मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि अध्यात्मिक परिपूर्णता असणे म्हणजे स्वास्थ्यपूर्ण असणे असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) ब्रीद आहे. म्हणजेच मागील कालखंडामध्ये म्हणजेच अनादी काळामध्ये योग आणि आयुर्वेद या दोन गोष्टी भारतामध्ये अत्यंत समृद्ध होत्या हे अनेक उदाहरणांमधून सध्या सिद्ध होत आहे. योग प्रसार जागतिक स्तरावर करणे म्हणजे काय ? आजपर्यंत तो झाला नाही का ? त्याचा उपयोग पश्चिमात्य लोक करून घेतात का ? असे अनेक प्रश्न लोक उपस्थित करतात. योग म्हणजे दोन गोष्टींना जोडणे, मग त्यामध्ये दोन मनुष्य, गुरु शिष्य किंवा आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे काम योग करतो हे सिद्ध आहे. या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार करून भारत देशाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात दोन वर्षापूर्वी केली आणि हळूहळू त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आज १०० च्या वर देश हा योग दिवस साजरा करीत आहेत, भारताच्या प्रत्येंक शहरात आणि गावामध्ये योग प्रशिक्षण विविध प्रकारे दिले जात आहे. प्रथमच या वर्षीपासून NET सारख्या परीक्षांमध्ये योग विषयाचा अंतर्भाव केला गेला आहे, जेणेकरून याकडे सक्षम चरितार्थाकरिता नोकरी आणि व्यवसाय म्हणून पुढील पिढी त्याचा स्विकार करू लागेल. आज देशामध्ये ३० च्या वर विश्वविद्यालय याचे विविध छोटे मोठे व्यावसायिक अभासक्रम यशस्वी रित्या चालवत आहेत आणि याची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. योग विषयाचा अभ्यासक्रम हा प्राथमिक शिक्षणापासून असावा अशीच त्याची ख्याती आहे, जर बालपणापासून श्वसन नियंत्रण, सूक्ष्म व्यायाम, तणाव मुक्तीसाठी योग प्रकार इ जर आपल्या पाल्यास शिकविले गेले तर तणावमुक्त जीवन जगणे, पुढच्या पिढीस शक्य होणार आहे. वाढती स्पर्धा मनुष्याच्या विविध रोगांना आमंत्रित करते हे आपण जाणतो, व्याधीची सुरुवात हि पोट आणि मन येथून होते हे आपण जाणतो, अनैसर्गिक जीवन पद्धती आपण जास्त वापरात असल्यामुळे आपणास सांधेदुखी, खांद्याची हालचाल बंद होणे इ. जाणवत असते. आज पृथ्वीवरील अशांतता , नैसर्गिक आपत्ती, देशांमधील वाढता तणाव, मानवामधील निर्माण झालेली दुरी आणि त्यामधून झालेली आर्थिक दरी, जगण्याची स्पर्धा, भोतिक सुखाकडे वाढत असलेली वाटचाल इ गोष्टी मानव पैलू न शकल्यामुळे निर्माण झालेला मानसिक तणाव, पचन संस्थेचे विकार, निद्रानाश, व्यसनाधिनता, जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा, मुलांच्या वाढत्या समस्या या व अनेक गोष्टीने सर्व जण अत्यंत त्रासून गेलो आहोत. जर आपण पारंपरिक भारतीय जीवन पद्धतीचा विचार केला तर आपण निसर्ग, अध्यात्म, योग आणि तालीम परंपरा यावर आनंदी जीवन जगत होतो परंतु हे विसरल्यामुळे आज आपणास आपल्याच योग पद्धतीचा पुन्हा शास्त्रोक्त अंगीकार करणे गरजेचे आहे. योगासन करणे म्हणजेच फक्त योग असा समज बहुतांशी लोकांनी करून घेतलेला आढळून येतो. मात्र ज्ञानयोग, भक्ती योग, राज योग आणि कर्म योग असे प्रमुख्याने चार योग प्रकार आहेत. सत्संग करणे सुद्धा भक्ती योग मधील प्रकार आहे, आपले नित्य कर्म आणि आणि काम करणे आणि चरितार्थ चालविणे हा कर्म योग मधील प्रमुख प्रकार मनाला जातो, ज्ञान देणे आणि घेणे म्हणजे ज्ञान योग समाजाला जातो आणि अध्यात्म, ध्यान धारणा हे राजयोग मधील प्रकार आहेत. आज सगळ्यांमध्ये असणाऱ्या तणावावर योग हा एक उत्तम उपचार असल्यामुळे आपल्या केंद्र सरकारने त्याला जागतिक स्तरावर नेण्याचे उदिष्ट ठेवले आहे. विदुला शेंडे, योगतज्ज्ञ