‘लोकप्रभा’च्या सदर लेखिका आणि ‘लोकसत्ता’च्या विशेष प्रतिनिधी अरुंधती जोशी यांना ‘लोकप्रभा’तील ‘मनमुक्ता’ या सदरासाठी लाडली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लिंगभेदाविरोधात केल्या जाणाऱ्या संवेदनशील लेखनाबद्दल लाडली पुरस्कार दर वर्षी दिले जातात. २०१६ मध्ये ‘मनमुक्ता’ या त्यांच्या सदरातून त्यांनी लिंगभेदाविरोधात ठाम भूमिका घेतली तसेच लिंगसमानतेचा आग्रह धरला आहे. जाहिराती, चित्रपट, निवडणुका, समाजमाध्यमं, क्रीडा, फॅशन, करिअर, प्रथा, परंपरा या सर्वातून मांडल्या जाणाऱ्या स्त्री जीवनाच्या विविध पैलूंचे त्यांनी या सदरातून परखड विश्लेषण केले आहे. साचेबद्ध, पारंपरिक विचारसरणीच्या माध्यमातून स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या वृत्तीला विरोध करणाऱ्या लेखनाचा गौरव या पुरस्काराच्या निमित्ताने झाला आहे. २०१६ या वर्षांतील ‘लोकप्रभा’तील लेखनाला मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे. यापूर्वी भीमाशंकर अभयारण्यातील भीमाशंकर मंदिरामुळे वाढलेल्या धार्मिक पर्यटनामुळे वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाचे भीषण वास्तव मांडणाऱ्या ‘लोकप्रभा’चे खास प्रतिनिधी सुहास जोशी यांच्या ‘भीमाशंकराच्या मस्तकी कचऱ्याची गंगा’ या वृत्तांकनाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर शोधपत्रकारिता पुरस्कार’ देण्यात आला. या दोघांचेही ‘लोकप्रभा’ परिवारातर्फे अभिनंदन.