ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या पश्चात त्यांच्या उरल्यासुरल्या, अप्रसिद्ध किंवा असंग्रहित लेखनाकडे प्रकाशकांचा मोर्चा वळणे स्वाभाविक म्हणायला हवे. याचे कारण तेंडुलकर हे केवळ खपावू लेखक नव्हते, तर ते अत्यंत सजग समाजचिंतक होते. समाजात जागल्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी वेळोवेळी पार पाडली होती. नाटकांव्यतिरिक्तचे त्यांचे लेखन, व्याख्याने, सामाजिक प्रश्न तसेच समस्यांवर त्यांनी प्रसंगोपात मांडलेली मते या सगळ्याचे बरे-वाईट पडसाद त्या- त्या वेळी चर्चा, वादंगांद्वारे उमटत असत. त्यांच्या काहीशा वादग्रस्त विधानांनी अनेकदा खळबळ माजत असे. त्यावरून त्यांच्यावर चौफेर घणाघाती टीकाही होत असे. परंतु अशी विधाने करण्यामागे तेंडुलकरांची निश्चित अशी एक समाजहितैषी भूमिका असे. त्यांच्या मतप्रदर्शनाच्या निमित्ताने उठलेल्या गदारोळामुळे जे उलटसुलट विचारमंथन होई, ते समाजमानस खडबडून जागे करण्यासाठी पोषक असे. त्यांच्या बहुतेक नाटकांतूनही त्यांनी ही जागल्याची आपली भूमिकाच प्रकर्षांने बजावलेली दिसते. तशा त्यांनी प्रारंभीच्या काळात बऱ्याच कथा आणि आयुष्याच्या उत्तरार्धात दोन कादंबऱ्याही लिहिल्या. परंतु त्यांना कथाकार वा कादंबरीकार म्हणून कोणी ओळखत नाही. त्यांची कायम लखलखीत ओळख आहे ती प्रथमत: नाटककार म्हणूनच! म्हणूनच त्यांच्या काही नाटकांची दुरान्वयाने वा धूसर बीजे, त्यांच्यात दडलेले नाटय़गुण ज्यांत आढळून येतात, अशा काही असंग्रहित कथांचा ‘मातोश्रीवर अर्धी रात्र’ हा कथासंग्रह प्रसिद्ध करून अक्षर प्रकाशनाने तेंडुलकरांच्या अभ्यासकांसाठी एक साधन उपलब्ध करून दिले आहे.

‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

तेंडुलकरांची अंगभूत लेखनवैशिष्टय़े त्यांच्या या कथांतून ठायी ठायी आढळून येतात. अत्यंत अनौपचारिक, साधी-सोपी कथनशैली. मिताक्षरी, परंतु आशयघन अन् चित्रदर्शी वाक्यं. अनलंकृत, चपखल शब्दयोजना. थोडक्या अवकाशात मोठा आशय सांगण्याची हातोटी. वाचकाला विश्वासात घेऊन त्याच्या साक्षीने उलगडणारे कथेतील विश्व. कथेतील पात्रांच्या बाबतीत न्यायाधीशाची वा सूत्रधाराची भूमिका न घेता त्यांचे त्यांना व्यक्त होऊ देणे. त्याबाबतीतली कथा-निवेदकाची तटस्थ वृत्ती. विशेषत: चाकोरी मोडून वर्तन करणाऱ्या माणसांबद्दल तेंडुलकरांना वाटणारे प्रचंड कुतूहल.. आकर्षण. त्याचबरोबर सर्वसामान्य, शोषित, पीडित, अलक्षित माणसं, त्यांचे गंड, त्यांचं जगणं, त्यांची चिवट जीवनेच्छा हेच बहुतांशी त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू असते. अशा माणसांच्या अंतरंगात डोकावण्याची अनावर उत्सुकता आणि त्यांना जाणून घेण्याची आस तेंडुलकरांच्या लिखाणात प्रत्ययाला येते. आणि अशा भोचकपणातून हाती लागणारे कधी कधी अविश्वसनीय, अकल्पित वाटावेत असे वास्तवाचे रोचक तुकडे ते तटस्थपणे वाचकांना निवेदित वा कथन करतात. त्यातही माणसांच्या आयुष्यातल्या ‘नाटय़’पूर्ण क्षणांबद्दल त्यांना कमालीचे औत्सुक्य असल्याचे दिसते. आपल्या चाकोरीबद्ध, तोकडय़ा अनुभवविश्वाबाहेरच्या घटना, प्रसंग, व्यक्तींशी भिडण्यात त्यांना आनंद मिळतो. हे सारे ‘मातोश्रीवर अर्धी रात्र’ या संग्रहातल्या त्यांच्या कथांतून आढळतेच आढळते; परंतु तेंडुलकरांच्या सगळ्याच लेखनात ही वैशिष्टय़े दृष्टोपत्तीस पडतात.

‘मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा विजय तेंडुलकरांनी बदलला’

या संग्रहातली ‘मातोश्रीवर अर्धी रात्र’ ही पहिलीच कथा त्यांच्या ‘मसाज’ या एकपात्री नाटकाच्या प्रयोगातील वगळलेला अंश आहे. आपले ‘लाइट मसाज’चे विलक्षण कौशल्य वापरून अनेक रंजल्यागांजलेल्यांना प्रगाढ निद्रासुख मिळवून देणाऱ्या मधू जोशीला एके दिवशी मातोश्रीवरून बोलावणे येते. बाळासाहेबांबद्दल नितांत आदर असणारा आणि त्यांच्या व्यक्तित्त्वाच्या दराऱ्यामुळे त्यांच्याबद्दल अनाम दहशत मनी बाळगणाऱ्या मधूच्या आयुष्यातील ही एक अविस्मरणीय संधी असते. या संधीचा लाभ उठवीत तो त्याच्या मनात खळबळ माजवणाऱ्या वर्तमान राजकीय घटनांपासून ते बाळासाहेबांच्या कार्यशैलीबाबत त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तो थेट बाळासाहेबांकडूनच (हे बाळासाहेब अस्सल की डुप्लिकेट आहेत, हे मात्र मधूला शेवटपर्यंत कळत नाही.) मिळवू पाहतो. तेही त्याच्या प्रश्नांची अत्यंत मनमोकळी उत्तरे देतात. या कथेचा बाज ‘बाळासाहेब : एक माणूस’ याकडे झुकलेला आहे. अर्थात त्यात उपरोध नाही असे नाही; परंतु एकूणात भूमिका बाळासाहेब समजून घेण्याचीच असते.. जी तेंडुलकरांच्या लेखणीची खासीयत आहे. वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांमधील ‘माणूस’ समजून घेण्याची जी एक असोशी तेंडुलकरांना कायम लागलेली असे, त्याचाच परिपाक म्हणजे ही कथा होय. अर्थात यात तेंडुलकरांचे बाळासाहेबांबद्दलचे आकलन कळत-नकळत डोकावत राहते. त्या आकलनातूनच ही कथा आकाराला आलेली आहे.

‘तें – एक श्राव्य अनुभव’

या संग्रहात १६ कथा आहेत. त्यातली ‘सी. बी. आय., पाकिस्तान आणि मी’ ही कथा (?) तेंडुलकरांच्या बाबतीत घडलेल्या दोन अनाकलनीय घटनांचं नुसतंच कथन आहे. त्यासंबंधात कोणताही निष्कर्ष तेंडुलकरांनी काढलेला नाही. या कथनातली पहिली घटना आहे- रा. स्व. संघावर तेंडुलकरांनी लिहिलेल्या लेखाची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून सी. बी. आय.चा अधिकारी येतो त्याची. तो येतो तोही यशवंतराव चव्हाणांच्या आदेशावरून! तेही तेंडुलकरांनी रा. स्व. संघावर कधीच काही लिहिलेले नसताना! दुसरी घटना :  पाकिस्तानातून तेंडुलकरांना पाकभेटीचे निमंत्रण देण्याकरता आलेल्या माणसाबद्दलची. या दोन्ही घटनांना कुठलाच आगापिछा नाही. त्यानंतरही काही घडत नाही. परंतु या घटनांबद्दलचं ‘तें’च्या मनात दाटलेलं कुतूहल त्यांनी यात शब्दबद्ध केले आहे.
बाकी यातल्या बहुतांश कथा या माणूस समजून घेण्याच्या धडपडीतूनच लिहिल्या गेल्या आहेत. त्यात मग ‘सखाराम बाइंडर’चे पूर्वसंचित असलेली ‘बाई’ ही कथा येते. ज्यात निवेदकाच्या काकांच्या ट्रकवरील ‘ओबडधोबड’ ड्रायव्हर कुळकर्णी याने ठेवलेली चंट बाई आणि त्यांचे उघडेवाघडे संबंध.. या घटनेचे दांभिक नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या भोवतालच्या समाजात उमटणारे पडसाद.. कुळकण्र्याच्या त्या ठेवलेल्या बाईचे त्याच्या पश्चात ट्रकमालक काकांबरोबरचे छुपे संबंध.. हे सारे ‘सखाराम बाइंडर’मधल्या सखाराम आणि चंपाच्या गोष्टीशी समांतर जाणारे आहे. तेंडुलकर या कथाकथनात नैतिक-अनैतिकतेचा न्यायनिवाडा करण्याच्या भानगडीत न पडता फक्त वस्तुस्थिती समोर ठेवायचा प्रयत्न करतात. हे करत असताना नकळत समाजमानसाचा जो काही पंचनामा होतो, तो होतो.

यश गिरवण्याचं नाकारणारा लेखक

‘एक फसलेला प्रयोग’ या कथेमध्ये सतत लेखन, चिंतन, मनन आणि व्यासंगात मग्न असलेल्या एका विद्वानाने आपल्या व्यासंगाआड लग्न, संसार असल्या चिल्लर गोष्टी येऊ नयेत म्हणून कधीही लग्न न करण्याचा निर्धार केलेला असतो. परंतु वयाच्या चाळीशीत अचानक ते एका प्रौढ, अनाकर्षक स्त्रीशी- मालतीशी ती होऊनच त्यांच्यामागे लागल्याने सशर्त लग्न करतात. लग्नपूर्व कठोर शर्तीनुसार कोणत्याही भावनिक-मानसिक गुंतणुकीविनाचा त्यांचा अपत्यविहीन, कोरडा, परंतु सुरळीत संसार सुरू असतो. परंतु एके दिवशी या विद्वानांचा एक शिष्य आयत्यावेळी त्याच्या नाटकातील एका नटीने काम करण्यास नकार दिल्याने मालतीला ती भूमिका करण्याची गळ घालतो. आणि त्याला मदत करण्याच्या हेतूने ती नवऱ्याच्या परवानगीने अपवाद म्हणून ती भूमिका करते. त्यातून पुढे तिने आपल्या नाटकात काम करावे म्हणून खूप मागण्या येतात. आणि त्या स्वीकारून मालती शर्तीचा भंग करते. त्यातून उभयतांत दरी निर्माण होते आणि ती पुढे वाढतच जाते.. ही कथा तेंडुलकरांच्या ‘अशी पाखरे येती’ या एकमेव रोमॅण्टिक नाटकाची पुसटशी आठवण करून देते.
‘खोली’ ही कथा नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या एका संघ स्वयंसेवकाचे सार्वजनिक रूप आणि त्याचे खासगी आयुष्य यांतल्या विरोधाभासाने पौगंडावस्थेतल्या एका मुलाला आलेला कटु अनुभव विस्ताराने मांडते.

विजय तेंडुलकरांचे नाटक नव्याने रंगभूमीवर

आपल्यासारख्या जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराला अव्हेरून एका भणंग, व्यसनाधीन माणसाशी प्रेयसीने लग्न केल्याने उद्ध्वस्त झालेला, दुखावला गेलेला आणि पुढे अपत्यप्राप्तीसाठी त्याच प्रेयसीने नपुंसक नवऱ्याशी व्यभिचार करून एका लफंग्याशी संबंध करून ती गर्भवती राहिल्याने तिच्या या अध:पतनाने चवताळलेल्या प्रियकराने तिला याचा जाब विचारण्यासाठी तिची भेट घेतली असता त्यांच्यात झडलेला संवाद म्हणजे ‘जाब’ ही कथा. मानवी नातेसंबंधांतील फोलपणा, त्यातले अंधारे कोपरे आणि अतक्र्य रसायन या कथेत लेखकाने उपरोधाचा आधार घेत उलगडले आहे. माणूस आकळणे हे किती अवघड, अशक्य प्रकरण आहे, या समेवर ही कथा शेवटी संपते.

विजय तेंडुलकर मरणोत्तरही वादात! नाटकाचा प्रयोग झाला रद्द

‘एका घराची कहाणी’मध्येही मानवी नातेसंबंधांतील अनवट वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न तेंडुलकरांनी केला आहे. ‘ल-मामा’ ही अमेरिकेतील ऑफ ब्रॉडवेवरील एक नाटय़ानुभवावर आधारित कथा. कथा म्हणण्यापेक्षा ते एक अनुभवकथन आहे. ‘भाकित’मध्ये अतिंद्रिय शक्तीने वर्तवलेले एक भाकित खोटे पाडण्याच्या प्रयत्नांत संबंधितांची होणारी जीवघेणी ससेहोलपट, तीळ तीळ मरण ओढवत जाणं, त्यापायी होणारी मानसिक-भावनिक उलघाल, तडफड, तळमळ.. आणि सरतेशेवटी हे भाकित वर्तवणाऱ्या दादरकरच्या बाबतीतच ते खरे होणे.. अशी चित्तचमत्कारिक कथा वाचायला मिळते. ‘पंचनामा’, ‘अपराध’, ‘आत्माराम उठ!’ या अन्य कथांतून तेंडुलकरांच्या नाटकांतून आढळणाऱ्या मार्मिक रंगसूचना, पात्रांचे तपशिलात चित्रण, माणसांच्या अंतर्मनात चालणारा सत्-असत्चा सनातन झगडा, त्या संघर्षांचे त्यांच्या वर्तन-व्यवहारावर, मानसिकतेवर होणारे बरे-वाईट परिणाम, त्यातली नाटय़पूर्णता.. हे सारे या कथांतून अनुभवायला मिळते. या अर्थाने या कथा ‘नाटककार’ तेंडुलकरांची मशागत कशी झाली याचा वानवळा देतात. परंतु त्या म्हणाव्या तितक्या प्रभावी नाहीत. काहीशा पसरटच झालेल्या आहेत. कदाचित तेंडुलकर उत्तम कथाकार म्हणून का ओळखले जात नाहीत, याचेही उत्तर त्यांच्या अशा काही कथांमधून सापडायला हरकत नाही.

‘मातोश्रीवर अर्धी रात्र’– विजय तेंडुलकर, अक्षर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे- २३२, मूल्य- २५० रुपये.