शरीराला सुखद वाटणारा हिवाळा मागे पडून आता उन्हाळा प्रवेश करत आहे. उन्हाच्या लाहीपासून बचाव करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांनीच आजार बळावतात. चुकीचे उपचार करण्यापेक्षा उन्हापासून बचाव करण्यासाठी नेमके कोणते छत्र वापरावे त्याची माहिती देणारा हा लेख. हिवाळ्याच्या सुखद वातावरणानंतर हवेतील उष्मा वाढत जाऊन सूर्यकिरणांची प्रखरता वसंत व ग्रीष्माची चाहूल देत असताना आरोग्यविषयक तक्रारी डोके वर काढतात. हेमंत व शिशिर ऋतूमध्ये थंडी असल्याने ठरावीक प्रकृती व वाताच्या तक्रारी सोडल्यास हे ऋतू त्रासदायक ठरत नाहीत. परंतु, वसंत ऋतू तसा नसतो. शरीरात संचित झालेल्या कफाचे उन्हाच्या तीव्रपणामुळे विचलन होण्यास सुरुवात होते. हा कफ अनेक तक्रारींना निमंत्रण देण्यास सुरुवात करतो. वाढत्या तापमानाचा पित्तप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींना त्रास होतो. अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. या महिन्यात पाण्याचे गुणधर्म बदलतात. जडत्व येते. पचनास अडचणी निर्माण होतात. एकतर अग्नी कमी होतो, त्यात पाणी जड. तहान भागत नाही. सारखे पाणी पिऊन भूक मरते व पोटाच्या तक्रारी उफाळून येतात. पाण्यामुळे पोटात दुखणे, तोंडाचा कोरडेपणा, पोट फुगणे, सकाळी नुसते पाण्यासारखे जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे किंवा पोटाच्या तक्रारींना आधुनिक दृष्टिकोनातून ‘जीवाणू संसर्ग’, ‘बॅसिलरी डायसलेनरी’ अशी विविध नावे आहेत. पोटाच्या लक्षणांबरोबर संपूर्ण अंग गरम होणे, ताप येणे, थंडी वाजणे ही लक्षणे असतात. या ऋतूमध्ये आपण विचार केल्यास जे करू नये ते तुम्ही-आम्ही करतो. सकाळी गारवा असतो म्हणून कामावर चहा घेतो, नाश्ता करतो. दुपारी जेवण करतो. नंतर बाहेरील वाढत्या उष्णतेमुळे भरपूर पाणी पितो. जेवणानंतर पुन्हा उष्णता आहे म्हणून थंड पेय, लस्सी, उसाचा रस घेतो. पुन्हा थोडय़ा वेळात चहा घेतो. घरी किंवा बाहेर पडल्यावर कमी-अधिक फरकाने आपण याच पद्धतीने विविध पेये पोटात ढकलत असतो. ही वागण्याची पद्धत आहे का? आपण चुकतोय हे आपल्याला समजत असूनही मनाचा मोह आवरता येत नाही. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे डोळ्यांची आग, तळपायाची आग, पोटात दाह होतो. अशक्तपणा, भूक कमी होणे, जुलाब होणे, तोंड कडू पडणे आदी आरोग्यविषयक तक्रारींना आपण आपल्या चुकांमुळे निमंत्रण देतो. आपल्या दिनचर्येत आपण किती बदल करू शकतो हा वादाचा विषय ठरेल. कारण आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या कितपत पाळता येते, हा अनेकांचा प्रश्न असतो. मात्र असे विकार होणार नाहीत, इतपत बदल आपण नक्कीच करू शकतो. यासाठी दिवसभर प्राधान्याने काय घ्यायचे आहे हे ठरवावे लागेल. चहा घेत असाल तर तो अर्धा कप प्यावा (आयुर्वेदीय चहा सध्या उपलब्ध आहे). थंड पेय घेत असाल तर किंचित गार असे घ्या. गरम व थंड एकत्र करू नका. ते विरुद्ध आहे. अग्नी बिघडून जाईल. उन्हात दही घेऊ नका. कारण दही हे स्पर्शाने थंड व स्वभावाने उष्ण आहे. थंड दह्य़ाने कफ वाढतो. भूक मंदावते, घाम अधिक प्रमाणात येतो. पोट फुगते. परंतु त्याच दह्य़ात पाणी टाकून चमच्याने हलविले तर तयार होणाऱ्या ताकाचे गुणधर्म बदलतात. ‘संस्कार गुणवर्धनम्’ म्हणजे दह्य़ावर झालेल्या पाण्याच्या संस्कारामुळे उष्णता कमी होते. ताकात धने, जिरे, कोथिंबीर, आले टाकले तर ते औषधच. कारण शरीरात गारवा निर्माण होतो. यामुळे भूक वाढण्यास मदत होते व लघवीच्या तक्रारी कमी होतात. बर्फ टाकलेल्या पाण्यामुळे घशाच्या तक्रारी निर्माण होतात. सतत पाणी प्यायल्यामुळे भूक मंदावते. अजीर्णचा त्रास होण्याचा संभव असल्याने पाणी जपून प्यावे. पोटाच्या तक्रारी वाढल्या तर जेवणावर नियंत्रण ठेवणे हितावह. हलका आहार घ्यावा. तळलेले पदार्थ कमी प्रमाणात घ्या. शरीरावर विविध पेयांचा भडिमार करण्यापेक्षा खडीसाखर खा. उन्हाळ्यात फळांचा उपयोग उत्तम. द्राक्ष व उसाचा उपयोग करा. बाहेर तसेच घरी असणाऱ्या मंडळींनी पाण्यामध्ये आले टाकून प्यायले तर फायदा अधिक होईल. आले किंवा सुंठ (अर्धा चमचा एक लिटर पाण्यामध्ये) टाकून उकळणे. भूक कायम राहते, पाण्यामुळे येणारे जडत्व नाहीसे होते. कफाचा त्रास कमी होतो. ज्यांना लघवीची तक्रार आहे, जळजळ तसेच दाह होत असल्यास त्याच पाण्यात धने व जिरे सम प्रमाणात अर्धा चमचा टाकून उकळावे. यामुळे त्रास टाळता येईल. स्थूल प्रकृती असेल व सारखी तहान लागत असेल तर त्यात लालचंदन, खैर असे टाकून प्यावे. तहान कमी होईल, थकवा येणार नाही. केरळमध्ये लोक अशाच प्रकारचे औषधी जल सोबत घेऊन फिरतात. काहीजण सोबत ताकही ठेवतात. त्यामुळे तेथे आरोग्यविषयक तक्रारी उद्भवण्याचे प्रमाण कमी आहे. आपल्याकडेही केरळी पद्धतीचा अवलंब केला तर फायदेशीर ठरेल. उन्हाळ्यात दुपारी झोप येते. थकवा येतो, गरगरते. अशा वेळी दुपारी न झोपता थोडे गरम पाणी प्यायल्यास, लिंबू सरबत, कोकम सरबत फळांचा प्रमाणात उपयोग केल्यास फायदा होतो. दुपारी झोपल्यास कफाची वाढ होते. स्थूल व्यक्ती आणखी स्थूल होते. स्थूल व्यक्तींना वजन प्रमाणात आणण्यासाठी उन्हाळ्यासारखा ऋतू नाही. बाल व वृद्ध मात्र यासाठी अपवाद ठरतात. औषधी चिकित्सेचा विचार केला तर गरगर होणे, चक्कर येणे, अंधारी येणे यासाठी सूतशेर २-२ गोळ्या दोन वेळा, सूतशेखर, कामदुधावटी, गोदंती भस्म, प्रवाळ कामदुधावटी आदींचा वापर केल्यास लाभ होईल. मात्र व्यक्तिपरत्वे ते बदलते. कफ प्रकृतीसाठी तालीसादी चूर्ण त्यात लक्ष्मीविलास गोळ्या तसेच यष्टिमधु घालून घेतल्यास फायदा होतो. घशातील खवखव, दमा यासाठी खादिरादी किंवा कर्परादीवटीचा वापर करावा, अनेकांना पायात गोळे येणे अशी तक्रार जाणवत आहे. यासाठी लोणीयुक्त ताक, राजगिरा दुधात घालून खाणे, साळीच्या लाह्य़ांचा चिवडा, सूप घेणे, कांद्याचा अधिक उपयोग, अंजीर खाणे, काळे मनुके खाणे, जर्दाळू खाणे याने स्फूर्ती कायम राहते.