‘कंदी बहुविधोसेलो आलु शब्देन भाष्यते। कचालुचैव घंटालु पिंडलु शर्करादिकम्। कांष्ठालु चैव माद्यंस्यात् तस्यभेदा अनेकश:। काष्ठालुक शंखालुक हस्त्यालुकानि कथ्यते। पिण्डालुक सप्तालुक रक्तालकानि चोक्तानि॥ श्री धन्वंतरी भाग १॥ पृ. ३९६ आपल्या धार्मिक सणांच्या निमित्ताने शेंगदाणे, साबुदाणे, रताळे यांपेक्षाही जास्त मोठय़ा प्रमाणात बटाटय़ाचा वापर आवर्जून होत असतो. बटाटा हा परदेशातून आलेला कंद आहे, असा समज असला तरी, प्राचीन श्री चरकसंहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, इत्यादी पुराणग्रंथांत बटाटा या कंदाचे वर्णन आहेच. आलुक, आरूळ, गोलालू, वटालू, वीरसेन (संस्कृत), आलु (हिंदी.), गोलालू (बंगाली.), पापेटा (गुजराथी.), पोटॅटो (इंग्रजी) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या बटाटय़ाची लागवड भारतभर होते. नैनीताल, अल्मोडा, पापरी, लोहुघाट, वीरापुंजी, फरुकाबाद, पाटणा, आसाममधील खासिया पहाड अशा विविध ठिकाणी तसेच महाराष्ट्रात मराठवाडा व धुळे, जळगावकडे बटाटय़ाची विशेष लागवड होते. गेली तीस वर्षे महाराष्ट्रातील कृषी खात्याने आपले सर्व लक्ष बटाटय़ाच्या पिकावर केंद्रित केले आहे. असे प्रसारमाध्यमांचे, टीकेचे बोल वाचावयास मिळतात. आसाममधील बटाटय़ाच्या दोषांमुळे तो दीर्घकाळ टिकू शकत नाही. सात-आठ दिवसांतच तो सडून जातो. बटाटय़ाच्या शेतीला वाळुमिश्रित माती अजिबात चालत नाही, असे शेतीतज्ज्ञ सांगतात. भारतभर बटाटय़ाचे पहाडी, लाल व सफेद अशा तीन जातींची लागवड होते. लाल रंगाच्या बटाटय़ामध्ये पौष्टिक तत्त्व जास्त असते. त्यात मऊ व मुलायम भाग जास्त असल्यामुळे पचनाचे कार्य सुलभ होते. मात्र पांढऱ्या व पिवळ्या जातीच्या बटाटय़ात पिष्टमय पदार्थ अधिक असल्यामुळे त्यांना गुणाच्या दृष्टीने हीन समजले जाते. हिरवा, कच्चा किंवा काळ्या निळसर रंगाचे बटाटे हानीकारक आहेत. त्यांची चवही खराब असते. प्रत्येक बटाटय़ाचे सामान्यपणे तीन भाग असतात. सालीच्या खाली एक रुंद पट्टी असते. ती एकूण बटाटय़ाचा दशांश भाग असते. इतर भाग ८० टक्के असतो. सालीच्या खाली तुलनेने अधिक प्रमाणात खनिज क्षार व प्रोटिक अधिक प्रमाणात असतात. आपण रोजच्या व्यवहारात बटाटय़ाची वरची साल काढून टाकतो. त्यामुळे बटाटय़ाचा बहुमोल भाग गमावतो, हे वाचक मित्रांना माहिती असावे. आपणा सर्वाना बटाटेवडा खूप खूप आवडतो. मुंबई, पुण्यात तर प्रसिद्ध बटाटावडे विक्रेते आहेत. मात्र आर्यलड या युरोपीय देशांत एककाळ बहुतांश नागरिक निव्वळ रताळ्यावरच उपजीविका करत होते, हे किती जणांना माहिती आहे?