पहाटे तीनला घर सोडल्यावर म्हणजे डेक्कनवरून २-३ तासांत दिवेघाटात पोहोचता येतं, कारण सहानंतर रस्ता बंदच झालेला असतो जवळपास. एवढय़ा पहाटेची लगबग केवळ त्या वारीतला माऊली पाहण्यासाठी.

हो माऊली. वारीत लहान-मोठा, स्त्री-पुरुष असा भेद नसतो, तिथे सगळे माऊलीच.

‘मा’ माय,‘ऊ’ उदार, ‘ली’ लीन..

पाच वर्षांच्या बालकापासून ते ९० वर्षांच्या आजोबापर्यंत सर्वच माऊली. किती चेहरे आणि त्यांच्या कथा; पण कोणाच्याच चेहऱ्यावर थकवा नाही की त्रासिक भाव नाही. वेगळंच समाधान आणि अपूर्वाईची चमक घेऊन हा वैष्णवाचा मेळा चाललेला असतो. त्या दिवशी दिवेघाटाचा रंगच वेगळा असतो. एरव्ही रूक्ष वाटणारा तो मार्ग केशरी आणि पांढऱ्या रंगाने खुलून गेलेला असतो. यात मजा येते गावाकडच्या भोळ्याभाबडय़ा आजींचे फोटो काढताना. त्यांना फोटो काढून घेण्यात प्रचंड आवड असते. फोटो काढला की तो पाहाण्याचा अगदी लहान मुलाप्रमाणे हट्ट करणार आणि आवडला तर गोड हसणार किंवा मग, ‘पदर नाय डोक्यावर, पुन्यांदा पुन्यांदा’ असं नाराजीच्या पण हक्काच्या सुरात सांगणार. टाळ आणि मृदंगाच्या ठेक्यात नाचणारे ६०-७० वर्षांचे ‘तरुण’ पाहिले की आलेला थकवा कुठल्या कुठे निघून जातो. टाळ वाजवत वाजवत नाचताना सुरू होणारी त्यांची स्पर्धा पाहण्यात वेगळीच मजा येते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि एकमेकांना नाचत दिलेले आव्हान अभंग संपतो तेव्हा एकमेकांच्या पाया पडून संपलेले असते, कारण वारीत एक पद्धत आहे. इथे लहान-मोठा कोणी नाही आणि इथे मत्सराला जागा  नाही.