भारतात आपल्याला सहाही ॠतू अनुभवायला मिळतात. प्रत्येक ॠतूचा आपल्या शरीरावर सकारात्मक-नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रकारांनी ॠतूचर्या व त्याप्रमाणे दिनचर्या योजलेली दिसून येते. या आधारे आहार व विहाराचा बदल करून त्या ॠतूमध्ये शरीर स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करता येतो व पुढच्या ॠतूत अभिप्रेत असे शरीर योजता येते. उन्हाळ्याचा झळा तीव्र झाल्या आहेत. उन्हाचा त्रास तसा कोणालाच सहन होत नाही. उष्णतेचे दिवस किंबहुना लहान मुलांचा अपवाद वगळता सर्वानाच अप्रिय असतो. परंतु ज्या भारतात गेल्या दशकापासून व संपुर्ण जगात गेल्या दोन दशकांपासून स्थुलतेचे अर्थात जाड होण्याचे प्रमाण हे प्रमाणापेक्षा अधिक झाले आहे, त्यांच्याकरीता हा ॠतू आनंद वार्ता देवून जाऊ शकतो. कारण, ज्यासाठी स्थूल व्यक्ती विविध परिश्रम घेतो त्या परिश्रमांना मूर्त रुप देण्याचे काम हा ॠतू करू शकतो. घाम येणारा ॠतू असल्याने शरीर स्वास्थ्य मेदाशी संलग्न असलेला ‘एचटूओ’ हा पाण्याचा तंतू या ॠतूत आहे. निसर्गच घामाद्वारे काढतो. या पाठोपाठ मेदाचे विलयनही निसर्ग करण्यास सहाय्य करतो. अर्थातच निसर्गाची ही हाक त्या व्यक्तीने ओळखायला हवी. कोणतेही अती परिश्रम न करता मेदाचे विलयन करण्यासाठी उन्हाळ्यातील तीन महिने अत्यंत फलदायी. स्थूलता ही एक समस्या शरीराबरोबर मनालाही भेडसावणारी आहे. बारीक व्यक्ती दिसली की, स्थूल व्यक्तीच्या मनात निराशेची एक रेघ ओढली जाते. वजन काटय़ावर उभे राहिले व किंचित ही काटा पूर्वी पेक्षा पुढे सरकला तर निराशा. कपडे घेतांना नंबर वाढला तर विचारूच नका. स्थुलतेतील सौंदर्य आदी असे अनेक लेख, मते मांडली गेली तरी बारीक होणे, असणे हा बिंदू मनाच्या पटलावरून जात नाही. हे होत असताना स्थुलतेमधील अनुवंशिकता हा विचार मनाला पटणार नाही हे सत्य मानतात. भारतात व विशेषत महाराष्ट्रात स्थुलतेविषयी जागरूकता खूप झाली आहे. परंतु निश्चित व नेमके उत्तर शोधण्यात संपुर्ण आयुष्य निघुन जाते. नेमका विचार केल्यास हे कठीण नाही असे लक्षात येईल. बारीक होण्यासाठी स्थूलतेला समजून घेण्यात कुणीच यशस्वी होत नाही व तत्कालीन फायद्याच्या विचारात नियोजन कोलमडते. हा ॠतू मात्र स्थूल व्यक्तींना परमोच्च आनंद देवू शकतो फक्त गरज योग्य नियोजनाची. स्थुलता वाढविणारा आहार तसा या ऋतू मध्ये निशिग्ध सांगितला असला तरी त्याचे सेवन केले जाते. जड पदार्थ टाळावे, चणादाळ, उडिद, मोड आलेले धान्य, गव्हाचे पदार्थ, नागलीचे पदार्थ, तुपात तेलात तळलेले मैदाचे पदार्थ पूर्णत टाळावे. पोहे व पोह्य़ाचे पदार्थ टाळावे. विविध प्रकारच्या ‘डेझर्ट’च्या मोहात पडू नये. चाट हा प्रकार या ऋतूतच अधिक खाल्ला जातो. तो टाळावा. उपवास व उपवासाचे पदार्थ पूर्णत टाळलेले बरे. तसे स्थूलांनी उपवास करू नये. एकाच वेळी खूप खाल्ल्याने जडत्व येते हे विसरता कामा नये. सलाड खाण्यास योग्य ऋतू आहे. परंतु, पाणीदार सलाडचे पदार्थ, जलकण वाढवून वजन वाढण्यास मदत करते. म्हणून वाफवलेले व चवीसाठी सैंधव मीठ टाकलेली कोबी, फ्लॉवर, सलाडचे पान, ब्रोकोली यावर जोर द्यावा. काकडी, टोमॅटो कमी वा टाळलेले बरे. थंड पदार्थ टाळावे. जेणेकरून जठरात म्हणजे पचण्याचा अग्नि उत्तम राहिल हे लक्षात असू द्या. स्थुलांनी बर्फ, थंड पेय, ऊसाचा रस यापासून दूर रहावे. बारीक व्हाल. भाजलेले अन्न, धान्य पदार्थ अत्यंत लाभदायक ठरू शकतात. उन्हाळ्यातील उत्तम पेय पाणी, लिंबाचा रस, आल्याचा रस, सैंधव व चवी पुरती साखर किंवा ‘स्टिव्हीया’ टाकून केल्यास चवदार पेय होते. पाणी, उन्हाळा व स्थूलता आयुर्वेद शास्त्राने पाणी म्हणजे जीवन सांगताना पाणी म्हणजे कफ, कफ म्हणजे मेद धातू असे वर्णन केले आहे. हे तत्व लक्षात घ्या. मेदाचे कर्षण करावयाचे असेल तर पाणी नेमके घेणे आवश्यक आहे. चर्बीतील पाण्याचा उपयोग शरीराची तहान भागविण्यासाठी करावा. उन्हाळ्यात तहान खूप लागते. कारण शरीरातील जल उन्हाने कमी होते. स्थूल व्यक्तींनी थोडय़ा थोडय़ा वेळाने जमल्यास थोडे पण गरजेपुरते पाणी सेवन केल्यास चर्बीचे विलयन होण्यास सहाय्य मिळते. या पाण्यात वाळा, नागरमोथा, खदीर, देवदार, तुळस या पैकी एक वा सगळे टाकून पाण्याचे सेवन करावे. फायदा होतो. हृद्य रुग्णांनी दालचिनी टाकल्यास अधिक लाभ मिळतो. अनैसर्गिक गोड द्रव्य टाकून पाणी वा सरबत सेवन केल्यास वजन अधिक वाढेल. जेवणानंतर व रात्री झोपतांना गरमच पाणी स्थूल व्यक्तींनी घ्यावे. पंखा वा वातानुकुलीत वातावरण टाळावे. एका बाजुने पथ्य पाळत थंड हवेत बसलात किंवा झोपलात तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. तांब्याच्या भांडय़ात अहोरात्र पाणी ठेवून नंतर गरम सेवन केल्याने अधिक लाभ मिळतो. स्थूल व्यक्तींनी दूधामध्ये पाव पट पाणी सेवन करावे. त्यात केवळ दालचिनी वा वेलची टाकून केल्यास अधिक लाभ होतो. तसेच शक्यतो तांदूळ व तांदळाचे पदार्थ सेवन करावे. तांदळाच्या पीठाचे घावणे हे शक्ती देणारे व तृप्ती देणारे आहे. गोड पदार्थ टाळावेत. घाम अधिक आणणारा व्यायाम वजन आखणी लवकर कमी करतो. व्यायाम करतांना व नंतर लिंबू, सैंधव, आले, खडी साखर टाकून केलेल पाणी घ्यावे. कोकम सरबत, सोल कढी हे शरीराला तृप्ती देणारे आहेत. सरळ रेषेत पंख्याची हवा वा वातानुकूलीत वातावरणात झोपणे स्थुलांनी टाळल्यास मेदाचा क्षय होण्याबरोबर इतर फायदे होतात. घाम काढणे, फिरणे ही प्रक्रिया निसर्गाद्वारे होते. उन्हाळा कोणासाठी काहीही असेल. परंतु स्थूल व्यक्तींना तीन महिन्यांत दोन ते चार इंच जाडी कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास नक्कीच फायदेशीर ठरतो.