lp22सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवलेल्या ‘किल्ला’मध्ये दिग्दर्शकाच्या अनुभवाचंच प्रतिबिंब पडलेले आहे. जे आपण अनुभवलय, पाहिलंय तेच मांडतो असं तो सांगतो. चित्रपटाच्या निमित्ताने या तरुण दिग्दर्शकाशी बातचीत..

गेल्या वर्ष-दीड वर्षांत काही मराठी चित्रपटांनी अनेक पठडीबाहेरच्या विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करून मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. ‘किल्ला’ हा त्याच वाटेवरचा एक महत्त्वाचा चित्रपट. अविनाश अरुण या तरुण दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट आणि तोदेखील थेट राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटवलेला. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून पुरस्कार मिळवलेला हा चित्रपट काहीसा वेगळ्या धाटणीच्या कथानकाच्या अंगाने जाणारा असला तरी त्याच वेळी सर्वसामान्यांनादेखील आपला वाटावा असा असल्यामुळे सध्या सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.
फोटो गॅलरीः राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला’
सरकारी नोकरी करणारी विधवा आई आणि सातवीत शिकणारा तिचा मुलगा या दोघांच्या भावविश्वाची गुंफण, ताणतणाव, सततच्या बदलीमुळे बदलत राहणारं सोबत्यांचं विश्व आणि त्यातून निर्माण झालेली भावभावनांची आणखी एक पातळी असा पट उलगडणारा ‘किल्ला’ आज प्रदर्शित होतोय. चित्रपट हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे, हे अगदी सहजपणे ठसवणाऱ्या या चित्रपटातून दिग्दर्शकाचं व्यक्त होणं हे वारंवार जाणवतं. चित्रपटातील अत्यंत बोलक्या फ्रेम्समुळे दृश्य प्रतिमांचा थेटच प्रभाव पडतो. पदार्पणातच हे यश मिळवणाऱ्या अविनाशशी संवाद साधल्यावर जाणवते ती त्याची चित्रपटनिर्मितीची असोशी. अत्यंत साधेपणाने वावरणाऱ्या अविनाशच्या रक्तात चित्रपट पूर्णपणे भिनला आहे, तो चित्रपट जगतोय हेच त्याच्या बोलण्यातून सतत जाणवत राहतं.
अविनाशच्या या प्रवासामागे असलेली वडिलांची प्रेरणा वारंवार त्याच्या बोलण्यातून जाणवत राहते. तो सांगतो, ‘‘वडिलांचं चित्रपटप्रेम माझ्यात उतरलं आहे. त्यांच्यामुळे लहानपणीच मला अनेक चांगल्या कलाकृतींची ओळख झाली. या माध्यमाने जणू काही मला खेचूनच घेतलं. त्यामुळेच लहानपणापासूनच या क्षेत्रात जायचं हेच डोक्यात होत. चित्रपटप्रेमाला आकार देण्याचं श्रेय एफटीआयआयला जातं. दहावीपासूनच मी एफटीआयआयच्या गेटला धडका मारू लागलो.’’ त्या वेळी एफटीआयआयमध्ये व्हिडीओग्राफीच्या बारा दिवसांच्या कोर्सला केवळ बाराच विद्यार्थ्यांना प्रवेश होता, ही त्याची संधी हुकली. पण वेस्टर्न क्लासिकल म्युझिक अॅप्रिसिएशनच्या कोर्सच्या माध्यमातून तो एफटीआयमध्ये शिरला आणि विषयाची तळमळ पाहून lp23व्हिडीओग्राफीच्या कोर्सचा तेरावा विद्यार्थी म्हणून त्याला प्रवेश मिळाला. (ही घटना अपवाद ठरावी अशीच आहे). अविनाशच्या दृश्य प्रतिमांना आकार देण्यामध्ये ही घटना महत्त्वाची ठरली.
पुढच्या दहा वर्षांच्या काळात एफटीआय हेच माझं विश्व बनून राहिल्याचं अविनाश नमूद करतो. अनेक अभ्यासक्रमांतून, उपक्रमांतून, दिग्गजांशी झालेल्या ओळखीतून खूप शिकायला मिळालं. तेथूनच उमेदवारी सुरू झाली. सुमित्रा भावेंच्या एका चित्रपटासाठी त्यानं सेटिंग बॉय म्हणूनदेखील काम केलं. उमेश कुलकर्णीबरोबरदेखील अनेक कामं केली. त्यांच्या ‘गिरणी’ लघुपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. ‘देवराई’साठी प्रॉडक्शन असिस्टंट होता. दरम्यान, पोटापाण्यासाठी म्हणून लग्नाची फोटोग्राफीदेखील केली. फोटोग्राफी स्टुडिओ सुरू करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योजक योजनेअंतर्गत कोर्सदेखील केला. थोडक्यात काय, तर चित्रप्रतिमा हेच अविनाशचं जग बनलं. याच थेट प्रत्यंतर ‘किल्ला’मध्ये उमटलं आहे.
त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफीचं काम केल्यानंतर अचानक मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे कसा आलास, यावर अविनाशचं उत्तर अत्यंत मार्मिक आहे. तो सांगतो, ‘‘असं काही ठरवून केलं नाही, किंबहुना ‘किल्ला’ची कथादेखील काही अशी ठरवून बेतली नव्हती. सिनेमॅटोग्राफी करतानाच ‘जार पिक्चर्स’ने प्रादेशिक चित्रपटाची कल्पना मांडली आणि माझ्या डोक्यात पाच-सहा र्वष घोळत असलेलं हे कथानक बाहेर आलं.’’ चित्रपटाच्या कथानकाचं विश्लेषण करताना अविनाश सांगतो की, आपल्या नेणिवेच्या प्रांतात अशा अनेक दृश्यप्रतिमांची नोंद झालेली असते. तीच अशा वेळी पुढे येतात. वडील गटशिक्षणाधिकारी असल्यामुळे बदलीनिमित्ताने त्याचं शिक्षण अनेक ठिकाणी झालं आहे. सततच्या बदलीचे पौगंडावस्थेतील शाळकरी मुलावर होणारे परिणाम, नवीन मित्र जोडणं, त्यातील ताणेबाणे हे सारं काही त्यानं अनेक ठिकाणी अनुभवलं होतं. चित्रपटातील कथेत आईचं विधवा असणं इतकाच काय तो चित्रपटीय बदल. अरुणचं असं ठाम मत आहे की, जे काही अनुभवलं, पाहिलंय, उमजलंय तेच मांडायला त्याला आवडतं.
अर्थात सिनेमॅटोग्राफीकडून थेट दिग्दर्शनाकडे वळताना काही विरोधाच्या प्रतिक्रिया जाणवल्या यावर बोलताना अविनाशचं चित्रपटाविषयीचं आकलन जाणवतं. त्याच्या मते चित्रपटात असं काही नसतं. ‘‘हे त्याचं हे माझं असं होत नाही. मला माझा चित्रपट करायचाय म्हटल्यावर मी चित्रपटासाठी कोणतंही काम करायला तयार आहे. चित्रपटासाठी मला भांडी घासायला लागली तरी माझी हरकत नसते आणि दिग्दर्शनाबद्दल बोलायचं तर सिनेमात सहभागी असलेला प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने सिनेमाला दिग्दर्शित करत असतो. दिग्दर्शकाचं काम या सर्वाना एका सूत्रात बांधणं हे असतं. ते करायचा मी प्रयत्न केलाय.’’
‘किल्ला’ची सिनेमॅटोग्राफीदेखील अविनाशचीच आहे. एकाच वेळी या दोन जबाबदाऱ्या सांभाळताना तुझ्यातल्या सिनेमॅटोग्राफरने दिग्दर्शकावर कुरघोडी केली का? यावर अविनाश सांगतो की, या दिग्दर्शनामुळे एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे दिग्दर्शकाच्या मनात नेमका काय गोंधळ सुरू असतो त्याची मला जाणीव झाली. त्यामुळे या दिग्दर्शकाला माझ्यातल्या सिनेमॅटोग्राफरची मदतच झाली. अर्थातच अविनाशचं हे म्हणणं चित्रपटातल्या प्रत्येक फ्रेममधून अगदी थेट जाणवणारं आहे.
या चित्रपटाची निर्मिती हादेखील एक काहीसा नाटय़मयच प्रकार म्हणावा लागेल. अविनाश याबद्दल खूपच उत्साहाने सांगतो. साधारण मार्च २०१३ मध्ये ही कथा त्याने निर्मात्यांना ऐकवली. त्यांनी मान्यता दिल्यावर लगेचच एप्रिल- मेमध्ये ओंकार बर्वे आणि तुषार परांजपे यांनी स्क्रिप्टिं आणि कास्टिंग सुरू केलं. चित्रपटाची सारी लोकेशन्स त्याच्या डोक्यात लहानपणीच फिट्ट बसली होती. जुलैमध्ये सुरू झालेलं शूटिंग चार टप्प्यांत नोव्हेंबरला पूर्ण झालं. त्यानंतर अविनाशला निशिकांत कामत यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अंबाल्याला जावं लागलं. चित्रपट बर्लिन फेस्टिवलसाठी पाठवायचा ठरलं होतं, पण अजून पोस्ट प्रॉडक्शनचं काम बाकी होतं. संकलन, संगीत अशी बरीच कामं बाकी होती. अविनाशला अंबाला सोडणंदेखील अवघड होतं. मुंबईच्या धावत्या भेटीत त्यानं कामांची आखणी करून दिली आणि तो पुन्हा अंबाल्याला गेला आणि पूर्ण झालेला चित्रपट त्याला थेट बर्लिन महोत्सवात प्रेक्षकांबरोबरच पाहायला मिळाला. बर्लिन महोत्सवात चित्रपटाला पुरस्कार मिळाला.
येथे याची खास नोंद घ्यावी लागेल. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनला दिग्दर्शक पूर्ण वेळ नसतानादेखील अंतिम संकलित चित्रपटाने पुरस्कार मिळवला. याचाच अर्थ असा होतो की, चित्रीकरणाच्या पायरीवरच चित्रपटाने बरंच काम हलकं केलं होतं आणि दिग्दर्शकाला काय हवंय हे सर्वाना नेमकं माहीत होतं. हे अर्थातच सिनेमाच्या निर्मितीतल्या व्यावसायिक कौशल्याचं एक अनोखं आणि उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.
चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम असलं तरी आपल्याकडे निर्मात्यांचादेखील बराच प्रभाव अनेक चित्रपटांवर पडतो. कधी कधी त्याचं रूपांतर लुडबुडीमध्येदेखील होतं. अविनाश सांगतो, ‘‘मी याबाबतीत सुखी आहे. माझ्या निर्मात्याने मला पूर्ण मोकळीक दिली होती. त्यामुळे मला जो चित्रपट करायचा होता तो नेमकेपणाने करता आला.’’ त्याचबरोबर तो आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतो, ते म्हणजे ‘‘असं ठरवून एखादं कलाबाहय़ अथवा व्यापारी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चित्रपट करता येत नाही. तसं झालं तर मग कला झाकोळली जाते.’’ अर्थात वितरण, मार्केटिंग हे स्वतंत्र असलं तरी ते निर्मितीइतकंच तेवढय़ाच तोडीचं असावं असं त्याचं मत आहे आणि सध्या एस्सेलव्हिजनच्या मार्केटिंगमुळे सिनेमा अनेक लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचेल याबद्दल त्याला विश्वास वाटतो.
एके काळी खूपच नाटकाळलेला आपला सिनेमा आता खऱ्या अर्थाने चित्रभाषेत बोलू लागला आहे. वेगळे विषयदेखील त्याच ताकदीने मांडू शकतो आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे केवळ आशयघनच नाही तर त्याला उत्कृष्ट अशा कलामूल्यांच्या व्यावसायिकतेची जोडदेखील देता येते हेच ‘किल्ला’नं दाखवून दिलं आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com