ऊंचच ऊंच पर्वत रांगा, खळाळत वाहणाऱ्या वारणा-कोयनासारख्या नद्या आणि हिरवीगार वनराई यामुळे पश्चिम घाटाचे क्षेत्र हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. तेथे सुंदर अशा विविध फुलांनी नटलेले कास पठार आहे. कोयना- राधानगरी अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध तर आहेच, पण पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जंगलात वाघ असणे हे समृद्ध जंगलाचं प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे कामही केले जाते. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते तिथे जंगल हे सर्वदृष्टीने परिपूर्ण मानले जाते. जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न असलेले हे क्षेत्र निम सदाहरित जंगल असून दुर्गम, अतिउतार असलेले, डोंगराळ आणि घनदाट स्वरूपाचे हे जंगल आहे. या भागात सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. पश्चिम घाटातील वनसंपदा पाहिली तर थक्क व्हायला होते. जवळपास साडेचार हजार प्रजातीच्या वनस्पती येथे असल्याचा अंदाज आहे. ऑíकड फुलाच्या २४५ प्रजाती येथे आढळतात. रानतेरडा वनस्पतीच्या ७२ तर कंदी फुलांच्या ४६ प्रजाती आढळतात. कारवीच्या १८ प्रजाती आढळतात. २०१० मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सह्यद्री व्याघ्र प्रकल्पात महत्त्वपूर्ण पाणलोट क्षेत्र आहेत. अनेक झरे तसेच वारणा आणि कोयना नद्याही येथूनच उगम पावतात. सह्यद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर निम सदाहरित वृक्षराजीने नटलेला आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौ.किमी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौ.किमी असे मिळून हे क्षेत्र सह्यद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यच्या सह्यद्रीच्या डोंगररांगांत कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. त्यामुळे जंगल पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कसे पोहोचाल? विमान : पुणे २१० किलोमीटर रेल्वे: मिरज जंक्शन ११० किलोमीटर, कोल्हापूर ८० किलोमीटर, कराड ६० किलोमीटर रस्ता: कोयना नगर: कोल्हापूर- १३० किलोमीटर कराड- ५६ किलोमीटर, सातारा ९० किलोमीटर बामणोली/तापोळा: सातारा- ४० किलोमीटर, सातारा- महाबळेश्वर-तापोळा- ९० किलोमीटर. drsurkhe.mulay@gmail.com