स्त्री ही प्रपंचाच्या वर्तुळाचा केंद्रिबदू समजल्यास तिच्या भोवती परिघात फिरणारे सर्वच असतात. तिची प्रकृती नीट सांभाळली गेली तर ती कुटुंबातील इतर घटकांकडे लक्ष पुरवू शकते म्हणूनच तिच्या आरोग्यात काही प्रमुख टप्प्यांचा, घटकांचा या वर्षांत काही प्रमाणात आपण आढावा घेतला. स्त्री-आरोग्यजीवनातील पहिला टप्पा म्हणजे मासिक पाळीचा प्रारंभ. वयाच्या आठव्या वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंत कधीही याची चाहूल जाणवते. त्यानंतर दरमहा येणारी मासिक पाळी, त्याचा कालावधी आपण अभ्यासला. स्त्री-जीवनातील प्रत्येक टप्प्याचा विचार करताना जसा शारीरिक आरोग्याचा विचार करतो तसेच तिचे मानसिक आरोग्यही जपायला हवे. विशेषत: मुलीला वाढवताना केला जाणारा भेदभाव वा लहान-मोठय़ा वयाप्रमाणे त्या मुलीकडे दिले गेलेले लक्ष, अभ्यासातील कमी-अधिक हुशारीमुळे होणारी तुलना, वागण्या-दिसण्यातील तफावत याचा नकळत तौलनिक विचार मुलींकडून वाढत्या वयाप्रमाणे होतो. वयात आल्यानंतर पौगंडावस्थतेतील शारीरिक बदलाबरोबरच मानसिक बदल तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणतात. शिक्षणाची जबाबदारी तसेच काही जणींना अकाली नोकरी करून कुटुंब सांभाळावे लागते, काहींचे लवकर लग्न करून दिले जाते तर काहींचे लग्न वयोपरत्वे होण्यास अडचणी येतात. अशा वेळी अशा विविध स्तरांतील स्त्रियांची मानसिकताही बदलत जाते. कुटुंबातील ताणतणाव, वयोपरत्वे वाटणारं लैंगिक विषयांबद्दलचे आकर्षण यामुळे मुलींच्या अध्ययनाची गती मंदावते. मासिक पाळीतील अनारोग्यामुळे जसा जंतुसंसर्ग होतो तसाच काहीवेळेस अकाली स्त्री-पुरुषसंबंध आल्यास जंतुसंसर्ग जाणवू लागतो. यामुळे मानसिक संतुलन बिघडून स्त्री चिडचिड करू लागते, तसेच काही मुली आजूबाजूच्या वातावरणामुळे व्यसनाधीनही होतात. स्वत:कडे अधिक लक्ष देणाऱ्या मुलींचे एक वेगळे विश्व निर्माण होते, अशा वेळी पालकांनी व शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, तरच त्यांचा कल अध्ययनाकडे व क्रीडाक्षेत्राकडे वळू लागेल. मानसिक पाठबळाची गरज विवाहित स्त्री ही स्वत:च्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष काही अंशी देते पण दररोज बदलणाऱ्या मानसिकतेकडे लक्ष दिले जात नाही. अधिक ताण आल्यास थायरॉईड, मधुमेह यांसारखे आजार बळावतात वा आनुवंशिकतेने येणारा मधुमेह आधीच बळावतो. जर विवाहित स्त्रीला लहान मूल असेल तर त्याला वाढविणे ही सर्वस्वी तिचीच जबाबदारी समजल्यामुळे घरात वावरताना तिला शारीरिक व मानसिक दडपण येते. यातूनच पुढे उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक नराश्य, निद्रानाश अशा गोष्टी उद्भवतात. याचवेळेस वैवाहिक जीवनात तिला क्षय, एड्स वा कर्करोग उद्भवला तर या व्याधींच्या इलाजाबरोबरच घरातील सर्वाच्या मानसिक पाठबळाची तिला गरज भासते, तरच ती परिस्थितीशी झुंज देऊ शकते. यानंतर वय येते ते स्त्रीच्या नोकरीतील विरामचिन्हाचं, पण आपल्यासाठी तिने काम करतच राहावे असे सर्वानाच वाटत असते. स्त्रीच्या आरोग्यानुसार रजोनिवृत्ती कालात व गर्भारपणात होणारा मानसिक ताण हा गंभीर विषय होऊ शकतो. या मानसिक बदलांकडे फार गौणपणे पाहिले जाते. काही वेळेस नियमित व्यवहार चालू असले तरी स्त्रीला एकाकीपणाची भावना होते, रडू येते, चिडचिड होते, कधी कधी आत्महत्येचे विचार येतात. अशा वेळी स्त्रियांनी छंद, मित्र-मत्रिणी यांचा आधार घेणे गरजेचे आहे. स्त्री-आरोग्याची त्रिसूत्री स्त्रीचे आरोग्य टिकवून ठेवण्याची त्रिसूत्री म्हणजे आहार, व्यायाम आणि विचार. आहारामुळे स्थूलता येणार नाही याची काळजी घेणे. उच्च रक्तदाबाकडे आपण जात नाही ना हे पाहणे तसेच आनुवंशिकतेने मधुमेह, हायपोथायरॉईड झाल्यास त्याची त्वरित उपाययोजना करणे हे महत्त्वाचे. व्यायाम प्रकारात सर्व प्रकारचे व्यायाम येतात अगदी योगासनापासून ते ऐरोबिक्सपर्यंत आपल्याला कोणता व्यायाम उचित आहे पडताळून पाहावे. रोजचा चालण्याचा व्यायाम तुमची स्थूलता कमी करू शकत नाही पण तुमची कार्यक्षमता वाढवू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार. आपली प्रगती कशी होईल इथे लक्ष द्यावे, तसेच इतरांसाठी आपण किती सुखकारक परिस्थिती निर्माण करू शकतो हे पाहिल्यास वयाचा विसर पडून आलेल्या वा येणाऱ्या रजोनिवृत्तीस सकारात्मक पद्धतीने स्वीकारता येईल. डॉ. रश्मी फडणवीस, rashmifadnavis46@gmail.com स्त्रीरोगतज्ज्ञ