कधी कधी ठरलेला ट्रेकचा प्लॅन आयत्या वेळी बदलावा लागतो, पण त्यातूनच नव्या वाटांचा आनंददेखील मिळतो, सोबतीला पाऊस असेल मग धम्मालच..

जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावून वरुणराजा कुठे दडी मारून बसला होता देव जाणे. त्यामुळे आमची, म्हणजे ट्रेकर्स मंडळींची अडचण अशी झाली की, पावसाळी धोपट ट्रेक करावा की कुठली अडनिडी वाट धरावी. आणि नेमका पाऊस आला म्हणजे झाली का पंचाईत. हो-नाही, नंतर बघू, जाऊ दे, जाऊयात असं करत शेवटी ऑफिसला दांडी मारायचं ठरवून मी आणि मंडळींनी ट्रेकचा प्लान मांडायला सुरुवात केली. प्रीती, राजस, अमित, आशीष, सोनाली हे सगळे कसलेले ट्रेकर बरोबर असल्याने अडनिडे काही तरी प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती.
नकाशे गिरवत असताना पर्वत आणि चकदेवपाशी आम्ही सगळेच घुटमळलो. बरीच वर्षे एकत्र ट्रेक करत असाल तर समोरच्याच्या डोक्यात काय प्लॅन शिंकू पाहतोय हे कळायला फारसा वेळ लागत नाही. साधारणपणे जी पाऊलवाट आम्ही नकाशावर गिरवली तसा इतर पर्यायांचा विचार मागे राहिला आणि आमची चर्चा ‘नक्की जायचं ना, की पावसाळ्यानंतर करायचा’ ह्य़ा विचारांना बगल देऊन थेट ‘मुक्काम इथं करू या’ आणि ‘सगळं ठीक आहे पण जळवांचं काय ते पाहावं लागेल’ इथवर आली. त्याचं काय ते पाहून घेऊ असं ठरवून आम्ही प्लॅन ठरवला.
तो असा- शुक्रवारी हापिसातनं वेळेत निघून रात्री प्रवास सुरू करायचा आणि पहाटेपर्यंत दाभ्यात पोहोचायचं. तिथनं सकाळी लवकर निघून रात्री पर्वतगडला मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. हा ट्रेक तसा मोठा होता आणि म्हणून मुंबईपासूनचं अंतर लक्षात घेता वेळेची आखणी करणं गरजेचं होतं. आमचं वेळापत्रक इंजिनीअिरगच्या वेळापत्रकाहून क्लिष्ट दिसत होतं.
तिथं जेमतेम साडेतीन-चार महिन्यांत सगळा अभ्यासक्रम (ऑप्शनला टाकायचं) शिकवतात आणि त्यात त्या रद्दीत टाकायला कामी येणाऱ्या फायली छापायला लावतात. परीक्षा मात्र महिनाभर चालणार! वा रं गडय़ा, काय कारभार आहे.
आमच्याही ट्रेकचं तसंच काहीसं होणार होतं. नाकापेक्षा मोती जड- चाय से ज्यादा किटली गरम- ट्रेकपेक्षा प्रवास मोठा! त्यात मग तिथल्या वाहतुकीच्या पर्यायांची गैरसोय पाहता त्यावर अवलंबून न राहून आम्ही स्वत:ची गाडी न्यायचं ठरवलं, इतर मंडळींनीही बिनविरोध होकार दिला.
अंधेरीहून हापिसातनं निघून धावत-पळत-लोंबकळत घरी पोहोचायला उशीरच झाला. गडबडीत सगळं सामान प्लास्टिकच्या पिशवीत (दोनदा, महत्त्वाचं सामान तीनदा) गुंडाळून कसं तरी सॅकमध्ये कोंबलं आणि मुलुंड गाठलं.
ठरल्याप्रमाणे सहा लोक अन् आठ सॅक गाडीत डांबून अकराच्या ऐवजी बारा वाजता गाडी कोकणाकडे निघाली. वडखळ नाक्यापाशी सारथींसोबत चहा पोटात ढकलून, जुन्या ट्रेकच्या आठवणीत रमून प्रवास चालू होता. पोलादपूरपासून राजस आणि मी जागं राहाणं गरजेचं होतं, कारण ते आतले रस्ते मला आणि त्यालाच माहीत होते. तरी मी डुलक्या घेतच होतो. पारगाव फाटय़ापासून मात्र मी जागं राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी सात वाजता आम्ही एकदाचे दाभे गावात पोहोचलो. गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पाऊस. त्याक्षणी मी दार लोटून घेतलं आणि मुटकुळं करून झोपी गेलो. सगळेच झोपले होते. थेट नऊ वाजताच जाग आली.
मग सॅक घेऊन भराभरा बाहेर आल्यावर एका मामांशी वाटेबद्दल चर्चा केली. मग जरा नवीन म्हणून प्लॉनमध्ये हलकासा बदल केला. झोपा काढण्यात वाया गेलेला (किंवा सत्कारणी लागलेला) वेळ भरून काढायचा म्हणून आम्ही रेणोशीतून जायचं ठरवलं. पुन्हा गाडीत बसायचं म्हटल्यावर सोनालीचा चेहरा कसा झाला होता ते कायम लक्षात राहील.
दाभे ते रेणोशी जास्त लांब नसल्यानं जास्त वेळ गेला नाही. रेणोशीत पुन्हा एकदा वाटेची चौकशी केली आणि देखण्या अशा त्या मंदिरासमोरून समोरच्या शेतापलीकडे असलेल्या सोंडेवर चढाई सुरू केली.
अगदी सुसह्य़ असा रिमझिम पाऊस चालू झाला होता. या भागात आतापर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाल्यानं सगळीकडे हिरवे गालिचे दिसत होते. भातशेतीची कामं जोरदार चालू होती.
मामांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा गाडीरस्ता लागल्यावर असलेल्या झापाकडे वळलो आणि मग एकदा वाटेची खात्री करून पुढील चढाई सुरू केली. साधारण दहा मिनिटांत एका माळावर आलो आणि वाट भातशेतामध्ये हरवली. मग थोडं डोकं खाजवून योग्य दिशेचा अंदाज घेतला, कुठे जायचंय त्याचा अंदाज घेतला आणि एका थोडय़ा अडचणीच्या वाटेवर चढायला सुरुवात केली. मी पुढे, वर जाऊन वाट असल्याची खात्री केली, वाट बऱ्यापैकी मोडलीच होती पण जाण्यायोग्य होती, काही अडचणीच्या ठिकाणी, काटय़ाच्या झुडपाला गुरासारखं इथं-तिथं वळसा घालून एकमेकांना मदत करत आम्ही वरच्या पठारावर पोहोचलो. इथून पुढे मळलेली वाट लागली. पाऊस सतत चालू होता त्यामुळे थकवा काही जाणवला नाही.
मिळालेली लय तोडायची नाही म्हणून तसंच पुढे चढाई चालू ठेवली. अर्धा चढ चढल्यावर रूळ्यातून आलेली वाट येऊन मिळते. रूळ्यातनं आलेली वाट सोबत एक पाण्याचा पाइप घेऊन येते, त्यामुळे वाट तशी प्रशस्त आणि ठळक आहे आणि त्यामुळे साहजिकच वस्ती जवळ असल्याचं एक लक्षण आहे. चढ संपला की इथं एक धनगरवाडा लागतो, लामजमुरा. बारा वाजले असल्यानं आता पोटात कावळे ओरडत होते म्हणून आम्ही त्या वस्तीत सोबत आणलेला खाऊ खाऊन, ताक पिऊन उचाटची वाट धरली.
इतर धनगरपाडय़ाच्या तुलनेत इथं बरीच वस्ती आहे. कच्चा रस्ता तुडवत आम्ही खिंड पार केली. तिथंच शाळेपाशी डाव्या हाताला वळून खाली उतरायला सुरुवात केली, तेव्हा दीड वाजले होते.
इथून पुढे दोन वाटा खाली उतरतात, एक लमाज गावात तर दुसरी वाघवळे गावात. त्यातली वाघवळेची वाट सोपी आणि पर्वतगडाकडे जाण्यास सोयीस्कर आहे. साधारणत: तासाभरात आम्ही वाघवळे गावात पोहोचलो. वाघवळेला उतरत असताना समोरच पर्वतगड छाती काढून उभा असलेला दिसत होता. दुपारचे तीन वाजले होते.
आमचा गाडीवाला ठरल्याप्रमाणं उचाटला गाडी घेऊन येणं अपेक्षित होतं. वाघवळेहून उचाटला पायी चालत साधारण दहा मिनिटं लागतात. तो तिथं आला असेल असं मानून आम्ही उचाट गावाकडं निघालो. ठरल्या जागी तो न भेटल्यानं आम्ही गावात चौकशी केली असता असं कळलं की गावात अशी कोणती गाडी आलीच नाही. त्यात इथं नेटवर्क नाही. तरी तो नेटवर्क असलेल्या जागी असेल अशी आशा करून आम्ही गावातल्या एका घरातून लॅण्डलाइन फोनवरून त्याला कॉल केला आणि सुदैवानं त्यानं उचलला. उचाटला यायचं म्हणजे त्याला १५० किलोमीटरचा वळसा पडणार होता आणि रस्तादेखील खराब होता.
मग त्याला तिथेच थांबायला सांगून आम्ही पुन्हा ट्रेकचा प्लॅन बदलला.
आता आम्ही पर्वतला न जाता साळोशीत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तिथून दाभ्यात जाता येईल, असा विचार केला कारण इतक्या उशिरा पर्वतगडावर मुक्कामासाठी जाणं तसं अवघड होतं, त्यात गाडीवाल्याला शिंदीचा रस्ता समजेल की नाही याची शंका होती. मग त्याला पुन्हा फोन करून दाभ्यात राहायला सांगून आम्ही साळोशीकडे निघालो. उचाट ते साळोशी अंतर तीन किमी आहे, त्यामुळे काही विशेष वाटलं नाही.
साळोशीत अतिशय प्रेमळ अशा शेलार आजोबांच्या घरी आमच्या राहण्याची सोय झाली, जेवणही तिथेच.
रात्रभर पाऊस कोसळत होता. पहाटे कुठे त्यानं जरा विश्रांती घेतली. सकाळी आमची निघायची वेळ आणि पावसाने परत येण्यास गाठ पडली. सकाळी साळोशीतून निघून झडणीमार्गे दाभे गाठायचं. परतीच्या प्रवासाचा विचार केला असता हा पल्ला तसा लांबचा होता, पण आम्ही करू अशी खात्री होती, कारण प्रीती आणि राजसने ही वाट केली होती. पटकन खादाडी उरकून, साडेआठ वाजता साळोशी सोडलं. पावसाची रिपरिप चालू असल्यानं चढ तसा जास्त जाणवत नव्हता. सोबतीला वारा आणि मागं कांदाटचं खोरं. याहून आणिक काय हवंय ट्रेक करताना.
मानवी हस्तक्षेपाचा लवलेशही नसावा असं ते रान. कोयनेच्या पाण्यापासून कांदाटीला विभागणाऱ्या पर्वतरांगेवर झडणीचा पाडा आहे. साधारणत: दोन तास विशेष घाई-गडबड-धावपळ न करता आम्ही झडणीत पोहोचलो.
झडणीत प्रमुख वस्ती आहे ती गवळी समाजाची, त्यामुळे दही-ताकाची चंगळ! दोन-दोन वाटय़ा दहय़ावर ताव मारून आम्ही गावापलीकडे असलेल्या धारेवर चढाई सुरू केली. थोडाफार थकवा जाणवत होता आणि ते स्वाभाविक होतं. तसंच दम काढत जेमतेम वीस मिनिटे चढ चढल्यावर उजवीकडून एक वाट वर येताना दिसली.
गवळी मामा म्हणाले, ‘‘आमी लोणी न्येतो महाबलेश्वरला तवा हिथुन खाली खरोशीत जातो अन तिथनं येष्टी मिलती.’’
आता इथून पुढे तीन तास चालत दाभे गाठायचं की खाली खरोशीत उतरून पुढे जे मिळेल त्यानं दाभ्यात जायचं? मामांच्या मते खरोशीत जाणं सोईचं होतं. मग आम्हीही वेळेची आकडेमोड करून खरोशीत जायचा निर्णय घेतला.
कडय़ाला उजव्या कडेकडेने वळसा घालत वाट खाली उतरत होती. वाटेत जळवा होत्या म्हणून विशेष वेळ न घालवता आम्ही पटापट उतरत गेलो, तरी जळवांशी युद्ध चालूच होतं. समोर कोयनेचं पाणी आणि त्यापल्याड महाबळेश्वरच्या ईशान्येकडचा भाग डोळ्यांचं पारणं फिटेल असं दृश्य रंगवू पाहत होता, पावसाने विश्रांती घेऊन उघडीप दिल्यानं ते दृश्य आणखीच लोभस झालं. आम्हीही पळापळी बंद करून त्यास योग्य ती दाद दिली.
दुपारी दोनच्या सुमारास आम्ही खरोशीत पोहोचलो. आता इथं नेटवर्क नसल्यानं गाडी बोलवायची कशी हा प्रश्न होता. त्या रस्त्याला वाहतूक तशी अगदीच कमी. दहा मिनिटं आराम करून मी आणि सोनाली दाभ्याकडे पायी निघालो. सर्वाची दांडी यात्रा होण्यापेक्षा दोघांनी पुढे जाऊन गाडी पाठवायची असं ठरवलं. वर्षांत चार महिने हिमालयात घालवणाऱ्या सोनालीला त्यात काही वावगं वाटलं नाही.
गप्पा मारत आम्ही सात किमी कधी चाललो ते कळलंच नाही. आम्ही पोहोचून गाडी परत पाठवेपर्यंत बाकी मंडळीही बरंच अंतर चालत आली होती. कोरडे होऊन, आवरून, थोडा खाऊ खाऊन आम्ही साडेचारला दाभे सोडलं. प्रतापगडाजवळ जेवण उरकून आम्ही डुलक्या काढत, गप्पा मारत अकराला मुलुंडला पोहोचलो.
अगदी आखलेल्या प्लॉननुसार नाही, पण ट्रेक नक्कीच खूप मजेशीर झाला होता. हिलाच पावसाळी उनाड भटकंती म्हणतात का?
अर्थात कुणालाही या प्रकारची भटकंती करायची असेल तर तिथला भूगोल पाठ हवाच आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तसा अनुभवी आणि तंदुरुस्त चमू हवा.
प्रसाद तांदळे

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता