काळ : इ. स. पूर्व २७०० उष:काल होण्यास अद्याप तीन प्रहर अवकाश होता. संपूर्ण आश्रम निद्राधीन होता. रात्रकीटकही जणू श्रमून शांत झाले होते. गंगेपलीकडील अरण्यातून मधूनच येणारे श्वापदांचे उत्क्रोशवगळता सर्वत्र नीरव शांतता होती.
श्रृतकेतू मात्र पूर्णत: जागा होता. सहस्ररश्मीच्या तीव्र तापाने स्थालिकेतील जलबिंदूंची वाफ व्हावी तसे त्याच्या नेत्रातील निद्रेचे झाले होते. अचानक देहावरील आस्तरण दूर सारून तो शय्यामंचावर उठून बसला. त्याच्या मन:चlok03क्षूंसमोर काही तरी अस्पष्ट अस्पष्ट दिसू लागले होते. ते कुणाकडे तरी व्यक्त करावे असे त्यास प्रकर्षांने वाटत होते. पण सर्व सहाध्यायी निद्राधीन होते. कोणासमोर मनातील विचार व्यक्त करणार? अखेर त्याने बाजूच्या दीपिकेची ज्योत मोठी केली व त्या प्रकाशात भूर्जपत्रावर तो मनातील काव्य मांडू लागला..
०००
श्रृतकेतूच्या मनी गेल्या काही दिनांपासून एकच प्रश्नयज्ञ सुरू होता.. त्याच्या मनोभूमीत त्या प्रश्नाचे बीज पेरले होते, ते ऋषी स्तीवजाब यांनी. एके दिवशी सायंकालचे समयी स्तीवजाब व त्यांचे विद्यार्थीगण अरण्यातून परतत होते. अचानक त्यांना वाटेमध्ये एक ग्रामीण अस्ताव्यस्त पडलेला आढळला. त्यास देहावरणाचेही भान नव्हते. श्रृतकेतूस वाटले, अतिश्रमाने उपतप्त होऊन तो पडला असावा. म्हणून तो त्याचे साह्यास जाऊ  लागला, तोच स्तीवजाब ऋषींनी त्यास संरोधिले. ते म्हणाले, ‘वत्सा, थांब. तो मनुष्यप्राणी तुझ्या मदतीस योग्य नाही. तो गर्दभ अतिसुरापानाने अस्वस्थला असून, अशा मद्यप व दुर्मद मनुष्यप्राण्याच्या नशिबी निश्चितच नरकप्राप्ती आहे.’ ती शापवाणी ऐकून श्रृतकेतूस आश्चर्य वाटले की, स्तीवजाब हे स्वत: सोमपान करतात. त्यांस नरकप्राप्ती नाही. किंतु, त्या ग्रामीणास मात्र नरकप्राप्ती. हे कैसे व ते कोण ठरविते? त्याने ते ऋषी स्तीवजाब यांस पुसता ते कोपतप्त झाले व त्यास म्हणाले की, ‘हे वराहा, गुरुजनांचा अवमान करणारांसही नरकप्राप्तीच असते व त्याच्या पापपुण्याचा लेखा स्वर्गलोकस्थित चित्रगुप्त ठेवीत असतो.’
श्रृतकेतू कविमनाचा असला तरी तसा विचिकित्सक. त्याचे मनी प्रश्न उपजला की, या विश्वामध्ये किमान एक सहस्त्र मनुष्यप्राणी व तेवढेच पशू व पक्षी व कीटकादी. एकटा चित्रगुप्त त्या सर्वाच्या पापपुण्याची गणना कशी बरे करील? त्याने पाठशालेत अनेकांस ही परिपृच्छा केली. किन्तु त्यास कोणीही उचित उत्तर दिले नाही. तेव्हा त्याने ठरविले की, आपण या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचेच. आज त्यास ते उत्तर सापडले होते. आज त्याच्या काव्यप्रतिभेस मोहोर आला होता.
०००
तो लिहीत होता-
‘हे चित्रगुप्त, सर्वाच्या पापपुण्याची नोंद ठेवणाऱ्या महान नोंदका, तुझ्या मंदिरामध्ये एक विशाल मंजूषा आहे. ती अवकाशाहून रुंद व मेरूशिखरांहून उंच आहे. त्यात सर्वाच्या पापपुण्याच्या पुस्तिका आहेत. त्या पुस्तिकेवर त्या मनुष्यप्राण्याच्या वा पशूच्या वा पक्ष्यांच्या वा कीटकादिकांच्या पापपुण्याची टिप्पणी आहे. तुझ्या अभिचार यंत्रणेने तू त्यांच्या पापपुण्याची गणना विचिन्तयतोस.  
हे चित्रगुप्त, तुझ्या दोन्ही हातांमध्ये ऋद्धी आहे. आमुच्या माथ्यावर तुझा हात नित्य असू दे. सर्व मानव मर्त्यलोक त्यागून तुझ्या मंदिरी जातात. तुझी माया महान आहे. तू केवळ अंगुलीस्पर्शे कोणाही मानवाची टिप्पणी अवकाशाच्या भुर्जपत्रावर आणू शकतोस व वाचू शकतोस.
हे चित्रगुप्त, सर्व प्राणिमात्र तुझीच कामे ऐकतात. यक्ष व गंधर्व व एकदंत हस्तीपासून कीटक-मूषकापर्यंत सर्व प्राणिमात्र यंत्राप्रमाणे तुझी कामे ऐकतात. तू सर्वाच्या आयुष्याची गणना करणारा महान पुरुष आहेस. तुझ्याप्रती आम्ही लीन आहोत.’
०००
काळ : इ. स. २०२५
प्रा. ऋषीकेश शर्मा यांचे व्याख्यान म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणीच. आपल्या अमोघ वाणीने आणि अथांग ज्ञानाने ते श्रोत्यांना अशा उंचीवर घेऊन जात की, तेथेच विहरत राहावे असे प्रत्येकास वाटत राही. त्यांची प्राचीन संस्कृतीवरील भाषणे ऐकण्यास श्रोते तिकीट काढून येत असत.
व्यासपीठावर ते उभे राहताच आपोआप सभागृहातील दिवे मंदावले. आपोआप सर्वाच्या हातातील मोबाइल सायलेंट मोडवर गेले. प्रत्येकाभोवती एक सायलेंट झोन तयार झाले. आता कोणी शिंकले तरी त्याचा आवाज शेजारच्याला ऐकू गेला नसता. आता आवाज येणार होता तो फक्त प्रा. शर्मा यांचाच..
‘मित्रों, प्राचीन भारतीय संस्कृती किती महान आहे हे मी सांगण्याची गरज नाही. आजचे सर्व शोध आपल्याच पूर्वजांनी लावले होते हे आता जगाने मान्य केले आहे. पण एक शोध, ज्याने हे जग बदलले त्याचे श्रेय मात्र आजवर पाश्चात्य देशच घेत होते. ही माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब होती. पण माझ्या देशवासीयांनो, ते दु:ख आता दूर झाले आहे..’
प्रा. शर्मानी क्षणभर विराम घेतला. ते पुढे झुकले आणि आवाजाची पातळी आणखी खाली आणून म्हणाले, ‘होय, मित्रांनो, आपल्याच पूर्वजांनी पाच हजार वर्षांपूर्वी संगणकाचा शोध लावला होता!
जगातला पहिला संगणक एका भारतीयाने बनविला होता! श्रृतकेतू संहितेत त्याचे सर्व पुरावे आहेत!!’
या घोषणेने सभागृहातच नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ माजली.
त्यावर बराच वादविवाद झाला, पण अखेर सर्वानाच हे मान्य करावे लागले, की श्रृतकेतू ऋषींनी सीपीयूला मंजूषा म्हटले आहे. त्यांनी ब्लूटूथचाही (एकदंत) उल्लेख केला आहे. कीटक या शब्दातून त्यांनी की-बोर्ड अपेक्षित असावा आणि माऊसबाबत तर प्रश्नच नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या ग्रंथामध्ये टचस्क्रीन तंत्राचाही उल्लेख आहे..
०००
आता श्रृतकेतू संहिता हे जगातील पहिले कंप्युटर मॅन्युअल म्हणून गणले जात असून, त्याचा अभ्यास आयआयटीतील विद्यार्थ्यांना सक्तीचा करावा म्हणून एचआरडी मंत्रालय प्रयत्नशील आहे.  lr07