ज्येष्ठ आषाढातल्या कमी-अधिक पाऊसधारांनी तृप्त, तजेल झालेली धरती श्रावणात अनोख्या हिरव्या लावण्याने धुंद होते. मृद्गंधाने, लता, झाडांच्या नवपर्णाने नानाविध टवटवीत फुलांच्या उदयाने व ऊन पावसाच्या पाठशिवणीच्या खेळाने भारावलेली, मोहोरलेली असते. उसळत, घुसळत खळखळत नद्या-नाले, निर्झर, तलाव, सरोवर ‘आले नवे नवे पाणी’ असे मूकपणे गात स्वैर वाहत असतात. समुद्राच्या घनगंभीर गाजेची तीव्रता वाढलेली असते. काळ्या-पांढऱ्या मेघांनी झाकोळलेल्या नभात संध्यासमयी सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान प्रकटते. निसर्गाच्या या लोभसवाण्या रूपाने श्रावण महिन्यात सृष्टी प्रसन्नचित्त होते. असे श्रावण-सौंदर्य अनुभवायला डोंगर-दऱ्यांच्या गावात अधिक मजा येते उंच डोंगरमाथ्यावर टेकलेले काळे ढग जलाभिषेक करत असतात. त्यातून दुधाळ जलगंगा प्रकटून धबधब्याच्या रूपात कडेकपारीतून दऱ्याखोऱ्यातून वाहत असतात. खोल खोल दरीतून काळसर धुक्याचा लोट उफाळून येतो व तो आसमंत झाकोळून टाकतो. सपाट मैदानावर विस्तीर्ण पसरलेली हिरवी तृणपाती, लुसलुशीत गवत-चारा खाण्यात गुरे- वासरे, शेळ्या मेंढय़ांचे कळप मग्न झालेले दिसतात. कुबेराचे धन गवसल्याचा आनंदच ते लुटत असतात. सपाट जागेत गुडघाभर चिखलपाण्यात ओणवे उभे राहत डोक्यावर इरले घेऊन भर पावसात कष्ट करीत भूमिपुत्र भातशेतीची क्लिष्ट कामे करण्यात गढलेली बघून ‘नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी’ या गदिमांच्या काव्यपंक्तींची प्रचीती येते. श्रावण महिना म्हणजे पुष्पोत्सवाचा काळ. झाडे, लता-वेलींवर दाटलेल्या हिरव्या टवटवीत तजेलदार पानापानातून उमलत असलेली चित्रविचित्र आकारांची, नयनरम्य रंगांची व नानाविध सुगंधाची फुलेच फुले बघून निसर्ग-चमत्काराने आपण थक्क होतो. जाई-जुई, सायलीचा बहर, धुंदफुंद मोगरा, घमघमणारी रातराणी, पारिजातकाचा सडा, ब्रह्मकमळाचा उदय, सप्तरंगांनी बहरलेलेल गुलाबचे ताटवे यांतून फुलराणीच दिसते. ‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे’ अशा यथोचित शब्दसुमनांच्या पायघडय़ा घालत बालकवी श्रावणाचे स्वागत करतात. ‘श्रावणात घननिळा बरसला’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, ‘चिंब पावसानं झालं आबादानी’, ‘बांगडय़ा बघा या.. श्रावण लावण्यराज लागला फुलाया’ अशी काव्यसुमने श्रावणावर थोर प्रतिभावंत कवी उधळतात. सौंदर्य, सुगंध, स्वर, साहित्याने भारावलेला श्रावण ‘या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे’ अशी ऊर्मी देतो. मनुष्याला मुक्तहस्ते निसर्गदान देणाऱ्या त्या निर्मात्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी, त्याप्रति आदरभाव प्रकट करण्यासाठी पूर्वसुरींनी श्रावणाची निवड केली असावी. म्हणून अनेक धार्मिक सण, उपास-तापास, व्रतवैकल्ये, पोथी-पुराणे यांची रेलचेल या पवित्र पुण्यदायी महिन्यात असते. धार्मिकता, सात्त्विकता व संयम या सत्प्रवृत्तींचा पायाच श्रावणात घातला जातो. विजय भदाणे श्रावण धारा नाच नाचती श्रावण धारा सोनेरी ऊन अधूनमधून हिरवाईने बहरे तृप्त धारा ओढाळ जलातून खळाळती धून गगनी उमटे इंद्रधनूचा पिसारा सृष्टी गेली लावण्यात हरवून मनात नाचला प्रीतमोर बावरा गाली उमटवू दे धुंद पावसाची खूण विजय रघुनाथ भदाणे