भारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी, पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते. तसेच त्यांना योग्य सन्मान दिला असून त्यांचे पूजनही केले आहे. रामायणातील जटायूच्या कथेमध्ये हेच महत्त्वाचे तत्त्व दाखवलेले दिसते. सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातली एक प्रसिद्ध कथा समजली जाते. सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमाग्रे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला. रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्रांची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली. प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले. ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यमधील टाकेदतीर्थ हे होय. येथे पक्षी रूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला. नाशिकवरून इगतपुरी घोटीमाग्रे टाकेदचे अंतर ४८ किमी आहे. जटायूमुळे हे टाकेद तीर्थ पावन झाले. नाशिकपासून जवळच असलेले हे ठिकाण. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात. आड-औंढा-पट्टा-बितिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. इथेच वसले आहे टाकेदतीर्थ. भंडारदरा इथूनसुद्धा हे अंतर ४५ किलोमीटर इतके आहे. रतनगड-भंडारदरा या सहलीमध्ये सुद्धा टाकेदला भेट देता येईल.जटायूचा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जिथे झाले ते जटायू मंदिर मात्र दुर्मीळच म्हणायला हवे. आशुतोष बापट - ashutosh.treks@gmail.com