुन्हा एकदा भेटू आणि यावर चर्चा करू आणि मग ठरवू' असे बोला. पहिल्या भेटीत दुसरी भेट मिळवणे हेच मूळ उद्दिष्ट ठेवले तर तुमची पहिली भेट आणि संभाषण नेहमीच योग्य आणि व्यवस्थित पार पडेल हे लक्षात ठेवा. अवधूत नवले