नवरात्रोत्सव म्हणजे गणेशोत्सवानंतर येणारा आणखी एक मोठा सण. गरबा, दांडिया आणि नऊ रंगांचे कपडे घालत स्त्रीशक्तीद्वारे या शक्तीचा जागर केला जातो. मग देवीची आरती, उपवासाचे व्रत आणि सोबत उपवास केले जातात. अनेक जण चामड्याचा वापर करायचा नाही म्हणून कमरेचा पट्टा, पैशांचे पाकीट वापरत नाहीत. तर भक्तीभावाने केल्या जाणाऱ्या उपवासाबरोबरच देवीचे व्रत करताना काही जण पायात चप्पल घालत नाहीत. भक्तीभावाने केलेली कोणतीच गोष्ट त्रासदायक नसते असे आपण म्हणत असलो तरीही ९ दिवस चप्पल न घालता चालताना काही विशेष काळजी घ्यायला हवी. १. आपल्याला कायम चप्पल, बूट, सॅंडल घालून चालण्याची सवय असते. थेट रस्त्यावरुन किंवा जमिनीवरुन आपण फारसे चालत नाही. त्यामुळे अचानक असे चालल्याने पायांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपेतून उठल्यावर सुरुवातीलाच पायांच्या स्नायूंवर ताण येऊ नये यासाठी काही स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत. २. अनवाणी चालताना खडबडीत रस्त्यांवरून चालण्याऐवजी सपाट रस्त्यांवरून चालण्याचा अधिक प्रयत्न करावा. त्यामुळे पायांचे, टाचेचे दुखणे वाढणार नाही. तसेच ओल्या जमिनीवरूनही चालणे टाळावे. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. Navratri 2017 : गरबा, दांडियाला जाताय? अशी फॅशन कॅरी करा ३. अनवाणी चालल्याने, अति परिश्रमामुळे पायांना, टाचांना त्रास झाल्यास, वेदना जाणवू लागल्यास पाय कोमट पाणी व मिठाच्या मिश्रणामध्ये बुडवावेत. यामुळे ताण कमी होऊन स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. ४. पाय जास्त दुखत असल्यास पायांना, पोटऱ्यांना, टाचांना तेलाने मसाज करावा. झोपताना असा मसाज केल्यास त्याचा फायदा होतो. मसाजमुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते आणि पायांचे दुखणे काही प्रमाणात आटोक्यात येते. ५. नियमित बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. पायाला जखम असल्यास, चिरा पडलेल्या असल्यास पाय पाण्याने स्वच्छ करणे गरजेचे आहे. अन्यथा संसर्ग होऊन चिघळण्याची किंवा त्यातून काही त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. ६. ज्यांना मधुमेह, सांधेदुखी असे त्रास आहेत त्यांनी अनवाणी चालण्याचे व्रत करु नये. शक्य असल्यास इतरांनीही खूप वेळ चालणे, दगदग, प्रवास टाळावा. उपवासामुळे शरीरात ऊर्जा कमी असते. अति चालल्याने त्रास अधिकच वाढू शकतो. विनाकारण थकवा वाढतो.