इतिहासकाळी कोकण किनारी ८४ बंदरांचा थाट होता. कालौघात ही बंदरे नाहीशी झाली किंवा कार्यरत नसली तरी त्या इतिहासाचा अनुभव आजदेखील कोकणात घेता येतो. रात्रीच्या प्रकाशात बंदरापासून दूर उभी राहणारी बोट, लाटांच्या वरखाली लयीबरोबर पडाव- खपाटा – मचव्यातून उतरलेले प्रवासी आणि गावाकडच्या प्रवासाची आणि बंदरांच्या इतिहासाची यादगार अनुभूती घ्यायची असेल तर जुन्या नावाडय़ांना भेटायला बंदरावरच गेलेच पाहिजे.

कोकणचा समुद्रकिनारा दंतूर असल्यामुळे प्रत्येक नदीच्या मुखाशी बंदरे निर्माण झाली. ही बंदरे सम्राट अशोकापासून कार्यरत होती. याचा इतिहास वैभवशाली असून तो उपलब्ध आहे. सातवाहनकाळात रोम, ग्रीक, पर्शिया, अरब, चीन, मध्य आशिया या देशांचा समुद्रव्यापार या बंदरांतून कार्यरत होता. टॉलेमी, पेरिप्लस, प्लीनी, स्त्रोबो, माकरेपोलो इत्यादी प्रवाशांनी अपरान्तातील ८४ बंदरांचा उल्लेख आपल्या पुस्तकातून केला आहे.

प्राचीन काळात बंदरे म्हणजे विदेशातील रागरंग मजेने पाहण्याची खिडक्या आणि फाटके (कवाडे) होती. या फाटकांतून व्यापारी मालांची देवाणघेवाण होत होती.  परदेशी माल बैल, उंट, घोडे, गाढव यांच्या तांडय़ांमधून सार्थवाहक म्हणजे संघपती अथवा सिंघवी, व्यापाऱ्यांचा माल नदीतून सह्य़ाद्रीच्या घाटमार्गे, नगरांच्या बाजारपेठेत सुरक्षित पोहोचवीत. पैठण, तेर, उज्जयिनी, जुन्नर, करहाटक (कऱ्हाड), धेनुकाकटक (अमरावती), डहाणूका ही व्यापारी  शहरे प्रसिद्ध होती. या व्यापारी मार्गावरच देशीविदेशी व्यापाऱ्यांनी, राजांनी, संन्याशांनी गुहा, गुंफा, लेणी, स्तूप, दुर्ग मंदिरे निर्माण केली.

सातवाहन काळातील म्हणजेच इ.स.पूर्व २५० पासून रोमन, पर्शिया, आफ्रिकेशी आपल्या व्यापारी संबंधांचे उल्लेख सापडतात. सागवान, शिसवी, रेशमी कापड, हस्तिदंत, मीठ, मसाले आपल्याकडून जायचे, तर कच्चे लोखंड, पोलाद, रत्नमाणके आशियातून आपल्याकडे यायची. इजिप्तमधील टायर आणि सिडान या बंदरांशी आपला व्यापार खुला होता.

कोकणच्या भूभागावर राज्य केलेल्या सर्वानीच या बंदरांतून होणाऱ्या व्यापाराला महत्त्व दिलेले दिसते. दुसऱ्या शतकात क्षत्रपांच्या काळात बंदरांवरआलेलं बंधन विक्रमादित्याने चौथ्या-पाचव्या शतकात हटवले. सहाव्या शतकात चालुक्यांच्या काळात  रोम साम्राज्याशी व्यापार कमी झाला, पण इराणशी वाढला. सातव्या शतकात राष्ट्रकुटांच्या वेळी अरेबियन लोकांचे संदर्भदेखील येतात. आठव्या शतकापासून पुढे चारशे वर्षे ही बंदरे शिलाहारांकडे होती. पंधराव्या शतकानंतर तुर्काचं प्राबल्य होतं. नंतर आदिलशाही आणि मग पुढे मराठय़ांचा अंमल या बंदरावर राहिला आहे.

तीन-चार शिडांच्या अजस्र बोटी अशा व्यापारी बोटींना कोटिंबा आणि गलबत म्हटले जायचे, तर विजयदुर्ग, संगमेश्वर येथील नावडी, कल्याण येथे जहाजं बांधली जायची. ‘नावडी’ बंदरातील बांधलेल्या गलबतांना ‘संगमेश्वरी’ गलबते म्हटली जात. बंदरांचे कामकाज सांभाळणारा मुद्राध्यक्ष, पण्याध्यक्ष असा अधिकारी वर्ग अशी व्यवस्था होती.

कालौघात बंदरांचे वैभव कमी होत गेले; पण ‘गाव संस्कृतीने’ ही बंदरे अजून टिकवून ठेवली आहेत. रत्नागिरीतील तिवरी, मालगुंड, पावस, रणपार, पूर्णगड ही छोटी छोटी बंदरे आपली मने गावखाडीतून सुखावून सोडतात. वेत्ये, आंबोळगड तर आपल्या समोर निसर्गाचा चमत्कार उभा करतो. नाटे, जैतापूर, मुसाकाझी, खारेपाटण, मालवण, वेंगुर्ले ही नावेच कानात बोटीचा भोंगा वाजल्याचा आवाज उमटवतात.

कोकण बोटीच्या प्रवासाची एक आगळीच संस्कृती स्वातंत्र्यपूर्व काळात नांदत होती, याच्या पुनर्प्रत्ययाचा अनुभव सतत रुंजी घालत राहतो. अजूनही सकाळच्या वेळी कोळी बांधवांची चाललेली मासेमारी, नांगरलेल्या होडय़ा, पसरलेल्या जाळी, गलबतांची (ट्रॉलर)ची मरम्मत करणारी कामे, प्रवाशांची गडबड, दालदी- खाखी- भंडारी- हेटकरी- गाबीत- भोई – संगमेश्वरी- कोंकणी – गोंयेंच्या बोली भाषेचा लहेजा, पहारे करणारे दीपस्तंभ, समुद्रात उभे असलेले बोये, नाही तर खडक, भोवती पसरलेला खाऱ्या वाऱ्याचा दर्प, भरती-ओहोटीचे हलकेच चाललेले लाटांचे तरंग, चिखलावरील छोटय़ा जीवांची हालचाल, त्यांना पकडायची समुद्रपक्ष्यांची धडपड, इकडून तिकडे थव्यांनी जाणाऱ्या चगार, टिंबली, बगळय़ा पक्ष्यांच्या रांगा आणि बंदरावरील हॉटेलातून घमघमणारा भज्यांचा वास, हे समुद्राचे वैभव बंदरातून टिपून घेण्याकरिता कोकणच्या बंदरावरची भटकंती करायला काय हरकत आहे!