एके काळी दर्जेदार मासिकं म्हणून गाजलेल्या ‘सत्यकथा’ आणि ‘हंस’ या मासिकांचे अनुक्रमे  कार्यकारी व संस्थापक-संपादक म्हणून काम केलेल्या अनंत अंतरकर यांची ही जीवनकहाणी. त्यांच्या मुलीनेच लिहिलेली. लेखिका अनुराधा औरंगाबादकर यांनी शीर्षक पानावर ‘जीवनकहाणी’ असे तर प्रास्ताविकात ‘चरित्र’ असे दोन्ही शब्द वापरले आहेत. मात्र या पुस्तकाला अंतरकरांची जीवनकहाणीही म्हणता येणार नाही आणि चरित्र तर नाहीच नाही. वडिलांविषयीच्या आठवणी जमवताना केलेले प्रयत्न, लेखिकेचं स्वत:चं आत्मचरित्र आणि अंतरकरांविषयीच्या लेखिकेच्या आठवणी असं या पुस्तकाचं एकंदर स्वरूप आहे.
अंतरकर हे लेखिकेचे वडील असल्याने त्यांच्याविषयी आदर, आपुलकी, अभिमान असणं समजण्यासारखं आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं, त्यांच्याविषयीच्या गैरसमजांचं निराकरण करणं, हेही न्याय्य आहे. पण त्यासाठी सोयीस्कर सत्य सांगणं आणि सतत वडिलांचंच गुणगान आळवणं, हे सर्वथा गैर आहे. भारंभार तपशील आणि अनावश्यक आठवणी-घटना-प्रसंग सांगण्यात पानंच्या पानं खर्च केली आहेत. शब्दांच्या या डोंबारखेळातून वाचकाच्या हाती मात्र फारसं काही लागत नाही.
अगदी स्पष्टच सांगायचं तर चरित्र म्हणून असलेली कुठलीही अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करत नाही. पुस्तकाच्या शीर्षकापासूनच लेखिकेच्या गोंधळाला सुरुवात होते. चरित्रपर पुस्तकाचं शीर्षक इतकं काव्यमय असत नाही, अगदी ते वाङ्मयीन असलं तरी. त्यामुळे हा गोंधळ भाषा बेजबाबदारपणे वापरण्याचा आहेच, पण विचारांची स्पष्टता नसण्याचाही आहे. वडिलांकडे तटस्थ, समतोल पद्धतीने पाहणं त्यांना शक्य झालेलं नाही. अंतरकर आपले वडील म्हणून त्यांचंच प्रत्येक वेळी कसं बरोबर असणार आणि इतरांनी त्यांच्यावर कसा अन्याय केला असणार, अशी सरळ विभागणी त्या करतात. अंतरकर ‘सत्यकथा’ आणि ‘वसंत’ या दोन मासिकांत असताना आणि ‘हंस’ सुरू करण्याच्या काळात त्यांचे मुळगावकर यांच्याशी झालेले मतभेद नोंदवताना लेखिकेने फक्त अंतरकरांवर अन्याय झाला, यावरच भर दिला आहे. पुढे अंतरकरांनी स्वत: ‘हंस’ सुरू केल्याने त्यांच्यावर इतर मालकांनी अन्याय करण्याचा प्रश्न नव्हता, तेव्हा लेखिकेने त्यांच्या सामान्य आठवणी तपशीलवार सांगितल्या आहेत.
अंतरकरांनी ‘सत्यकथा’, ‘वसंत’, ‘हंस’, ‘मोहिनी’मध्ये कसं नवोदित-प्रस्थापित लेखकांचं लेखन छापलं, नवोदितांना कसं उत्तेजन दिलं, स्वत: विविध प्रकारचं लेखन कसं केलं याची अतिशय ढोबळ आणि सामान्य स्वरूपाची माहिती दिली आहे. शिवाय त्यातही गफलती केल्या आहेत. तरुण वसंत सरवटे जेव्हा पहिल्यांदा अंतरकरांकडे आपली व्यंगचित्रं घेऊन गेले, ती पाहून ‘हा पुढे मोठा व्यंगचित्रकार होणार,’ असं अंतरकर म्हणाले. त्यावर लेखिका टिप्पणी करतात की ‘अण्णांचं हे भाकीत सरवटे यांनी खरं करून दाखवलं.’ म्हणजे अंतरकरांनी ते भाकीत वर्तवलं नसतं तर सरवटे बहुधा व्यंगचित्रकार म्हणून पुढे आलेच नसते का? अशी विधानं लेखिकेनं इतरही लेखक-चित्रकरांच्या बाबतीत केली आहेत. ती केवळ गैरलागूच नाहीतर बढाईखोरही आहेत.
शिवाय लेखिकेचं स्वत:वरही अतोनात प्रेम असल्यामुळे त्यांनी स्वत:बद्दलही भरपूर लिहिलं आहे. या पुस्तकासाठी माहिती मिळवण्यासाठी आपण कशा खस्ता खाल्ल्या याची लांबलचक वर्णनं केली आहेत. त्यामुळे कधी कधी असा प्रश्न पडतो की, लेखिकेला अंतरकरांविषयी सांगायचंय की स्वत:विषयी सांगायचंय? अंतरकर त्यांचे वडील असल्याने हे काही प्रमाणात होणं क्षम्य आहे, पण ते अक्षम्य म्हणावं इतक्या जास्त प्रमाणात झालं आहे. शिवाय त्या हकिकतीही विनाकारण अलंकारित शब्दांत लिहिल्या आहेत. उदा. ‘मी गोडबोलेंना सांगत होते. बाहेर पाऊस कोसळत होता. बाहेर पडणं अशक्य होतं. गप्पांचा फड रंगत होता,’ अशी कितीतरी उदाहरणं पुस्तकात आहेत. ती वाचताना प्रश्न पडतो ही अंतरकरांची जीवनकहाणी आहे की कादंबरी आहे?
लेखनातला बाळबोधपणा पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेपासूनच दिसायला लागतो. सुरुवातीला ‘नमन नटवरा’ अशी नांदी लिहिली आहे. म्हणजे आपण चरित्र लिहीत आहोत की एखादं नाटक वा तमाशाचा वग लिहीत आहोत याचंही भान लेखिकेनं ठेवलेलं नाही. त्यानंतर आहे ‘सरस्वतीस्तवन’. यात पहिल्या ओळीत लेखिकेनं ‘चरित्र’ हा शब्द वापरला आहे, पण पुढे जे काही लिहिलं आहे ते वाचून धक्काच बसतो. या प्रतापांनंतर ‘समुद्रसाद’ नावाचं सुक्त आहे, रत्नागिरीच्या समुद्राला उद्देशून आळवलेलं. (पुस्तकाच्या शेवटीही असंच ‘भैरवी’ नावाचं समुद्रसुक्त आहे.) त्यानंतर सुरू होतं ‘कोकणकिनारी’ हे अंतरकरांची पूर्वपीठिका सांगणारं प्रकरण. त्यात लेखिका सुरुवात करते आर्य अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आले आणि समुद्रमार्गे गुहागपर्यंत आले इथपासून. पण पुढच्या चार ओळीत आर्याचा निकाल लावून ‘अंतरकर’ हे नाव कसं पडलं या परिच्छेदाची सुरुवात होते. पान १६-१७ वर अंतरकरांच्या बारशाची हकीकत आहे. त्यात १२ डिसेंबर १९११ रोजी पंचम जॉर्ज यांनी कलकत्ता ही राजधानी बदलून दिल्ली कशी केली याचीच हकीकत बारशाच्या वर्णनापेक्षा जास्त आहे. अशा उंच उडय़ा पुस्तकाच्या नावाप्रमाणे ‘अनंत’ आहेत.
‘वसंत’ मासिक सोडताना अंतरकरांनी दत्तप्रसन्न काटदरे यांना लिहिलेलं पत्र वा ‘हंस’ सुरू करताना मुळगावकरांना लिहिलेली चिठ्ठी दिली आहे. त्यातील मजकूर पुरेसा बोलका आहे. पण लेखिकेचं वडिलांवर असलेलं अतोनात प्रेम आणि वाचकांविषयी असलेली शंका (त्यांना ही पत्रं वाचून कळतील की नाही याची) इतकी जबर की, त्यांनी पुढे त्यातल्या ओळींचं विश्लेषण केलं आहे. वस्तुत: त्याची काहीएक गरज नव्हती. वडिलांचे इतरांशी झालेले मतभेद नोंदवताना त्यांचाच कैवार घेतला आहे, पण आव असा आणला आहे की ‘केवळ माझे वडील म्हणून मी हे सांगत नाहीये..मराठी वाङ्मयाच्या इतिहासात चुकीच्या नोंदी होऊ नयेत ही एकच तळमळ याच्यामागे हात जोडून उभी आहे.’ हा अभिनिवेश पुस्तकभर आहे. मराठी वाङ्मयाची लेखिकेची व्याख्या फारच जुजबी वा सोयीस्कर असावी असे दिसते.
या पुस्तकावर संपादकीय संस्कार अजिबात झालेले नाहीत. ‘सोनेरी स्वप्नपूर्ती’ हे ‘हंस’-‘मोहिनी’ची निर्मितीकथा सांगणारं प्रकरण आहे १३१ पानांचं. त्याचं काटकोरपणे संपादन केलं असतं तर ते ते अवघ्या ५०-६० पानांत बसलं असतं आणि वाचनीयही झालं असतं. ‘वैभवी वाटा’ हे ६० पानी प्रकरणही असंच संपादित करून ३० पानांत बसवता आलं असतं. दोनशे-सव्वादोनशे पानांत सांगून होईल त्यासाठी तब्बल साडेतीनशे पानं खर्च केली आहेत. शिवाय शुद्धलेखनाच्या, वाक्यरचनेच्या चुकाही आहेतच. तेच ते संदर्भ, तपशील पुन:पुन्हा येत राहतात. प्रकरणांची विभागणी करताना ती इतकी निष्काळजीपणे केली आहे की, त्यातून अंतरकरांच्या आयुष्याचे कुठलेही टप्पे धडपणे समजावून घेता येत नाहीत. काव्यमय, अलंकारिक भाषा, उमाळे-उसासे, तक्रारी आणि शब्दांची अनाठायी उधळमाधळ हे या पुस्तकाचे विशेष आहेत.
जीएंची अंतरकरांविषयीची एक आठवण पुस्तकात सुरुवातीलाच दिली आहे. जी.ए. लिहितात, ‘..संपादक म्हणून अंतरकरांचं कार्य मोठं आहे व ते सगळ्यांसमोर आहे. ते तसे मोठे आहेत, म्हणूनच मला त्यामागचा माणूस शोधायचा आहे. त्यामागचा माणूस हवा आहे.’ त्यापुढे लेखिकेने लिहिले आहे की, ‘जीएंची इच्छा मला शिरसावंद्य आहे. त्यातून मला लेखनदिशा मिळाली.’ पण त्याचा प्रत्यय पुस्तकातून येत नाही. दुसरं म्हणजे जीएंनी अंतरकरांची कारकीर्द पाहिलेली होती. ती त्यांना प्रत्यक्ष माहीत होती, म्हणून त्यांना त्यामागचा माणूस जाणून घ्यावासा वाटत होता. आज अंतरकरांचं काम माहीत असलेले किती लोक असतील? तेव्हा आताच्या काळात त्यांचं चरित्र लिहिताना तेही ध्यानात घ्यायला हवं होतं. पण या पुस्तकात त्याचा पूर्णपणे अभाव दिसतो. त्यामुळे एक चांगला विषय वाया घालवला आहे, असं म्हणावं लागतं. शिवाय लेखन करताना जे गांभीर्य पाळायला हवं होतं, ते न पाळल्याने अंतरकरांविषयी गैरसमज निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. काही शिष्य आपल्या गुरूचा त्यांनी दिलेल्या शिकवणीची कॉपी-पेस्ट थिअरी वापरून पराभव करतात, तर काही मुलं आपल्या आई-वडिलांचा त्यांच्यावरील अतोनात प्रेमापोटी पराभव करतात. अंतरकर लेखिकेचे गुरू आणि वडील असल्याने त्यांच्याकडून दोन्ही प्रमाद घडले आहेत.
थोडक्यात चरित्र कसं नसावं, याचं हे पुस्तक उत्तम उदाहरण ठरावं. काय लिहावं अन् काय लिहू नये याचा विवेक नसल्यावर आणि कसं लिहू नये याचा साक्षेप नसल्यावर अशी पुस्तकं जन्माला येतात. आणि ती ज्यांच्याविषयी लिहिली जातात त्यांच्याविषयी जनमानसात असलेल्या आदराच्या भावनेला हकनाक टाचणी लावतात. या पुस्तकातून अंतरकरांसारख्या साक्षेपी संपादकांचं कर्तृत्व समोर येण्याऐवजी त्याला उलट गालबोटच लागलं आहे, ही खेदाची गोष्ट आहे. या पुस्तकामुळे अंतरकरांना न्याय मिळवण्याऐवजी त्यांचं एका परीनं अवमूल्यनच झालं आहे.
ज्यांना अंतरकरांचं योगदान माहीत आहे, त्यांना या चरित्राकडे कदाचित उदारपणे पाहणं शक्य होईलही, पण ज्या पिढीला ते माहीत नाही, त्यांच्यापुढे या पुस्तकातून अंतरकरांचं जे चित्र उभं राहत आहे ते सुखावह व हितावह नाही, असं नाइलाजानं नमूद करावं लागतं. चरित्रलेखन इतक्या सैलपणे हाताळण्याचा वाङ्मयप्रकार नाही.
‘अनंता’ची फुलं – अनुराधा औरंगाबादकर,
प्रतीक प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – ३४९, मूल्य – ३०० रुपये.