अर्जुन कषाय रस, शीतवीर्य, हृदयाला हितकर, रक्तस्तंभक, श्रमतृष्णानिवारक, व्रणशोधक, कान्तिजनक, बल्य पण वातवर्धक आहे. नाना तऱ्हेचे रक्तविकार; क्षय या विकारातील क्षत, प्रमेहपीटिका, प्रमेह, फाजील चरबी, अस्थिभंग, दाह, पांडू, मूत्रकृच्छ, भस्मक रोग इत्यादी कफ-पित्त विकारांत उपयुक्त आहे. अर्जुनसालीच्या वापराने अशक्त व गलितगात्र माणसाचे हृदय सशक्त व सतत उत्तेजित राहते. त्याच्या तुरट रसामुळे कफघ्न, त्वच्य, विषघ्न हे गुण आहेत. आधुनिक मताप्रमाणे त्यात Anticoaglant कर्म - प्रतिरक्तस्तंभन गुण आहेत. वृक्ष आयुर्वेदातील श्लोक ३०, ११६, २००, २११, २७३, २७६, २७७ व ३२३ यातून अर्जुन लागवडविषयक रोचक माहिती मिळते सुखी माणसाने आपल्या घराजवळ एरंड, कांचन, श्लेष्मांतक (भोंकर) करंज व अर्जुनाची झाडे लावू नयेत. मोहरी, अर्जुनफुले, वावडिंग, हळद व सशाचे मांस यांच्या मिश्रणाची धुरा दिल्यास अर्जुनाला अत्यंत शुद्ध व चांगली फुले, फळे येतात. विविध झाडांच्या जखमा वड, उंबर, मेण, मध व तूप यांच्या मिश्रणाच्या लेपाने भरून येतात. तोच धागा पकडून वृक्षांमधून पाण्याचा अकारण पाझर बंद करायचा असल्यास धावडा, श्रीपर्णिका, काळे निशोत्तर, वेत व अर्जुनाच्या सालींचा वापर करावा. तसाच उपयोग मानवी शरीरात होतो. अर्जुनाची साल खूप धारदार शस्त्रांनी काढण्याचा प्रयत्न केल्यास अर्जुन वृक्षाचा नाश होतो. अर्जुनसालीची चटणी व माती यांच्या मिश्रणात कोणतेही बी लवकर रुजते. अर्जुनाच्या परिसरात भरपूर पाऊस पडतो म्हणून अर्जुनाची लागवड भरपूर करावी. माझ्या ४८ वर्षांच्या चिकित्सा अनुभवात अर्जुनाचा वाटा विलक्षण आहे. एक दिवस एका उत्तर प्रदेशीय सैनिकाच्या हृदयाच्या झडपेला भोक असल्याने शस्त्रकर्माचा सल्ला दिला गेला होता. या रुग्णाला शस्त्रकर्माची धास्ती होती. ‘एअर फोर्समधील निवृत्त पण आता डॉक्टर’ अशी किंचित प्रसिद्धी पावलेल्या बैदजीकडे आला. रोगाबद्दल चर्चा झाली. डोळ्यासमोर ग्रंथात वाचलेले अर्जुन क्षीरपाक औषध होते. अर्जुनसालीच्या दहापट पाणी व दूध घेऊन सर्व एकत्र आटवावे. गाळून ते दूध घ्यावे. अशा एक दिवसाच्या अर्जुन क्षीरपाकाकरिता २० ग्रॅम अर्जुनसाल घ्यावी. त्या सैनिकाने प्रामाणिकपणे असे अर्जुनसिद्ध दूध घ्यायला सुरुवात केली. त्याला थोडा उत्साह आला. दोन आठवडय़ांनंतर रुग्णालयात सर्जनाने तपासले. क्षीण रक्तदाबात सुधारणा झाली होती. आणखी दोन महिने अर्जुन क्षीरपाक चालूच राहिला. तीन महिन्यांनी सर्जन महाशयांनी त्या सैनिकाला शस्त्रकर्माची गरज नाही असे सांगून त्याच्या ‘पेरेन्ट युनिट’ला पाठवून दिले. एकदा एका वाहणाऱ्या इसब रुग्णाकरिता भरपूर जळवा लावल्या. जळवा काढल्यानंतर काही ठिकाणचे रक्त थांबेना. साधारणपणे हळदचूर्ण चेपल्याबरोबर रक्तस्राव थांबतो. मला एकदम अर्जुनसालीचा रक्तस्तंभक गुण आठवला. लगेच अर्जुन चूर्ण आणले. रक्त वाहणाऱ्या जागेवर दाबले. रक्तस्राव तत्क्षणी थांबला. अर्जुनाची साल ही हृद्रोगाकरिता प्रशस्त आहेस, त्यामुळे वाढता रक्तदाब कमी होतो, ‘हार्ट सुरक्षित राहते’ अशा काहीशा गोड समजुती अनेकांच्या आहेत. अर्जुनसालीत मोठय़ा प्रमाणावर क्षार, राख तुरट द्रव्य असते. त्याच्या शीत व स्तंभक गुणांमुळे लहान रक्तवाहिन्यांचे आकुंचन होऊन रक्ताभिसरण करणाऱ्या मोठय़ा रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. त्यानंतर हृदयाचे कार्य सुधारते. अर्जुनसाल ‘डायरेक्ट’ हृदयाचे कार्य सुधारत नाही. अर्जुनसालीच्या वापराने रक्तवाहिन्या संकुचित राहून रक्तदाबक्षय विकारात उपयोग होतो. अतिदाब रक्तविकारात किंवा निरोगी माणसाने केवळ अर्जुनसालीचाच वापर करू नये. एकदा एक उंच गृहस्थ अनेक ‘हार्ट ब्लॉक’ आहेतच, अशा तक्रारी घेऊन आले. थोडा विचार केला. खूप उंच म्हणजे अस्थिसार. अस्थिसार उंच माणसाच्या शरीरातील रक्ताभिसरणाला इतरांच्या तुलनेत काही जादा इंच जागा मिळते असा माझा ‘कॉमनसेन्सचा’ विश्वासू दावा! हे गृहस्थ मुलाकडून चॉकलेटचे बारच्या बार यायचे म्हणून भरपूर चॉकलेट खायचे. तो सर्व चाकोबार - रक्तवाहिन्यात ब्लॉक करून बसला होता. माझी नेहमीची रक्तातील चरबीची औषधे आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ, चंद्रप्रभा, अम्लपित्तवटी रसायन चूर्ण व सोबत अर्जुनारिष्ट सुरू केले. सहा महिन्यांत सर्व हार्ट ब्लॉक दूर झाले. ते गृहस्थ श्री. के. के. भिडे नंतर अमेरिकेत जाऊन आले. ही सर्व अर्जुनसाल व अन्य औषधांची कृपा!