रत्नागिरीहून सागरी मार्गाने राजापूरकडे जाताना वाटेत धारतळे नावाचे गाव लागते. धारतळय़ावरून उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यास आपण नाटे गावाच्या दिशेने जातो. एकदा हा गर्दीचा रस्ता मागे सोडला, की डाव्या बाजूस फार कमी लोकांना माहीत असलेला यशवंत गड दिसतो. तिथून पुढे दोन किलोमीटर गेल्यावर उजव्या बाजूस आंबोळगडचा फाटा लागतो व सरळ रस्ता पुढे मुसाकाझी बंदरास जातो. कौटुंबिक सहलीसाठी आंबोळगड उत्तम ठिकाण आहे. तिथून जवळच पुढे आंबोळगड चौपाटी आहे. चौपाटीवर मासेमारीची सुंदर जहाजे नांगर टाकून उभी केलेली दिसतात. आणखी दोनशे मीटर पुढे गेल्यावर रस्त्याचा उजवीकडे गडाचे अवशेष दिसतात. हा आंबोळगड. ३० फूट वर चढल्यावर गडाची ढासळलेली भिंत दिसते. हा गड चौकोनी असून, त्याच्या पडलेल्या भिंतींवरून गडाच्या सीमारेषांचा अंदाज येतो. गडाच्या मधोमध ऐश्वर्यशाली व राजेशाही थाट असलेले वडाचे झाड जणू त्या गडावर सत्ता गाजवत आहे असे भासते. तिथे असणारी घनदाट झाडे सूर्यकिरणांना आत शिरण्यास मज्जाव करतात असे वाटते. परत मुख्य रस्त्यावर येऊन २०० मीटर पुढे गेल्यावर अफाट पसरलेल्या पठाराचा भाग दिसतो. तिथून सरळ पुढे गेल्यावर रस्ता एक वळसा घेऊन संपतो. तिथेच आंबोळगडला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाडय़ांचा शेवटचा थांबा आहे. त्याचा डाव्या बाजूस गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आश्रमाच्या कंपाऊंडमध्ये एक सुंदर दत्त मंदिर आहे. तुम्ही आश्रमाच्या मागच्या बाजूने समुद्राकडे गेलात तर तिथे अनेक प्रेरणादायी स्थळे आपली वाट पाहत आहेत असे वाटते. हे पठार डोंगराच्या कडेला संपते. याच कडय़ापासून समुद्र ४०-५० फूट खोल आहे. समुद्राच्या लाटा सतत गडाच्या दगडी कठडय़ाला येऊन आदळतात आणि त्यामुळे निर्माण होणारे शुभ्र फेसाळ कारंजे आल्हाददायक वाटतात. याच ठिकाणी गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या व ध्यानधारणा केली होती. आश्रमात प्रवेश न करता पठाराच्या कडेने उजव्या बाजूला चालत गेल्यास आपण भूमी व समुद्र यांचा अद्भुत संगमाचे अफाट सौंदर्य पाहू शकतो. डॉ. वि. ग. गोखले - viraggokhale@yahoo.com आवाहन लोक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहित नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या. ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलिकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा. भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता. आमचा पत्ता - लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल - १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१० ई-मेल - lokbhramanti@gmail.com