पुण्याच्या अगदी जवळ पाठमोऱ्या ताम्हिणी घाटाजवळ वसलेल्या अंधारबनच्या दाट जंगलातली ही मनमुराद भटकंती वाचणाऱ्या कुणालाही पाठीला सॅक लावून घराबाहेर पडावं आणि डोंगरदऱ्यात मस्त भटकावं, असं वाटल्यावाचून राहणार नाही.

गेल्या आठवडय़ातच अंधारबनला जाऊन आलो. पुण्याच्या अगदी जवळ पाठमोऱ्या ताम्हिणी घाटाजवळ वसलेल्या दाट जंगलात मनमुराद भटकंती अनुभवली. आतापर्यंत आडवाटेवरचा मानला गेलेला सह्यद्रीच्या धारेवरच्या पायगाडीचा हा प्रवास पुन्हा एकदा मनात घर करून गेला. या प्रवासातले प्रवासी मात्र सगळ्या प्रकारांत मोडणारे! अगदी नेहमीच्या भटक्या मित्रांपासून चिमुकल्या समित्रांपर्यंत पाच-एक डझनाचा गट घेऊन अंधारबन ते कोंकणातल्या भिरा धरणापर्यंतची वर्षां सहल जोरात पार पडली. सुरुवातीस पाऊस उदार होता, पण नंतर मात्र त्याने जी काय पडी दिली ती ट्रेक संपला तरीही तो भेटलाच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाटेत काडीचाही केर न करता, आरडाओरड न करता जवळपास १४ किमीचा ट्रेक यशस्वी झाला. अजून एक, विशेष अभिनंदन प्रसादचं! स्टोक कांगरी शिखर सर करून आदल्या रात्रीच लेहवरून पुण्यात पोहोचलेला हा पठ्ठय़ा अंधारबनचा ट्रेक लीड करायला सकाळीच हजर होता. क्या बात!! पहाटे पुण्यातून निघालेल्या गाडय़ा पिंप्रीच्या पाझर तलावाजवळ पोहोचल्या पोहोचल्याच योगीला विचारलेल्या प्रश्नाने आमचा अंधारबन ते खडसांबळ्याचा ट्रेक डोळ्यांसमोर तरळून गेला. काय योगी? आठवतो का चना मसाला? ‘हो ना, त्या खोपटय़ाजवळच पेटवली होती चूल’, तीही वदली. बाकी तंगडतोड भारीच झाली होती म्हणा. आणि हो, अशा ट्रेकमध्येच भटकण्याची खरी मज्जा, घाटवाटा म्हटल्या की आमचा हा फार मोठा वीकपॉइंट बरं का!
असो. तर वृतांत असा! फाल्गुनातली रखरखणारी दुपार पण सह्यद्रीतल्या घाटवाटा खुणावत होत्या आणि दुग्धशर्करा योग म्हणजे होळीची तीन दिवस जोडून आलेली सुट्टी पायांना अस्वस्थ करीत होती, पण काही घरगुती कामं आड आल्यामुळे तीन दिवसांऐवजी दोन दिवसांचा प्लॅन आखावा लागला. आमचा सह्यद्री पावसाळ्यात जेवढा उदार असतो, तेवढं त्याचं प्रेम उन्हाळ्यात कमी झालेलं असतं, असं काहींना वाटतं, पण आम्हाला त्याच्या कणखरतेतही गारवा अनुभवण्याची खाज असतेच, वाढणाऱ्या उन्हाचा विचार करता प्लॅन जरा बेताचाच ठरवलेला बरा. म्हणजे रानमेव्याची चंगळ असली तरी पाण्याची बोंब! आणि वरून उग्र नारायणराव अजूनच उग्र होऊन आग ओकत असतात. त्यामुळे ट्रेक जरा गारच हवा नाही का! स्वारगेटवरून निघणारी सव्वादहाची एकमेव वांद्रे- वडुस्ते बस पकडून अंधारबनाची वाट जवळ करायची ठरलं आणि परतीला खडसांबळ्याच्या उपेक्षित लेणींना भेट द्यायची, पुढचा प्लान परिस्थितीनुरूप!
या वेळचे भिडू चौघंच ! योगिता, प्रसाद, रेश्मा आणि वडस्करांचा कुलदीपक. ठरल्याप्रमाणे सगळे वेळेवर हजर आणि नेहमीप्रमाणे रेश्मा वेळेच्या आधी. गाडीची चौकशी करायला काऊंटरवर गेलो तर नेहमीचा हेकेखोरपणा सांभाळून साहेब बोलते झाले, ‘आहे बस, येईल इतक्यात’. कॅन्सल नाही ना होणार, माझ्या या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करून खाकी आणि जाड कातडीचा तो प्राणी पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. पुलंनी दुकानदार अन् ग्राहक यांच्यामधलं नातं एकाच वाक्यात सांगितलं आहे ते म्हणजे ‘दुकानात सर्वात जास्त दुर्लक्षित असलेली गोष्ट म्हणजे गिऱ्हाईक’ त्याच धर्तीवर ‘येस्टी महामंडळाच्या चौकशी कक्षावर सगळ्यात जास्त दुर्लक्षिलेली गोष्ट म्हणजे प्रवासी’ असंच म्हणावं लागेल. असू दे, प्रत्येकाला आपली ओळख जपावी लागते, ते सोडून कसं चालणार? गाडी वेळेच्या वीस मिनिटे उशिरा आली, म्हणजे वेळेवरच आली म्हणायची. मोजून आम्ही चार अन् ते दोघे असा ऐवज घेऊन तो लाल डबा एकदाचा मार्गस्थ झाला. शहरातील गर्दी अन् रहाटगाडय़ातून मार्ग काढीत गाडी चांदणी चौकातून ताम्हिणी घाटाकडे रवाना झाली आणि कॉलेजच्या आठवणींना परत एकदा उजळणी मिळाली.
पुण्यापासून हाकेच्या अंतरावर अशी बरीच ठिकाणं आहेत, जी पावसात अगदी भरभरून हसत असतात, तिथल्या फुलांमध्ये, पानांमध्ये, दाटलेल्या धुक्यामध्ये अन् भरून आलेल्या नभांमध्ये, तिथल्या कोसळणाऱ्या महामूर पावसामध्ये. त्यातच मोडणारं ताम्हिणी घाट हे अक्षरश: वेड लावणारं ठिकाण. इथून निघालो की कॉलेजमध्ये असताना घाटात खाल्लेल्या वडापावची चव अजूनही आठवते. ही चव जिभेवर रेंगाळत असतानाच रेश्माची भूक जागी झाली, मला भूक लागली! या मुलीची भूक म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती म्हणा. पिंप्री गावात उतरलो तर अंधारबनाची वाट अलीकडूनच वर जाते ही नवीन माहिती मिळाली, मग गावातून पाण्याच्या बाटल्या भरून मागे चालायला सुरुवात केली. बसमध्ये एका शाळकरी मुलीने सांगितल्याप्रमाणे एका तळ्याजवळ पोहोचलो आणि खरं सांगतो तळं काय सुंदर होतं, चौफेर डोंगररांगेने वेढलेला हा परिसर आणि त्यात हा पाझर तलाव. स्वारी एकदम खूश, उन्हाळ्याच्या दिवसात अशी ठिकाणं मनात घर करून जातात. अशा रम्य तळ्याकाठी चूल मांडून दुपारच्या जेवणाचा बेत आखायचा, हा विचारच खूप गोड होता हो! चूल मांडली गेली, लगेच पंधरा मिनिटांत रेडी-टू-सव्‍‌र्ह चना मसाला तयार झाला. अजून एक म्हणजे योगीने घरून आणलेल्या वाटाणा घालून तयार केलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा दणकाच उडवून गेला. जेवणं तर अशी झाली होती की आडवे झालो असतो तर ट्रेक झाला असता आडवा, पण मनावर धोंडा ठेवून सिनेर खिंडीकडे ट्रेकस्थ झालो तेव्हा दुपारचे साधारण अडीच झाले होते, अगदी वामकुक्षीची वेळ म्हणायला हरकत नाही. म्हणजे ती होतीच. पण परवानगी नव्हती, कारण आजच आम्हाला नागशेतपर्यंतचा लांबच लांब पल्ला गाठायचा होता.
वीर नावजी बलकवडेच्या स्मारकाजवळ पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. आता पुढचे दोन-अडीच तास इथल्या पाण्यावाचून पर्याय नाहीये. त्यामुळे पाण्याच्या रंगाकडे बघून आढेवेढे न घेता आपापल्या पाणपिशव्या भरून घ्याव्यात. सिनेर खिंडीतली ही समाधी म्हणजे पायवाटेच्या उजव्या बाजूला थोडं वर एक मोठा दगड आणि त्यावर कोरलेली नावजी यांची प्रतीकात्मक मूर्ती अन् एक शिलालेख. बाजूलाच शेंदूर थापलेली वाघजाईदेवीची मूर्ती. बस एवढंच! येथूनच झालेलं भिरा धरणाचं दर्शन आणि कुंडलिका नदीच्या उगमाजवळून सुरू झालेली दरी डोळे विस्फारून गेली. आपण जिथे उभे असतो अगदी तेथूनच या प्रसिद्ध दरीची सुरुवात होते. पावसात दोन्ही बाजूंच्या कडय़ांवरून कोसळणारे पाणी एकवटून कुंडलिका नदी येथून उगम पावते. येथूनच दरीतल्या कुंडलिका, नावजी अन् अंधारबन या सुळक्यांचे आणि कोंकणातल्या भिरा अर्थात उन्नई धरणाचे मनमोहक दर्शन झाले.
आता एकच करायचं, आपली पायगाडी टॉप गेअरमध्ये घालून वारीला सुरुवात करायची आणि सपाटीवर चालण्याची मजा अनुभवत फक्त सुंदर निसर्ग जगायचा! आम्हीही ट्रेकस्थ झालो तेव्हा नारायणराव अगदी पिकपॉइंटवर होते, मात्र थोडय़ाच वेळात अंधारबनाने आम्हाला त्याच्या कवेत सामावून घेतलं. आता आम्ही दरीच्या पलीकडील बाजूस घनदाट जंगलातून चालत होतो. रान एवढं दाट की सूर्यकिरणांनाही जमिनीला स्पर्श करण्याची सहज मुभा नाही. जंगलाचा पहिला टप्पा ओलांडून बाहेर पडलो तर खालच्या कुंडातला नैसर्गिक स्विमिंग पूल साद घालून गेला. भर उन्हाळ्यात अशी संधी सोडणार कोण? अगदी म्हशी डबक्यात डुंबाव्यात तसे आम्ही किती तरी वेळ त्यात पहुडत होतो. नागशेतपर्यंतचा पल्ला आठवताच भानावर आलो आणि परत पायगाडी सुरू झाली. मोकळ्या पठारावरून परत एकदा कुंडलिका दरीचं अफलातून दर्शन झालं. पुढय़ातल्या सरळसोट कातळकडय़ाच्या माथ्यावरून अगदी रांगेत कोसळणारे धबधबे, याची आपण या भर उन्हाळ्यात फक्त कल्पनाच करू शकतो. बाहेर उन्हात काहिली होत असताना आत मात्र गार गार सावलीचं छप्पर सुखावून जात होतं. निरनिराळ्या झाडांचा सुगंध पार छाती फुगून आत शिरत होता, मध्येच एखाद्या माकडाचा आवाज, पक्ष्यांच्या सुमधुर गाण्याची मेजवानी मन प्रफुल्ल करीत होती. कित्येक ठिकाणी शिकारींसाठी लावलेले सापळे डुकरांचे अस्तित्व जाणवून देत होते. खरंच नावाप्रमाणे ही वाट म्हणजे अंधारबनच! पायाखाली येणाऱ्या पानगळीचा करकर आवाज तेवढा, बाकी सगळी शांतता आणि पायवाट म्हणाल तर साधी सरळ. कुठेही चढाई नाही अथवा चुकण्याची भीती नाही. पुढे नावापुरता लागणारा एक चढ चढून गेलो की आपण मोकळ्या पठारावर येतो. उजव्या बाजूला भलामोठा डोंगर खुणावत असतो. थोडं पुढे गेलो की पठारावरून उजव्या बाजूला सुधागड, सरसगड, आभाळात घुसलेल्या तैल्बैलाच्या जुळ्या कातळभिंती (इथून त्या एकसंध वाटतात) आणि म्हातोबा डोंगराच्या पायथ्याशी निवांत पहुडलेला चौकोनी घनगड हे सर्व सहय़सखे दर्शन देतात. अन् डाव्या बाजूला अजूनच भेदक झालेलं कुंडलिका नदीचं खोरं भीती दाखवून जातं. ताम्हिणी घाटातल्या गाडय़ा खेळण्यातल्या वाटाव्यात, अशा धावत असतात. उघडय़ावर एका झाडाखाली विसावलेली विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती हिर्डी गाव जवळ आल्याचं खुणावून गेली आणि अध्र्या तासाची वाट तुडवून आम्ही गाव गाठलं. ऐन सहय़धारेवर वसलेलं हे गाव मावळतीला शांत भासत होतं, जणू गावात कोणी नाहीच! कोणाला तरी रस्ता विचारून वाटनिश्चिती करायची होती.
बऱ्याच वेळाने एक बाबा आमच्याकडे येताना दिसले. नमस्कार-चमत्कार झाला आणि नागशेतची वाट विचारली. म्हटले, ‘चला, म्या दावतो वाट’ असे म्हणून ते त्यांच्या घरात शिरले. तेवढय़ात एक मावशीबाय बाहेर येऊन, ‘आवो, सरळ वाट हाय. कशाला त्या बाप्याला घेऊन चालला, लयी बडबडा हाय बगा त्यो’ आम्हाला हसूच येत होतं. असू दे. बाबांनी आम्हाला नागशेत फाटय़ाला आणून सोडलं आणि निरोप घेतला. इथून डावीकडची वाट भिरा गावात उतरते तर उजवीकडे नागशेत. दिवाकरराव पश्चिमेकडे कलायला सुरुवात झाली आणि आम्हीही पश्चिमेचीच वाट धरून कोंकणात उतरायला सुरुवात केली. या घाटाचं नाव गाढवलोट, कारण काय तर म्हणे या वाटेने गाढवं कडय़ावरून घसरून मेली होती. काय विचित्र नावं असतात नाही. पण साध्या तूप-मिठाला हिर्डीकरांना नागशेत किंवा भिरा जवळ करावं लागतं. हिर्डीपासून घुटक्याचा रस्ता झाला तर, गावातली ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. उतार वाढत चालला तसा कोंकणातला दमटपणा वाढत होता. पण मावळतीचा गारवा अन् आजूबाजूला असलेल्या झाडोऱ्यातून वाट काढत खालच्या पदरात पोहोचलो तेव्हा दिवाकराचा लालभडक ठिपका झाला होता. शेताडातून वाट तुडवत नागशेतला पोहोचलो तेव्हा बराच अंधार झाला होता.
गाढवलोट उतरून आलो, या आमच्या वाक्यावर गावकरी विश्वासच ठेवायला तयार नव्हते. नुकताच शिमगा उधळून झाला होता, त्यामुळे गावात लगीनघाईसारखी लगबग दिसत होती. आमच्याभोवती गराडा पडला आणि मग कौतुक वाहू लागलं. खासकरून आमच्या सोबतच्या साळकाई-माळकाईचे. ‘पिंप्रीपासून चालत आलाव!!’, असं एका मावशीने विचारल्यावर उगीच त्यांच्या अंगावर मूठभर मास वाढलं. असो. कौतुकसमारंभ पार पाडून मुक्कामाला जागा म्हणून बाजूलाच मंदिर असल्याची माहिती मिळाली. पोलीसपाटलांना ओळखपत्र वगैरे दाखवून झालं. पण बाजूच्या मंदिरात गावकी चाललेली. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, गावकी म्हणजे बैठी ग्रामसभा, वर्षभराचा आढावा, हिशोब वगैरे, इत्यादीचं चर्चापीठ. शहरात कामासाठी गेलेली चाकरमानी सणासुदीला चार दिवस गावात येऊन आपल्या आप्तांसोबत सण साजरे करतात. बाकी कोंकणात गणेशोत्सव आणि होळी म्हटलं की नुसती धमाल,नाही महाराजा! होय महाराजा!! जेवढा दिवाळीला फटाक्यांचा प्रकाश होत नाही त्यापेक्षा जास्त इथली चौकातली होळी आसमंत उजळून सोडते. मंदिरात गावकी चालली होती अन् पुढय़ात कालच्या पेटलेल्या होळीचा निखारा अजूनही जिवंत होता. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीचा चंद्रप्रकाश हळूहळू पसरू लागलेला. इथे सभा संपायला वेळ लागेल म्हणून गावातल्या दुसऱ्या मंदिराकडे आम्ही मोर्चा वळवला.
गावाच्या दुसऱ्या टोकावर वसलेलं हे ऐसपैस मंदिर. मुक्कामाला अगदी साजेशी जागा होती. पथाऱ्या पसरून सरपण गोळा केलं. आकाशात चंद्रप्रकाश लख्ख झाला होता, खाली चुलीवर नेहमीप्रमाणे सूपचा बेत शिजत होता. गावापासून थोडं अंतरावर असल्यामुळे इकडे सगळी शांतताच होती. पूर्वेकडचा सह्य़कणाही चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता. अशा वेळी गरमागरम सुपाचे घोट घेत आशाताईंचे नक्षत्रांचे देणे जर कानावर पडले तर! अहाहा! लागलीच सॅकमधून मोबाइल बाहेर आला आणि ‘चांदण्यात फिरताना’ अगदी वर्मावरच घाव बसला. आता कुठे रात्र सुरू झालीये, अजून कितीतरी वेळ या चांदोबाचं तेज मनभरून अनुभवू शकणार, व्वा! ‘तरुण आहे.. रात्र अजूनी’ या कल्पनेनेच मन आनंदुन गेलं. मग तीही आली ‘चांदणे शिंपित’! काय जादू आहे ना गाण्यात? निखळ आणि शुद्धतेचा एक अप्रतिम आविष्कार. सह्यद्रीच्या कुठल्या तरी कडय़ांवर रात्रीचा मुक्काम ठोकून असाल तर आशाताईंना किमान एकदा ऐका, त्या क्षणी तुम्हाला ‘तुम्हीच’ असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी आहेच आपलं रोजचं, तेव्हा ते ‘तुम्ही’ नसताच मुळी. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, या ओळी ऐकत कडेकपारीतून वाट काढत एखाद्या गावात पोहोचण्यात जी मजा आहे ना! खरं सांगतो, शब्दच नाही. नभ उतरू आलं, या गाण्याने पुढच्या चार महिन्यांत धडकू पाहणाऱ्या वरुणराजाची चाहूल लागून गेली. साग्रसंगीत सुपोत्सव झाल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन गप्पा मारत बसलो, त्यात, नभांगणातील चंद्ररावही येऊन सामील झाले. पण गारव्याने जोर धरला तसा गप्पांचा फड आवरता घेत टेंटमध्ये शिरलो ते पहाट होईपर्यंत!
सकाळचा चहा घेऊन खडसांबळ्याच्या लेण्याकडे चालायला लागलो तेव्हा ऊन बरंच वर आलं होतं. वाट दाखवायला कोणीच नव्हतं, त्यामुळे आता खरी कसोटी लागणार असं दिसत होतं. कारण या लेण्या शोधायच्या म्हणजे एक दिव्य काम. एकवेळ किल्ला आपल्या डोळ्यासमोर असतो, चुकलेली वाटही लवकर गवसते. गेल्यावेळेसची ठाणाळे लेणी शोधयात्रा चांगलीच अंगावर आलेली. पुढय़ात लेणी दिसत असताना तिथपर्यंत जाणारी वाट शेवटपर्यंत नाही सापडली. पण यावेळी जमेची बाजू एकच, आता पावसाळा नव्हता. काल गावकऱ्यानी सांगितल्याप्रमाणे समोरच्या डोंगराच्या पोटात खडसांबळे लेणी आहेत. ओढा ओलांडून आदिवासी पाडय़ापर्यंतची आमची स्वारी निघाली. उघडय़ा रानमाळावरून चालताना चांगलंच रापून निघालो, अक्षरश: घामटं काढलं उन्हाने. घामाने निथळत एका मोठय़ा आंब्याखाली बूड टेकवलं. दात आंबून येइस्तोवर कैऱ्या अन् बोरं पाडून पोटभर चापली. मस्त आराम झाला आणि भानावर येऊन परत लेण्यांकडे मोर्चा वळवला. बोडकं रान सोडून वाट जंगलात शिरली. लेण्यांचा डोंगर डाव्या बाजूला राहिला. वाटेनेच जंगलात शिरत गेलो, लेण्यांचा मात्र दूरदूपर्यंत पत्ता नव्हता. आता अजून थोडं पुढे गेलो असतो तर केवणीच्या पठारावर पोहोचलो असतो. एकदोनदा मागेपुढे करून झालं, निष्फळ! आता ऊर्जाही संपत आली, भुका लागल्या होत्या. शोधमोहीम अंगलट येणार असं दिसत होतं. आजूबाजूला मानवी अस्तित्वाचा मागमूसही नव्हता. जेवणं आटोपून परत एकदा प्रयत्न करायचे ठरले आणि नेमकी एक म्हातारी आजीबाई पानगळ तुडवत आमच्यासमोर उभी ठाकली. काय आनंद झाला म्हणून सांगू. आजीबाई निघाल्या होत्या माथ्यावर घुटक्याला डोक्यावरचं बोचकं सांभाळत.
आजीच्या कृपेने लेणी गावली अन् जीव भांडय़ात पडला. वाट अक्षरश: हरवलेली, झाडोरा तोडतच साफ केली. थोडं पुढं गेल्यावर वरच्या अंगाला एकदाची वाकण दिसली. पायऱ्या चढत असतानाच आत एखादं जनावर तर नाही ना याची खातरजमा करून लेणींमध्ये पाय ठेवला. वासुदेव बळवंत फडक्यांनी या लेणींचा उपयोग इथे लपण्यासाठी कसा केला असेल याची प्रचीती आली. या अडगळीत लपल्यावर कुणाला गावायचा माणूस! जुन्या व्यापारी मार्गावर कोरलेल्या लेणींपैकीच हे डोंगरातलं अप्रतिम लेणं! इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात या लेणींची निर्मिती केली असावी. पायऱ्या चढून गेलो की आपण ऐसपैस अशा विहारात प्रवेश करतो आणि समोरच स्तूप लक्ष वेधून घेतं. आजूबाजूला बौद्ध भिक्कूंसाठी बांधलेले विहार काळाच्या ओघात ढासळलेले आढळतात. याच्या बाजूला पण एक विहार आहे, कदाचित त्याही पलीकडे अजून असतील, पण आता दगडमातीने सगळे बुजलेले आहेत. इकडेतिकडे डोकं घालून आम्ही एका ओबडखाबड जमिनीवर दिली पाऊण- एक तास ताणून. जाग आली तेव्हा एकदम उत्साह संचारला. डोळ्यांसमोर असा लख्ख प्रकाश पडल्यासारखा, हरवलेल्या वाटा गवसल्यासारखं! पुढच्या प्रवासाला लागलो तेव्हा दुपारचे पावणेतीन झाले असतील.
खालच्या आदिवासी पाडय़ातल्या ओढय़ावरून बाटल्या भरून घेतल्या आणि खडसांबळ्याकडे चालायला सुरुवात केली. उन्हाचा दाह चांगलाच जाणवत होता. बाटल्यामधले पाणीही गरम झाले होते, पाण्याची तहान काही जात नव्हती. पण गाव येण्यावाचून पर्याय नव्हता. सुधागड अन् तैलबैलच्या जुळ्या भिंती उजवीला ठेवत ठाकरवाडी गाठली, तेव्हा देहाचं अक्षरश: पोतेरं होऊन घाम निथळत होता. वाडीतल्या एकमेव दुकानाजवळ बसकन मांडली अन् दुकानात जे मिळेल त्यावर ताव मारायला सुरुवात केली. आमचा आत्मा शांत झालेला पाहून पुढय़ातला आमचा कोंकणसखा भोरपगड आमच्याकडे मंद स्मितहास्य करीत होता आणि आम्ही मात्र ठाकरवाडी-पाली या बसची शेवटच्या वेळेची वाट बघत बसलो…
संदीप वडस्कर

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय