‘केबीसी’च्या हॉट सीटवर कोहिमाबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘जानते है, लेकिन मानते नही’ असं म्हणणाऱ्या जाहिरातीमुळे तमाम प्रेक्षकांचं केबीसीच्या नव्या सीझनच्या जाहिरातींनी लक्ष वेधून घेतलं आहे. काय होती या जाहिरातींमागची प्रक्रिया?

‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर विचारल्या गेलेल्या कोहिमाबद्दलच्या प्रश्नाला लाइफलाइन मागणारी पूर्वाचलातील ती तरुणी ‘जानते सब गै, लेकिन मानते कहाँ है’ असं उत्तर देते आणि तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं जातं. खरं तर अमिताभ बच्चन यांच्या अँकिरगमुळे ‘केबीसी’च्या कार्यक्रमांना जाहिरातींची गरजच नाही, असं कुणालाही वाटेल. पण गेले काही दिवस ‘केबीसी’च्या नवीन सीझनच्या जाहिरातींनी सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एवढंच नाही तर हा सीझनही नक्की बघायचा या निश्चयापर्यंत त्यांना नेऊन ठेवलं आहे. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांच्या अँकिरगइतक्याच या जाहिरातीही प्रभावी ठरल्या आहेत.
कोणतेही उत्पादन खपवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्याचे योग्य मार्केटिंग. जाहिरातीच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून लोकांमध्ये उत्पादनाबद्दल उत्सुकता जागवली की उत्पादकाचे निम्मे काम पूर्ण होते. नवीन येणाऱ्या मालिका किंवा कार्यक्रमांबाबतसुद्धा हाच नियम लागू पडतो. त्यातून अगदी ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या महामंचाचीसुद्धा सुटका नाही. या शोची कमान जितकी महानायक अमिताभ बच्चनच्या हातात आहे तितकीच शो सुरू होण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या जाहिरातींवरसुद्धा आहे.
‘केबीसी’च्या चौथ्या पर्वापासून प्रत्येक पर्वासाठी वेगवेगळ्या टॅगलाइन्स वापरून जाहिरातींचा मोहरा त्याच्याभोवती फिरवला गेला. चौथ्या पर्वातील ‘कोई भी इन्सान छोटा नहीं होता’पासून सुरुवात करत यंदा आठव्या पर्वासाठी ‘यहाँ पे पैसे ही नहीं दिल भी जिते जाते हैं’पर्यंतचा प्रवास ‘केबीसी’ने आतापर्यंत केला आहे. यंदाच्या पर्वातील टॅगलाइनबद्दल सांगताना सोनी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड नचिकेत पंतवैद्य म्हणाले, ‘आतापर्यंत केबीसीचा खेळ हॉटसीटवर बसलेला स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतच मर्यादित होता, पण त्यापुढे जाऊन आम्हाला या खेळाशी प्रेक्षकांना आणि हॉटसीटपर्यंत पोहोचू न शकलेल्या स्पर्धकांनासुद्धा जोडायचे होते. त्यामुळे इथे तुम्ही केवळ पैसे नाही तर मनंसुद्धा जिंकता हे सांगण्याचा प्रयत्न यंदा करण्यात येणार आहे. केबीसी म्हणजे मुंबई अशीही समजूत लोकांची झाली होती, तीही यानिमित्ताने पुसून टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.’ या टॅगलाइनला केंद्रस्थानी ठेवून आतापर्यंत तीन जाहिराती बनवण्यात आल्या आहेत. त्यातील पहिल्या जाहिरातीमध्ये ईशान्येकडील राज्यांना देण्यात येणाऱ्या सापत्न वागणुकीचा मुद्दा उचलण्यात आला होता, तर दुसऱ्या जाहिरातीमध्ये हिंदू-मुसलमान ऐक्यावर भाष्य करण्यात आले होते. तिसरी जाहिरात या दोन्हींपेक्षा हलक्याफुलक्या थीमची आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा केवळ आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेल्या गल्लीचे चित्रण करण्यात आले होते.
‘केबीसी’च्या प्रत्येक पर्वातील जाहिरातींमध्ये त्या वेळच्या एखाद्या सामाजिक मुद्दय़ावर भाष्य केले जाते. यंदाही तसाच काहीसा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगताना, जाहिरातींचे दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, ‘सध्या ईशान्येकडील राज्यातील मुलांना मिळणारी सापत्न वागणुकीबाबत चर्चा होत आहे. मध्यंतरी त्यावरून गुन्हेगारी घटनाही घडल्या. त्याला केंद्रस्थानी ठेवून ही पहिली जाहिरात बनवण्यात आली आहे. पहिल्याच प्रश्नावर लाइफलाइन घेताना हॉटसीटवर बसलेल्या त्या मुलीच्या मनात त्यामागे एक ठाम उद्देश असतो. तिला लोकांकडून केवळ उत्तर नको असते, तर त्यांना वास्तवाचे भान करून द्यायचे असते.’ ‘केबीसी’ची दुसरी जाहिरात हिंदू-मुसलमान ऐक्यावर आधारलेली आहे. ‘आम्ही जेव्हा जाहिरातीसाठी हा विषय ठरवला, तेव्हा नेहमीप्रमाणे साचेबद्ध पद्धतीने जाहिरात करायची नाही, हे आम्ही ठरवले होते. ही जाहिरात एकीकडे दोन वेगळ्या धर्मावर भाष्य करत असली, तरी दुसरीकडे ती दोन पिढय़ांमधील संबंधावरसुद्धा बोट ठेवते. जाहिरातीमध्ये केबीसीमध्ये जाणारा मुलगा घरातला लहान, बुजरा मुलगा दाखवला आहे. त्याच्या तुलनेने त्याचे भाऊ आणि मुसलमान मुलं रागीट आणि तापट स्वभावाची आहेत. या दोन्ही घरांमधील नात्यांमध्ये या मुलामुळे काही बदल होतील, अशी कल्पनाही कोणाच्या मनात नसताना, तोच या घरांमधील संबंध सुधारण्यासाठी पाऊल उचलताना दिसतो.’ असे पंतवैद्य यांनी सांगितले.
या संकल्पनांमागील आपली भूमिका स्पष्ट करताना पंतवैद्य म्हणाले, ‘सध्या आपण आर्थिक स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि या मंचावर येणारा माणूस केवळ पैसे जिंकायच्या उद्देशाने येत नाही, तर तो सोबत आठवणीसुद्धा घेऊन जातो. गेल्या कित्येक पर्वामध्ये आम्ही ‘केबीसी’शी भावनिकरीत्या जुळलेल्या लोकांची उदाहरणे पाहिली आहेत. हेच लक्षात ठेवून आम्हीही यंदा केवळ बक्षीस जिंकण्यावर भर देणार नसून सोबतच सर्वाची मनेही जोडणार आहोत. याचेच एक पाऊल म्हणून ‘केबीसी’च्या मागील पर्वामध्ये पैशाशिवाय इतर कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडल्या गेलेल्या लोकांचा शोधही आम्ही घेणार आहोत.’
अर्थात यासाठी जाहिरातीसाठी विचारले गेलेले प्रश्नही तितकेच चतुराईने निवडणे महत्त्वाचे होते. त्याबद्दल बोलताना तिवारी म्हणाले, ‘पहिल्या जाहिरातीसाठी कोहिमा शहराविषयीचा प्रश्न विचारण्यात आला होता. तसं पाहता तो सोप्पा प्रश्न होता, पण केवळ प्रश्न नव्हता, तर त्याच्याशी ईशान्येकडील लोकांचा संबंध जोडायचा होता; तर दुसऱ्या जाहिरातीमध्येसुद्धा जेव्हा चाचा ‘खुदा तुम्हें सलामत रखे’ असे उत्तर देतो, तेव्हा फक्त उत्तर देत नाही तर त्याला आशीर्वादसुद्धा देत आहे. हा योग आम्हाला जुळवून घ्यायचा होता, म्हणून प्रश्नांची निवडही तितक्याच बारकाईने करण्यात आली होती.’
अर्थात या जाहिराती प्रभावी बनवण्यामागे अमिताभ बच्चन यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती, हे सांगताना ते म्हणाले, ‘कोहिमाच्या जाहिरातीच्या वेळी, ‘इसका जवाब तो सभी जानते हैं’ हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर आलेले मिश्कील हसू, त्यांना त्या मुलीचा लाइफलाइन घेण्यामागचा उद्देश ठाऊक होता, हे सांगून जातं. तर तिसऱ्या जाहिरातीमध्ये स्पर्धकाने ‘ये परिवार ही है’ असे म्हटल्यावर कोडे सुटल्याचा आविर्भाव कुठलाही दिग्दर्शक अभिनेत्याला समजावून सांगू शकत नाही. ते अभिनेत्याकडे उपजत असावे लागते. ती किमया अमिताभ बच्चन यांनी साधली आहे.’
थोडक्यात यंदाच्या केबीसीच्या या जाहिरातींच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरात पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.