कालच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन झाला. त्यांना अभिवादन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून झाली. १९५६ नंतर अखंडपणे भीमसागर ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर बाबांना अभिवादन करायला जमतो. महाराष्ट्रभरातून सर्व वयोगटांतील लोक इथे येतात. पंढरपूरची वारी lok11आणि ६ डिसेंबर यांतलं सातत्य, भक्ती, आत्मिक समाधान व जगण्याची ऊर्जा हे सगळं जवळपास समान आहे. पंढरीत सरकारी महापूजा होते. नव्या सरकारने ‘६ डिसेंबर’ला सरकारी पुण्यस्मरणात जोडून घेतल्याने याही बाबतीतले साम्य आता झाले.
फरक फक्त एकच आहे : महाराष्ट्राच्या विविध भागांतून ‘वारकरी’ वेगवेगळ्या रस्त्याने पायी पंढरपूरला पोहोचतात तेव्हा वाटेत त्यांच्या खाण्यापिण्याची, आरामाची, औषधपाण्याची सोय केली जाते. वारी करणाऱ्या वारकऱ्याला प्रत्यक्ष विठूचा प्रतिनिधी समजून त्याचे पाय धरले जातात. आता तर वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही ‘वारी’ करतात.
मात्र, ६ डिसेंबरला दादरला येणारे भीमसैनिक, अनुयायी दलित बांधव, भगिनी, मुलं हे सगळ्यांच्या तिरस्काराचे धनी असतात. दादर, शिवाजी पार्कमधील मध्यमवर्ग, अभिजन गमतीने धसक्याचा अभिनय करत म्हणतात- ‘बाप रे! ‘ते’ लोक येणार, नाही का!’ अनेक लोक त्या दोन दिवसांत दादरबाहेर राहण्याचा प्लान करतात. यंदा तर शनिवार-रविवार आल्याने अनेकांना हायसे वाटले असेल. आनंद पटवर्धनांनी ‘जय भीम कॉम्रेड’ नावाचा लघुपट बनवलाय; जो डीव्हीडीवर उपलब्ध आहे. त्यात सीसीडीत बसलेल्या तरुण-तरुणींच्या मते, ‘ते’ लोक खूप अस्वच्छ असतात. घाण करतात. त्यांना आरक्षणाऐवजी शिक्षण, स्वच्छता शिकवली पाहिजे. एक मध्यमवयीन, मध्यमवर्गीय (बहुधा गुजराती) बाई म्हणतात, त्यांच्या विष्ठेला वेगळीच दरुगधी येते! आणखीही काही लोक तावातावाने बोलताना दिसतात. याच लघुपटात पटवर्धन मुंबईचा कचरा, सांडपाणी याची विल्हेवाट लावणाऱ्या कामगारांचं ते काम करत असलेल्या जागांसह कैफियत मांडतात. ती दृश्यं कुठल्याही संवेदनशील माणसाला पूर्ण बघवणार नाहीत. आणि विशेष म्हणजे हे सगळे कामगार पूर्वाश्रमीचे महार, मांग, आत्ताचे बौद्ध. शंभर टक्के आरक्षण! तमाम दादरवासीयांसाठी, शिवाजी पार्कवासीयांसाठी ‘जय भीम कॉम्रेड’चा एक शो खास शिवतीर्थावर करायला हवा. आपण आजही किती कोत्या मनाचे, भ्रामक कल्पनांचे, कट्टर पूर्वग्रहांचे आणि कृतघ्न आहोत हे या सर्वाना समजेल. कारण संपूर्ण मुंबई शहराचा मैला, कचरा, घाण जे लोक साफ करतात आणि सर्वाना मोकळा श्वास, स्वच्छ परिसर आणि न तुंबणारे संडास देतात, तेच या ६ डिसेंबरला आपल्या उद्धारकर्त्यांला अभिवादन करायला येतात. त्यांनी हे काम करायचं नाकारलं तर मुंबई खरा ‘नरक’ होईल!
यावर कुणी असं प्रतिपादन करेल, की मग कशाला करतात ते काम? त्यांनी शिकावं. दुसरे जॉब करावेत! दे शूड डिनाय! वगैरे. त्यांच्या माहितीसाठी पंढरपूरला जी वारी जाते, ती जेव्हा एकादशीला पंढरपुरात पोहोचते त्या दिवशी आणि त्याच्या आधीचे व नंतरचे दोन दिवस पंढरपुरात भक्तीच्या दुप्पट मानवी विष्ठेचं साम्राज्य असतं! आणि सुरुवातीपासून ही विष्ठा काढण्याचं काम मेहतर समाज करत असतो. या समाजाला कुठलीही आधुनिक साधनं सोडाच; उलट तो संपूर्ण मैला टोपलीतून डोक्यावर ठेवून वाहून न्यावा लागतो.. आजही २०१४ मध्ये! मागच्या वर्षी या मेहतरांनी काम बंदची हाक दिली तर प्रशासनासकट विठोबाच्याही पायाखालची वीट सरकली. मागण्यांना आश्वासनांचा बुक्का लावून त्यांना पुन्हा कामासाठी तयार करण्यात आलं!
पंढरपुरात का कोणी म्हणत नाही- हे वारकरी असे अस्वच्छ का? वारकऱ्यांच्या विष्ठेला चंदनाचा दरवळ येतो? डोक्यावरून मैला वाहून न्यायची प्रथा बंद होऊनही आजसुद्धा हा मैला त्या मेहतरांच्या डोक्यावर का लादला जातो?
भाईयो और बहनों! एकसो पच्चीस करोड भारतवासी ये ठान ले, की हम गंदगी नहीं फैलाएंगे तो दुनिया की कोई भी ताकद इस देश को.. मॅडिसन स्क्वेअरवरून आणि ‘राखीव’ रस्त्यावर स्वच्छ भारतासाठी पंतप्रधानांपासून तेंडुलकर, कमल हसन, सलमान, आमीर, गावस्कर, स्मृती इराणी, उमा भारती, शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई.. सगळे जे झाडून रस्त्यावर आले ना, त्या सर्वानी आषाढी एकादशीला पंढरपुरात झाडू घेऊन नुस्तं उभं राहून दाखवावं! माझं आव्हान आहे स्वच्छ भारत अभियानाच्या कर्त्यांना, त्यांच्या पुरस्कर्त्यांना! त्यांनी या अभियानांतर्गत सफाई कामगार म्हणून महार, मांग, मेहतर, भंगी यांना सक्तीची निवृत्ती देऊन इतर समाजांना संधी द्यावी. दाखवाच संडास, मुताऱ्या साफ करून, मेन होलमध्ये उतरून!
‘फ्लश’ करणं आणि अशा अभियानात ‘फ्लॅश’ पाडून घेणं सोप्पं आहे. ओला कचरा, सुका कचरा ही नाकाला फडकी लावून न्याल. पण मानवी मलमूत्राची विल्हेवाट लावून शहर, गाव स्वच्छ करून दाखवा. कुठेय जातीयता, म्हणणाऱ्यांनी एकदाच पालिका इस्पितळं, सार्वजनिक स्थळी भेटी देऊन तिथं मानवी मलमूत्राची विल्हेवाट लावणारे कोण आहेत, याचं सर्वेक्षण करावं, आणि नंतर घरी येऊन जेवून दाखवावं!
भारतातील जातव्यवस्था ही धर्मव्यवस्थेपेक्षा भीषण आणि गोचिडीसारखी रक्त शोषणारी आहे. जात पंचायतींच्या बातम्या आता उजेडात येऊ लागल्यात. कुठलाही शास्त्रीय आधार नसताना ‘शुद्धते’च्या नावाखाली होणारे सजातीय विवाह म्हणजे आम्ही समारंभपूर्वक वरात काढून ‘जात’ घट्ट करतो. या देशातील एकही जात, धर्म, पंथ आपल्या जातीचं रक्त ‘शुद्ध’ असल्याचा दावा विज्ञानाच्या कसोटीवर करू शकणार नाही हे आंतरजातीय विवाह चळवळीचे जनक विलास वाघ यांनी प्रसिद्ध केलेल्या डॉ. प्रदीप गोखले आणि पंडित विद्यासागर या अभ्यासकांनी संशोधन करून आंतरजातीय विवाहानिमित्ताने भारतातील विविध जाती, धर्म, पंथ यांचे कसे संकर झालेले असून कुणीही ‘शुद्ध’ नाही, हे सप्रमाण एका पुस्तिकेत दाखवून दिले आहे. जिज्ञासूंनी विलास व उषा वाघांच्या सुगावा प्रकाशनाचा शोध घ्यावा.
इतकी प्रचंड सुधारकांची (सर्वधर्मीय- जातीय- पंथीयांतील) फौज या देशात निर्माण झाल्यावर आज २०१४ सालीही सजातीय विवाह, जातीवार आरक्षण, जातवार तिकीट- वाटप, जातवार मंत्रिपदे हे सर्व कशासाठी? आठशे वर्षांनंतर स्वाभिमानी ‘हिंदू’ गादीवर बसला! महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ‘तिसरा’ ब्राह्मण मुख्यमंत्री! याच्या बातम्या का होतात? आजवर काँग्रेसने या देशात जातीपातीचे राजकारण आणि अल्पसंख्याकांचं लांगूलचालन केलं असं म्हणतात. त्यांना स्युडो सेक्युलर म्हणतात. पण मग परवापर्यंत उत्कृष्ट लोकप्रतिनिधी, निष्कलंक नेता, नि:स्पृह विरोधक असलेले फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत येताच त्यांचं ‘ब्राह्मण’ असणं फायद्याचं की तोटय़ाचं, ही चर्चा का सुरू होते? विनोद तावडे एरव्ही तरुण नेतृत्व, कोकणचा प्रतिनिधी आणि मोठय़ा पदाच्या चर्चेत भाजपचा ‘मराठा’ चेहरा, खडसे ‘बहुजन’ चेहरा, पंकजा मुंडे महिला, तरुण यापेक्षा ‘वंजारी’ म्हणून विचारात घेता! जानकर- धनगर, राजू शेट्टी- शेतकरी, मेटे- मराठा, आठवले- दलित.. का या सगळ्यांची कार्यक्षमता शेवटी ‘जाती’वर मोजली जाते? आणि एरव्ही ‘मी, आमचा पक्ष जातपात मानत नाही’ म्हणणारे नेतेच आतून आपल्या जातीच्या चेहऱ्याचं प्रोजेक्शन करतात. मोदींना पण नजमा हेपतुल्लांना बाजूला करताना नकवींना आणावं लागतं. का? सांस्कृतिक कार्यक्रमात टोपी घालायला नकार देणारे मोदी मंत्रिमंडळ बनवताना मात्र ती टोपी फिट्ट करतात! तेव्हा कुठे जातो कणखरपणा या विकासपुरुषाचा? दलितांना आक्रस्ताळे, समाजवाद्यांना भाबडे आणि कम्युनिस्टांना पोथीनिष्ठ म्हणून भंगारात काढणं सोपं आहे; पण या तिन्ही विचारधारांनी या भारतात धर्म-जात-पंथ यापलीकडे जाण्याचं, वर्गीय, लिंगीय व आर्थिक विषमतेविरुद्ध आवाज उठवून ती बऱ्याच प्रमाणात कमी करायला लावून त्यासाठी धोरणं आखायला लावून, कायदे करायला लावून, भारतीय राज्यघटनेच्या अधीन संसदीय लोकशाहीतील संसदीय हत्यारं वापरून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या देशाच्या खऱ्या परंपरेला अखंडित ठेवलंय.
आज जे काही परिवर्तन, बदल, हक्क आपल्याला मिळालेत त्यामागे या सर्वाचा रेटा होता. त्यांना ‘राजकीय’ बळ तेवढे दाखवता आले नसेल, त्यांना सत्ता मिळाल्यावर ते भ्रष्टही झाले असतील, निष्ठा बदलल्या असतील; पण आज भारतीय स्त्री, जाती-धर्माने बहिष्कृत केलेले अस्पृश्य, शोषण केले गेलेले कामगार, शेतमजूर, असंघटित कामगार हे आज जो काही मानसन्मान, हक्क मिळवून आहेत ते यांच्यामुळेच- हे विसरून चालणार नाही. त्यांनी बऱ्यापैकी भारत बदलत आणला होता. पण ८० च्या दशकातील कमंडल-मंडल वादात या देशाचे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिकीकरण हे सगळंच पुन्हा धर्म आणि जात या जुन्याच खुंट्टय़ांना बांधले गेले. मंदिर-मस्जिद वादाने हिंदू-मुस्लीम ही सनातन आग वणव्यात भडकली. त्याचा फायदा जागतिक इस्लामी दहशतवाद्यांनी घेतला. त्यासाठी पाकिस्तान आणि पडद्याआडून अमेरिका खतपाणी घालत राहिले. आमचा अभिजन आणि नवश्रीमंत मध्यमवर्ग ‘मुसलमान, पाकिस्तान यांना कायमचे संपवा’ म्हणून ५६ इंची छाती फुगवतो. पण मुलाच्या घरी जाऊन नायगारा फॉल बघताना, डिस्नेलॅण्ड बघताना, वॉलस्ट्रीट बघताना, मॅकडोनाल्ड, वॉलमार्टची वर्णनं करताना थकत नाही. ‘तिकडे कसं सगळं मेरिटवर चालतं, रिझव्‍‌र्हेशन वगैरे काहीऽऽनाही’ म्हणणाऱ्यांच्या, मेणबत्त्या लावणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की, पाकिस्तान दाऊद, मसूद देत नाही, तशीच अमेरिका हेडली देत नाही! पण पाकिस्तान संपवा आणि ओबामाच्या आरत्या गा! कारण ग्रीनकार्ड, डॉलर आणि तिथे अल्पसंख्याक म्हणून विशेषाधिकार! याच अमेरिकेने ९/११ नंतर एकदा पाकिस्तान जितक्या निर्दयतेने आपले मच्छीमार पकडतो, तसंच आपले इंजिनीअर स्त्री-पुरुष एका रात्री तुरुंगात डांबून त्यांचे व्हिसा-पासपोर्ट जप्त केले होते!
तेव्हा आम्हाला अमेरिका कशी ‘रेसिस्ट’ आहे याचा साक्षात्कार झाला. पण ६ डिसेंबर, १४ एप्रिलला आपण कसे वागतो? खरं तर हे सगळं वातावरण बदलण्यासाठी भारतातील विविध जाती-जमातींची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पाहणी करून त्याआधारे सर्वसमावेशक विकास योजना तयार करण्यासाठी मंडल आयोग नेमलेला होता. त्यातून जातींचा इतिहास, त्यांच्या ‘मागास’पणाचं कारण यांचाही अभ्यास होऊन या पिछडय़ांची आकडेवारी प्रसिद्ध झाली. यातला मूळ उद्देश राहिला बाजूला आणि प्रत्येक जात-जमातीला आपली लोकसंख्या कळली, त्याआधारे मतदानाची किंमत कळली, सवलतींची जंत्री कळली. आर्थिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे ‘राजकीय’ ताकद कळली. आणि पूर्ण भारत पुन्हा ‘जातीयवादी’ झाला.
संपूर्ण प्रचारभर विकास, समान संधी, भ्रष्टाचार, माँ-बेटे की सरकार, काळा पैसा यावर बोलणाऱ्या मोदींनी शेवटच्या टप्प्यात प्रियांका गांधींचं एक वाक्य पकडून ‘मी ओबीसी तेली म्हणून मला त्या नीच म्हणाल्या..’ अशी वेदना बोलून आपली जात, ओबीसीपण अधोरेखित केलं! नितीन गडकरींनी तर एकदा कबूलच केलं, की या देशात जातीशिवाय राजकारण करता येणार नाही. वसंतराव भागवतांनी ‘माधव’ (माळी/ धनगर/ वंजारी) या सूत्राने वंजारी गोपीनाथरावांना भाजपचा बहुजन चेहरा बनवलं. शरद पवार फुले- शाहू- आंबडेकर म्हणत ब्राह्मणांना झोडपतात आणि मराठय़ांना गोंजारतात! काँग्रेसवाल्यांना आपण हिंदूहिताचं किंवा दलित/ मुस्लीम यांना न्यूनगंडातून बाहेर येण्याचं बोललो तर सत्ता मिळणार नाही असं वाटतं. आणि विनय सहस्रबुद्धेंनासुद्धा स्मृती इराणींच्या समावेशाने ‘पारशी’ या अल्पसंख्य जमातीला प्रतिनिधित्व मिळालं असं सांगावं लागतं, हे कशाचं द्योतक आहे? असं म्हणतात विशीतला कॉम्रेड चाळिशीत भांडवलदार होतो. तसं हे सर्व एकेकाळचे परिवर्तनवादी, जाती-धर्माच्या राजकारणाविरोधात, लांगूलचालनाच्या विरोधात बोलणारे सत्ता येताच धर्म-जात लांगूलचालनवादी का होतात? काँग्रेसने मदरशांना मदत केल्यावर हिरवे- काळे- निळे होत बोंबलणारे भाजपवाले जेटलींच्या पहिल्याच अर्थसंकल्पात मदरशांसाठी १०० कोटी का दिले, याचं उत्तर देत नाहीत. आणि मागणी नसताना खडसे शालेय अभ्यासक्रमात उर्दूचा समावेश करण्याची घोषणा करतात!
महाराष्ट्रातलं अल्पमतातलं सरकार वाचवायला समाजवादी पार्टी, ओवेसी यांच्या दोन आमदारांची गरज लागली तर उर्दू शिक्षण कामाला येईल, हा विचार त्यामागे आहे का? का वक्फ बोर्डाच्या जमिनी हव्यात?
आज प्रत्यक्ष मनू जरी आला आणि म्हणाला- मनुस्मृतीत काळानुरूप बदल करू या, तर त्याला हाकलून देतील; इतकं जातीयवादी वातावरण आज देशात आहे. वरच्या जातींनी जाती अभियानाची खालची पातळी गाठलीय आणि खालच्या जातींनी जाती अभियानाची, अभिनिवेशाची वरची पातळी गाठलीय. जाता नाही जात, जातीसाठी माती खावी, अस्पृश्यता सोडली तर जातीव्यवस्था ही आदर्श ग्रामव्यवस्था असं म्हणत आम्ही पुन्हा जातींकडे चाललोय! उद्धव ठाकरे विविध विभाग, वर्ग, जाती यांतून निवडून आलेल्या शिवसेना आमदारांना कोळी व कायस्थांच्या एकवीरा देवीच्या दर्शनाला घेऊन जातात! आणि पंतप्रधान मोदी संसदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याऐवजी संसदेच्या पायरीवर लोकशाहीचं ‘मंदिर’ म्हणून डोकं ठेवतात! तेव्हा ज्या शाळेचा हेडमास्तरच चुकीच्या दरवाजाने आत गेल्यावर त्या शाळेतली मुलं कुठल्या दरवाजाने काय घेऊन बाहेर पडणार?
भारत खरंच स्वच्छ करायचा असेल तर भारत जात-धर्ममुक्त करावा लागेल. कारण आमची मने त्याच जळमटात असतील तर आमच्या हाती झाडू गांधी देवोत, गाडगेबाबा देवोत की मोदी देवोत, त्याने काही काळ ‘झाडू’चा बाजार वधारेल, पण खरी घाण जी मना-मनांत आहे ती तशीच राहील.
विष्ठेच्या दरुगधीलाही जातीचं लेबल लावणाऱ्या देशात कोण माईचा लाल निपजेल का- जो हा देश जाती-धर्ममुक्त करील? माध्यमं आणि जाहिराततज्ज्ञ हाताशी धरून, करोडो रुपये खर्च करून या देशातील भांडवलदारांनी अशी एक टेस्ट-टय़ूब बेबी जन्माला घालावी, जी हे जाती-धर्ममुक्त भारत अभियानाची तार छेडेल. अर्थात ते ही जबाबदारी घेणार नाहीत. कारण ते म्हणजे कृष्णजन्माचं प्लॅनिंग स्वत: कंसानेच केल्यासारखं होईल!

शेवटची सरळ रेघ- माणसाच्या हातून कळत-नकळत अशा काही गोष्टी होतात, की तो स्वत:च स्वत:ची प्रतिमा तयार करतानाच काही दोष राहून जातात. रिपाई नेते अर्जुन डांगळे हे रिपाईतून बाहेर पडून नवीन पक्षाची स्थापना करून बसलेत. हा नवा पक्ष म्हणजे वेगळं दुकान नसून, हा सर्व विचारांचा ‘मॉल’ आहे असं ते म्हणाले. आता या मॉलमध्ये खरेदीला कोण कोण येतात, यावर हा मॉल चालतो की ‘ओव्हरहेड’च्या लोडने बंद करावा लागतो, हे काळच ठरवेल. मात्र, स्वत:च्या पक्षाला मॉल म्हणणाऱ्या डांगळेंच्या नव्या पक्षाचं नाव ‘महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी’ असं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ‘मनसे’ झालं तसं डांगळेंचं ‘मरिपा.’ आणि मनसेच टठर झालं तसं ‘मरिपा’चं ‘टफढ’ होणार! आधीच्या दलित नेतृत्वावर विकाऊपणाचा शिक्का असताना पक्षाची आद्याक्षरेच टफढ व्हावीत याला काय म्हणावं!                         

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध
sp leader shreya verma
उत्तर प्रदेश विजयासाठी सपाने कसली कंबर; गोंडातील बेनी प्रसाद वर्मांच्या नातीला दिली उमेदवारी