मदनगड हे नाव पट्टीच्या ट्रेकर्सना परिचित आहे. परंतु हौस म्हणून ट्रेकिंग करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये अजून हे नाव दाखल झालं नाही.
भंडारदऱ्याजवळचा हा गड. हौस म्हणून ट्रेक करणाऱ्यांनी या ट्रेकच्या वाटेलाही जाऊ नये. या किल्ल्याच्या नावावरून किंवा एकंदर याचं रूप पाहून, ‘हा काय लगेच सर करू’, असं पटकन् तोंडून बाहेर पडेल आणि तिथेच तुम्ही फसाल. यवतमाळचा अनुप पुण्यातील काही मित्रांबरोबर मदनगडच्या ट्रेकला गेला आणि त्याला हे उमगलंच. त्याला आलेला अनुभव खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे.
मदनगडला जायचं ठरल्यावर मुख्य म्हणजे कुणीतरी अनुभवी असणं हे गरजेचं होतं. याचं मुख्य कारण म्हणजे हा गड चढणं सोपं नव्हतं. अवघड वाटा आणि क्लायंबिंग मोठय़ा प्रमाणावर असल्याने कुठेही रिस्क घेऊन चालणार नव्हती. म्हणूनच क्लायंबिंगचा अनुभव असलेले विकास सातारकर खास या ग्रुपबरोबर होते. ‘भाऊ’ म्हणून ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असलेले विकास सातारकर ‘क्लायबिंग एक्सपर्ट’ मानले जातात. स्नेहा गोहाड, श्रीधर जोशी, ओम आपटे, भूषण जोशी, मनोज केळकर, किर्ती केळकर, सागर अमराळे, हर्षद छत्रे असा हा ग्रुप मदनगडच्या पायथ्याशी पोहोचला.
सुरूवातीलाच गड पाहिल्यावर हा काय कुणीही चढेल अशी यातल्या कित्येकजणांची मनोमन खात्रीच झाली. खालून वर गडाकडे पाहिल्यावर ही वाट तर खूपच सोपी आहे, असं जाणवतं, परंतु अध्र्या रस्त्यात जेव्हा पायऱ्या संपतात तेव्हा हा किल्ला कसा आहे याची खऱ्या अर्थाने कल्पना येते, असं मत अनुपने व्यक्त केलं.
किल्ल्यावर जाण्यासाठी सुरुवातीला पायऱ्या लागतात. परंतु मध्यावर आल्यावर पुढे पायऱ्याच नाहीत आणि आता यापुढचा रस्ता फक्त क्लायंबिंग करून चढायचा आहे, हे कळल्यावर मात्र या ग्रुपच्या तोंडचं पाणीच पळालं. पण, बरोबर भाऊंसारखे अनुभवी ट्रेकर असल्याने कुठल्याही मोठय़ा त्रासाला तोंड द्यावं लागलं नाही हेही तितकच खरं!
पाच हजार फूट उंच या गडावर अध्र्या रस्त्यापर्यंतच पायऱ्या आहेत. त्यातून पुढे चाळीस फूट फक्त क्लायंबिंग करावं लागतं. खालून पाहिल्यास अतिशय सोप्पी वाटणारी वाट अध्र्यावर पोहोचल्यावरच कळते तेव्हा उपाय म्हणजे एकतर पुढे जाणं किंवा खाली उतरून पुन्हा दुसऱ्या मार्गाने गड चढणं. पण, खाली उतरून वेळ घालवणं यांच्या जिद्दी स्वभावाला पटणारं नव्हतं. ठरल्यावेळेप्रमाणे ही मोहीम फत्ते करायचीच होती.
या ग्रुपमधील अनुपने यापूर्वी खास शिवाजी महाराजांचे किल्ले सर केले आहेत. त्यात तो एक्सपर्टही मानला जातो. तब्बल १६८ किल्ले सर केलेल्या अनुपच्याही तोंडचं पाणी यावेळी पळाले होते. मग, नवख्यांची काय बात! अनुप म्हणतो, ‘‘हा प्रसंग वाचताना कदाचित तुम्हाला हसू येईल. पण माझा शेवट जवळ आला असंच त्यावेळी मला वाटलं. मदनगडला ४० फूट क्लायंबिंग करताना एक चढ अतिशय अवघड आहे. हा चढ मी चढलो आणि माझी नजर माझ्या मोबाईलवर गेली तर रेंज होती. ती शेवटची घटका समजून मी माझ्या बहिणीला तिथून फोन केला आणि तिला माझा अकाऊंट नंबर व त्याचा पासवर्ड असं सर्व काही सांगितलं. कुठून ही बुद्धी सुचली माहीत नाही. पण त्यावेळी हा सर्व प्रकार मी केला होता. असा हा मदनगड थरकाप उडवणाराच आहे. हा चाळीस फुटाचा  चढ चढण्याकरता तब्बल तीन तास लागले. त्यानंतर वर गेल्यावर मात्र निसर्गाने केलेला आविष्कार पाहताना मन कुठे रमलं हेच कळलं नाही. अर्थात उतरतानाही मोठय़ा प्रमाणावर कसरत झाली हा भाग निराळाच.’’
मदनगडला जायचं असल्यास नोव्हेंबर ते मार्च या सिझनमध्येच जावं. पावसाळ्यात या गडाचं नावंही तोंडून घेऊ नये. रोप बांधून एकमेकांना चढवताना आणि तिथे एकमेकांचे चेहरे पाहताना खरंच तो प्रसंग किती बिकट होता, याची जाणीव आज या ग्रुपला होत आहे.
असं म्हणतात की, या गडाच्या पायऱ्या खूप चांगल्या होत्या. पण ब्रिटीशांनी त्या पायऱ्या तोडल्या. कारण स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतिकारक लपण्यासाठी या गडाचा उपयोग करीत. कुणीही तिथे जाऊन लपू नये म्हणून ब्रिटीशांनी त्या पायऱ्या तोडल्या.
एरवी इतर किल्ल्यांवर वर्षभरात अनेक ग्रुप्स चढाई करत असतात. पण मदनगडावर मात्र वर्षांतून फक्त चार ते जास्तीत जास्त पाच ग्रुप्सची चढाई होते. या गडाच्या वाटेला जायचं तर पट्टीचा एक्सपर्ट हवा अन्यथा याच्या वाटेला जाऊच नये, असंही ऐकिवात येतं.
अनुप ‘रेंजर्स पुणे’ हा ग्रुप चालवत असून, सध्याच्या घडीला त्याच्या ग्रुपमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ३०० मेंबर्स आहेत. विदर्भात यवतमाळ येथे राहणाऱ्या अनुपला ट्रेकिंगची आवड लहानपणापासूनच होती, तो दर दोन महिन्याला किमान नवीन सात ते आठ किल्ले सर करतोच. नुकतंच त्याने त्याची पत्नी सारीका, उत्तम पाटील, आयुष ठाकरे यांच्यासह तीन दिवसात ‘मांगी तुंगी’, ‘न्हावी’, ‘अंगाई टंगाई’, ‘काटरा’, ‘मेसना’ असे किल्ले सर केले.
फेब्रुवारीमध्ये समुद्राजवळचे किल्ले किंवा पुन्हा एकदा मदनगड सर करण्याचे प्लॅन ‘रेंजर्स पुणे’ यांच्यासमोर आहेत.
prabha.kumbhar@gmail.com
|