हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने बळ कमावण्याचा हंगाम मानला जातो. त्यामुळे पुष्टीदायक, सत्त्वयुक्त अशा गोष्टींचा समावेश या हंगामात आहारात असावा. खजूर हा अशा सत्त्वयुक्त पदार्थापैकी एक आहे.

सहज उपलब्ध होऊ  शकणारा एक पौष्टिक पदार्थ. हिवाळ्यामध्ये तर याची उपयुक्तता अधिकच असते. चवीने मधुर, गुणधर्माने स्निग्ध व पचायला जड पदार्थ हिवाळ्यामध्ये आपले शरीर सहजरीत्या स्वीकारत असते. या काळात वरील सर्व गुणांनी युक्त असा खजूर आपल्या शरीराला निश्चितपणे पुष्टी व बळ देतो. आयुर्वेदाच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्येही खजुराच्या गुणांचा उल्लेख आढळतो.

शरीरामधील पित्तदोषाच्या विकृतीमुळे होणाऱ्या लक्षणाचा उपशम करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. खजुराचे फळ हे हृदयाला अत्यंत हितकर असल्याचे सांगितले आहे. तसेच अत्यंत पौष्टिक करणारे असे त्याचे वर्णन आहे. अतिश्रमाने येणारा थकवा दूर करणारे हे फळ आहे.

खजूर आणि लोण्याचे तूप हा सहयोग उत्कृष्ट शक्तीवर्धक असा आहे. शरीराचे दौर्बल्य कमी करून स्नायूंना बळ देण्याचे कार्य खजूर करतो. पित्तदोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारा थकवा खजुराने कमी होतो. आपल्या अंगी असलेल्या मधुर व शीत गुणधर्मामुळे खजूर हा रक्तपित्तावरही उपयोगी पडतो. खजूर हा शुक्रवर्धन करणारा आहे, असे आयुर्वेद शास्त्र सांगते.

भरपूर पोषणमूल्ये – आधुनिक आहारशास्त्रानेदेखील खजुराला कमी लेखलेले नाही. खजुरामध्ये असलेल्या विविध घटकद्रव्यांचे विश्लेषण आधुनिक आहारशास्त्राने केलेले आहे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या स्वरूपात यामध्ये साखर सापडते. यामध्ये काबरेहायड्रेट्सचे प्रमाण ७५.८% असते. प्रथिने व मेद हे त्यामानाने कमी प्रमाणात आढळतात. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह हे घटक या फळामध्ये सापडतात. त्याप्रमाणे ‘ब’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे यामध्ये प्रामुख्याने असतात.

या फळातून शरीराला मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते. लहान मुलांसाठीही खजूर हे अत्यंत पौष्टिक असे खाद्य आहे.

खजूर घेण्याची पद्धत

  • रात्री खजूर पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी त्यामधील बिया काढून टाकून त्याचे सेवन करावे. यामुळे शरीरास बळ मिळते.
  • खजूर, मनुका आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्यास ते अत्यंत पुष्टीदायक तसेच उत्साहवर्धक ठरते. वृद्ध लोकांना येणाऱ्या अशक्तपणामध्ये खजूर उपयोगी पडतो. वृद्धांना चावण्यास गैरसोयीचे असल्यास खजूर-बी काढून मिक्सरमध्ये टाकून मग दिल्यास व्यवस्थित खाता येतो.
  • बाजारातून आणलेल्या खजूर जसाच्या तसा न वापरता स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. न धुता घेतल्यास त्याबरोबर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या पोटात जाऊन त्रासदायक ठरू शकतात. अर्थात ही गोष्ट प्रत्येक फळाच्या बाबतीत लक्षात ठेवणे आवश्यक आहे.