राहुल गांधी यांना निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमेठी मतदारसंघात मतदान केंद्रेच बळकावली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी बुधवारी केला. अमेठी मतदारसंघात आज मतदान होते आहे. कुमार विश्वास हे स्वतः अमेठीतून मतदानाच्या रिंगणात उतरले आहेत.
मतदान केंद्र क्रमांक ४२ मेहमूदपूर येथे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्र बळकावले असल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला. ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. या मतदारसंघातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदानही होत असल्याचे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांना पळवून लावल्याचा आरोपही त्यांनी केला.