‘बजरंगी भाईजान’ म्हणजे भारतीय प्रेक्षकाला आवडणारा एकदम टिपिकल लोकप्रिय भारतीय चित्रपटाचा ठासून भरलेला मालमसाला. पण त्या वेष्टनाआड दडलेलं आहे ते बेमालूमपणे केलेलं सलमानचं रिब्रॅण्डिंग.

चित्रपट हा करोडो भारतीयांच्या भावविश्वावर परिणाम करणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं करोडोंचा गल्ला जमवणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. भारतीय प्रेक्षकाला जसा हवा असतो तसा मसाला, त्याला थोडा देशप्रेमाचा तडका हा अगदी हमखास चालणारा फॉम्र्युला. आणि त्यातच आजवर कधीही वापरलं न गेलेलं कथासूत्र असेल तर मग छप्पर फाड के यश. या सर्वाचं एकदम चोख असं व्यावसायिक प्रत्यंतर ‘बजरंगी भाईजान’मध्ये पडलेलं दिसून येतं.
बहुसंख्य भारतीयांना जे जे पाहायला आवडतं ते सारं ‘बजरंगी भाईजान’मध्ये आहे. एकदम टिपिकल लोकप्रिय भारतीय चित्रपटाचा मालमसाला. त्यात भावभावना अगदी ठासून भरल्या आहेत, गाणी आहेत, तेढ आहे, एकोपा आहे, भोळेभाबडेपणा आहे, प्रेमप्रसंग आहेत, त्याग आहे, सच्चाई आहे, धमाल आहे, कहानी मे ट्विस्ट आहे, निसर्गरम्य पाश्र्वभूमी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सारं एका सूत्रात प्रभावीपणे मांडणारा दिग्दर्शकदेखील आहे. चित्रपटीय कौशल्याचा पुरेपूर वापर करत दिग्दर्शकाने एक मस्त कलाकृती दिली आहे. (अर्थातच सिनेमा भारतीय असल्यामुळे जागतिक सिनेमाची परिमाणं येथे लावू नयेत.)
पण तरीदेखील काही प्रश्न उरतातच. याकडे केवळ चित्रपट म्हणून पाहावं का? खरं तर कोणत्याही कलाकृतीकडे कलेच्या दृष्टीनेच पाहावं असं म्हटलं जातं. तसं ‘बजरंगी भाईजान’कडे पाहायचं का? की अन्य काही परिमाणांचा विचार करायचा.
चित्रपटाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, एकदा का तो सेन्सॉरसंमत झाला की त्याचं रूपांतर केवळ कलाकृती न राहता ते प्रॉडक्ट बनतं. मग त्याचं मार्केटिंग वगैरे सुरू होतं. पण गेल्या काही वर्षांत मार्केटिंगची संकल्पना चित्रपटाची संकल्पना सुचल्यापासूनच वाजवली जाते. त्यामुळे बजरंगीच्या बाबतीत हा मुद्दा काही वेगळा उरत नाही. मुद्दा आहे तो या चित्रपटाची वेळ आणि त्यातील सलमान खानची भूमिका.
येथे मुद्दा येतो तो स्ट्रॅटेजीचा, धोरणाचा. त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. मुन्नाभाईचा काळ आठवा. २००५-०६ च्या आसपास गांधीगिरी फेमस करून टाकणाऱ्या या चित्रपटांनी संजय दत्तभोवती एक वलय तयार केलं. तोपर्यंत ‘खलनायक’, ‘वास्तव’ अशा चित्रपटातल्या संजय दत्तची प्रतिमा मुन्नाभाईने पूर्णपणे बदलून टाकली. नेमका हाच काळ १९९३ च्या बॉबस्फोटांच्या संजय दत्तच्या केससंदर्भातदेखील महत्त्वाचा होता.
आता पुन्हा आजच्या काळात येऊ या. हिट अँड रनची केस आणि सलमानचे आजवरचे सिनेमे. सलमानची तोपर्यंतची कोणतीही भूमिका बजरंगीच्या जवळ जाणारी नाही. इतका भोळाभाबडा सलमान आपण पाहिला नाही. मग अशी भूमिका स्वीकारण्यातून काय साध्य करायचे होते, तर तो प्रतिमासंवर्धनाचा एक अत्यंत यशस्वी असा प्रयोग होता. आणि तो सुपरडुपर हिट झाला आहे. हे फक्त सिनेमा पूर्ण होईपर्यंत नव्हतं. तर प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसचा काही वाटा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून जाहीर करणे, पंतप्रधानांनी सिनेमा पाहावा म्हणून ट्विटिंग वगैरे वगैरे हे जे काही अनेक प्रयोग केले ते सारे प्रतिमासंवर्धनाच्या धोरणाचाच भाग म्हणावा लागेल. (याकूब संदर्भातील ट्वीट हा या प्रयोगातील पाकिस्तानमधील मार्केटिंगसाठी केलेला प्रयोगाची भाग होता.)
‘जय हो’, ‘किक’सारख्या सिनेमांतून सलमानची ही प्रतिमासंवर्धनाची वाटचाल सुरू झाली होती. त्यानंतर जसजसं हिट अ‍ॅण्ड रन खटल्याची गती वाढत गेली तसे सलमानने प्रतिमासंवर्धनाचे अनेक प्रयोग केले. ‘बजरंगी भाईजान’ हा त्याच्या बिइंग ह्य़ूमनचा एक प्रकारे परमोच्च िबदूच म्हणावा लागेल. रिब्रॅडिंगचा एक यशस्वी प्रयोग. चित्रपट एक प्रॉडक्ट म्हणून आखलेली स्ट्रॅटेजी आणि सलमानच्या रिब्रॅडिंगची/ प्रतिमासंवर्धनाची स्ट्रॅटेजी या दोहोंनी हातात हात घालून ही कलाकृती पुढे नेली आहे.
कदाचित कला समीक्षकांना आणि सलमानच्या चाहत्यांना हे पटणारं नाही. कारण तमाम भारतीयांना ज्या प्रकारे चित्रपट आकर्षित करतो त्या दृष्टीने पाहिलं तर या चित्रपटात कसलीच उणीव नाही. त्यामुळे असं ठरवून चित्रपट केले जात नसतात असंदेखील मत येईल.
पण भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव पाहता आपल्याकडे चित्रपटातून धर्मनिरपेक्षतेचे डोस अशाच प्रकारे दिले जातात. आणि त्याबाबतचे आजवरचे सर्व प्रयोग यशस्वीच झाले आहेत. फक्त सलमानने त्याचं नाणं वेळ-काळ पाहून या यशस्वी फॉम्र्युल्याद्वारे कसं खणखणीतपणे वाजवून घेता येतं आणि प्रतिमासंवर्धन कसं होऊ शकतं हे दाखवून दिलं आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com