‘‘विद्यादामलके सर्वान् रसान् लवणवर्जितान्।’’ आवळा हा समस्त भारतभर असणारा एक विशेष वृक्ष आहे. अति प्राचीन किंवा वेदकालापासून आवळ्याचा वापर रोजच्या व्यवहारात; तसेच औषधीकरणासाठी खूप मोठय़ा प्रमाणात होत आहे हे सांगायची गरज नाही. आवळा आमलक, तृष्यफला, धात्री, वयस्था अशा विविध संस्कृत नावांनी ओळखला जातो. आवळ्याचे आपल्या सर्वाच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान या विविध नावांनीच स्पष्ट होते. ‘आमलक’ म्हणजे शरीरात कोणताही घातक मल साठू नये; शरीर सतत निर्मळ राहावे असा अर्थ अभिप्रेत आहे. ‘तृष्यफला’ म्हणजे आवळा वेगवेगळ्या स्वरूपात सेवन केला असताना सेवन करणाऱ्याला तृप्तीचा आनंद लगेचच मिळतो. ‘धात्री’ म्हणजे आपली प्रेमळ आई जशी आपल्या मुलाबाळांची काळजी घेते; तसेच चोख कार्य आवळ्याच्या वापराने सर्वाकरिताच होत असते. ‘वयस्था’ म्हणजे तुम्हा-आम्हाला दीर्घकाळचे निरोगी आयुष्य देण्याकरिता श्री ब्रह्मदेवाने या पृथ्वीवर आवळा वृक्षाची योजना खासकरून केलेली आहे. युनानी व फारसी ग्रंथांमध्ये अनुक्रमे ‘आमलज व आमलह’ असे आवळ्याला संबोधून आपल्या संस्कृत नावाचा - आमलक-चा आदर केलेला दिसतो. युनानी औषधातील ज्वारिश आमला, लूलवी अनोषदारू सादा, अनोषदारू लूलुबी, रोगन आमला, इत्रीफल इ. औषधांत आवळ्याचा खासकरून वापर आहे. थोर थोर पाश्चात्त्य वनस्पतिशास्त्रज्ञ आवळ्याचे अनेकविध गुण विसरून जाऊन; अजूनही आवळ्याच्या मुळात व फुलांच्या गुणधर्माच्या बेडीत अडकलेले दिसतात. त्यांच्या दृष्टीने आवळ्याची पाने, बिया, फांट यापासून तयार केली जाणारी दारू; आवळ्यातील स्थिर व अस्थिर तेल व आवळ्याच्या मुळांतील कातासारखे संकोचनसत्त्व कसे करावे हेच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आवळ्याचे वृक्ष विशेषकरून रूक्ष व उष्ण हवामानात, कमी-अधिक दगड-धोंडे असलेल्या व रेताड जमिनीतही सहजपणे उगवतात. जंगल किंवा अरण्यात असलेले वृक्ष हे खूप उंच असतात. राजस्थान, काठियावाड येथील आवळा वृक्षांची उंची वीस ते तीस फुटांपर्यंत सहज वाढू शकते. अलीकडे ‘अलाहाबादी आवळा’ या नावाने सर्वत्र कलमी आवळ्याची लागवड समस्त उत्तर हिंदुस्थान व महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर; जवळपास वर्षभर चालू असते. ‘समस्त भारतात, शासनातील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तगडे आंदोलन करणारे; श्रीयुत अण्णा हजारे यांनी खास करून आपल्या गाव परिसरात राळेगणसिद्धी येथे आवळ्याच्या लागवडीची मोठी शेती केली आहे.’ त्यांच्याकडील आवळ्याचे नमुने व पुणे बाजारात अलाहाबाद किंवा मध्य प्रदेशातून येणाऱ्या आवळ्यांचे परीक्षण अम्ही आमच्या प्रयोगशाळेत आवर्जून केले. दोन्ही प्रकारच्या आवळ्यांची गुणवत्ता खूप खूप चांगली असल्याचे रिझल्ट आम्हाला मिळाले. देशातील विविध ठिकाणांहून चार-पाच दिवसांचा खास करून आवळे, टोपल्या किंवा विविध प्रकारच्या वेताच्या हाऱ्यामधून येतात. पण ते यत्किंचितही खराब झालेले नसतात हे वैशिष्टय़; ‘आमलक’ या नावाला सार्थ ठरविते. रायआवळा ही संपूर्णपणे भिन्न जात आहे. लहानपणी रायआवळा खाल्ल्यास दात आंबत नाहीत. पण मोठेपणी हा आवळा खायला नकोसा वाटतो. रायआवळ्यात कणभरही औषधी गुणधर्म नाहीत. ‘‘इत्येष च्यवनप्राशो यं प्राश्य च्यवनो मुनि:। जराजर्जरितोऽप्यासीन्नारी नयननन्दन:॥’’ (अ. हृ. उ. स्था. ३९) प्राचीन काळापासून समस्त मानवांना, आपल्याला कदापि म्हातारपण येऊ नये, आपल्या त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत, आपले दैनंदिन काम, मग ते शारीरिक वा बौद्धिक असो; ते खूप आत्मविश्वासाने व ‘दणदणादण’ अशा हिमतीने करावे असे नेहमीच वाटत आले आहे. अशा मानसिकतेमुळेच जगभर च्यवनप्राश या एकमेव बल्य, टॉनिकची खूप ‘चाह’ आहे. माझ्या सौभाग्यवती सौ. लक्ष्मीबाई, मी सकाळी घराबाहेर पडण्याअगोदर मला आठवणीने दोन चमचे च्यवनप्राश आग्रहाने खावयास देते. त्यामुळे मी वर्षांनुवर्षे अजिबात न थकता अनेकविध कामे खूप उत्साहाने करत आहे. श्री. चरकचार्यानी मुक्तकंठाने आवळ्याचा वाजीकरणार्थ खास करून उपयोग सांगितेला असला; तरी जवळपास शंभर-सव्वाशे वात-पित्त-कफप्रधान विकारांवर मात करण्याकरिता आवळ्याचा वापर मुक्तपणे सर्वत्र केला जातो. ताजा पक्व आवळा दीपन, पाचन, पित्तशामक, आनुलोमिक, मूत्रजनन, रोचन, बल्य, पौष्टिक, कान्तिवर्धक, त्वग्रोगनाशक आहे. हे धर्म थोडय़ाबहुत प्रमाणाने आहेत. निरोगी माणसाने ताजे आवळे रोज खाल्ल्यास शरीरातील सर्व क्रिया सुधारून प्रकृती चांगली राहते. या सर्व गुणांवरून ताज्या आवळ्यास रसायन मानले आहे. आवळकाठी स्तम्भन, श्लेष्मघ्न, शोणितस्थापन आणि मोठय़ा मात्रेत पित्तस्रावी व स्रंसन आहे. ताजा व पक्व आवळा आपल्या वापरात असल्यास; सोन्याहून पिवळे असे आरोग्य आपल्याला दीर्घकाळ लाभते याबद्दल कुठेही दुमत नाही. तरीपण शुष्क आवळकाठी एक वर्षांची जुनी जरी असली तरी तिच्यामध्ये शंभर टक्के नाही तरी सत्तर-ऐंशी टक्के औषधी गुण असतात. हे आवळकाठीचे वैशिष्टय़ आहे. आवळ्यात लवणरस सोडून पाचही रस असतात. मध्य प्रेशातील चित्रकूट येथे स्व. नानाजी देशमुख यांनी विश्वमित्र ऋ षींची ख्याती असल्यासारखे नवसृष्टी निर्माणाचे काम; ‘आरोग्यधाम’ असे उभे केले नाहे. त्यांच्या खूप विशाल परिसरात आवळ्याचे अनेकानेक वृक्ष आहेत. त्यांच्या विस्तीर्ण परिसरात व त्यांच्यापासून पाच पन्नास मैल दूर असलेल्या जंगलामध्ये शेकडो आवळ्याची झाडे आहेत. त्यावरील आवळकाठी कशी गोळा केली जाते हे मी तीन वेळा पाहिले आहे. या विस्तीर्ण प्रदेशातील जमिनीवर पडलेली आवळकाठी, प्रथम स्वच्छ धुतली जाते व त्यानंतरही त्या जंगलातच खूप मोठय़ा हंडय़ामध्ये उकडून; जवळील जमिनीवर पसरली जाते, वाळवली जाते व त्यानंतर मुंबईसारख्या बाजारपेठेत विक्रीकरिता पाठविली जाते. माझ्या एका दिवसाच्या वास्तव्यात अशी आवळकाठी मोठय़ा प्रमाणावर खरेदी करण्याकरिता डाबर कंपनीचे अनेक ट्रक उभे असलेले या लेखाच्या निमित्ताने मला आठवतात. तुम्हा-आम्हाला होणाऱ्या सर्वप्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्त विकारांत आवळ्याचा पोटात घेण्याकरिता व बा'ाोपचारार्थ खूप वापर आहे. दिवसेंदिवस तमाम तरुणाई आपल्या केश्य समस्येकरिता खूप जागरूक असते. केसांत कोंडा होणे, खवडे, केस गळणे व पिकणे या चतुर्विध समस्यांकरिता आवळा, गोखरू, गुळवेल या त्रयीपासून तयार केलेले रसायण चूर्ण महिन्या-पंधरा दिवसांतच गुण देते. आवळकाठीपासून बनविलेले आवळा तेल जगभर खूप विश्वासाने तुम्ही आम्ही वापरत असतोच. चेहऱ्याच्या त्वचेवरील तारुण्यपीटिका किंवा पिम्पल यांवर मात करण्याकरिता आवळकाठीचूर्णाचा उपयोग अन्य औषधांबरोबर न चुकता केला जातो. आवळ्यात लवण रस नसल्यामुळेच शरीराचे कशाही प्रकारे कर्षण न करता; उत्तम पोषणार्थ धात्रीरसायन हे विशिष्ट औषध श्री चरकार्यानी आवर्जून सांगितले आहे. आवळ्याच्या शीतवीर्य गुणामुळे शरीरातील रक्तातील उष्णता व तिक्तता कमी केली जातेच, पण त्याचबरोबर रक्त धातू सुधारून बा'ात्वचेला आकर्षक वर्ण प्राप्त होतो. म्हातारपणातील प्रमुख लक्षण म्हणजे त्वचेवरील वाढत्या सुरकुत्या, आवळ्याच्या विविध कल्पांनी महिना-पंधरा दिवसांत कमी होतात. आवळ्याच्या विविध कल्पांच्या वापरामुळे; शरीरातील फाजील चरबी न वाढवता; अस्थि, मज्जा, शुक्र व ओज यांची आरोग्यदायक वाढ होते. काही कारणांनी शरीरातील मलिन मूत्र परमाणूंची संख्या वाढली असल्यास; आवळ्याचे योग्य तऱ्हेने सेवन केल्यास शरीरात उत्तम रोगप्रतिकारकशक्ती येते. ज्या मंडळींना नाइलाजाने दूषित वातावरण व सातत्याने रात्रपाळी व अवेळी काम करावे लागते त्यांनी रसायनचूर्ण नियमितपणे घ्यावे. इयं रसायनवरा त्रिफलाऽक्षयामयापहा। रोपणी त्वग्गदक्लेदमेदोमेह कफास्रजित्॥ या तिन्हीच्या संयोगास त्रिफळा म्हणतात. ती सर्व रसायनांमध्ये श्रेष्ठ, नेत्ररोगनाशन, व्रणरोपण (जखम किंवा व्रण भरविणारी), त्वग्रोग, व्रणस्राव, मेह, मेदरोग, कफ व रक्तपित्त यांचा नाशक आहे. आवळ्याच्या पिवळसर मोठय़ा बियांत आणखी एक उडदाएवढे छोटे बी असते. वाळलेल्या आवळकाठीतील बी फोडावे. त्यात असणारे उडीदडाळीसारखे छोटे बी द'ाात वाटावे व खाज, आग अशी लक्षणे असणाऱ्या त्वचाविकारात आंघोळीच्या अगोदर घासून लावावे. विविध प्रकारच्या आम्लपित्त, उलटी, अॅसिडिटी अशा लक्षणांत कोणताच आंबट पदार्थ कधीच खाता येत नाही. त्याला अपवाद म्हणजे आवळा. त्याकरिता तोंडीलावणी म्हणून आपल्या जेवणात चटणी करावयची असल्यास आवळ्याचा अवश्य समावेश करावा. महिलांच्या प्रदर, धुपणी या विकारांच्या वाढत्या समस्यांच्या निवारणाकरिता आवळकाठी चूर्णासारखे सकाळ-संध्याकाळ घेण्यास योग्य व स्वस्त औषध दुसरे कोणतेही नाही. ज्यांना काही कारणाने बाहेरचे जेवण नेहमीच घ्यावे लागते व खूप तहान लागते त्यांनी भोजनेतर घरी केलेल्या आवळासुपारीचा आस्वाद जरूर घ्यावा. नाइलाजाने विपरीत आहारविहार करावा लागत असेल तर आपल्या रक्तात विविध क्षार, आम्लता व बा'ाकृमींचा संसर्ग होऊ शकतो. त्यांचा निपटा करण्याकरिता आवळ्याची मदत जरूर घ्यावी. मोरावळा सर्वाच्याच परिचयाचा आहे. तो घरगुती केलेला असावा. नेत्रविकार व त्वचाविकारार्थ महात्रफल घृत व महातिक्त घृताचा वापर सत्वर गुण देतो. त्यात आवळ्याचा मोठा सहभाग आहे. विविध गुग्गुळ कल्पात, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा व दंतमंजनात आवळ्याचा समावेश आहे. शरीरात हिम्मत किंवा फायटिंग स्पिरिट येण्याकरिता हिम्मतवटीत आवळ्याची योजना आहे. आगामी कार्तिक महिन्यात आवळीभोजनाला विसरू नये.