देशातील जनतेची दिशाभूल करून पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी नरेंद्र मोदींनी सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या इस्लमापूरमधील प्रचारसभेत बोलत होत्या.
सोनिया म्हणाल्या की, “काँग्रेसविरोधात खोटे पसरविण्याचा काही पक्षांचा मुख्य उद्देश आहे. मुख्यत्वे भाजप नेते जनतेची दिशाभूल करत आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची मिळविण्यासाठी ते मर्यादा ओलांडून जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करत आहेत. त्यांना देशाच्या सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक प्रणालीवर विश्वास नाही त्यामुळे स्वत: बद्दलचे वेड निर्माण करून जनतेला भुलाविण्याचे प्रयत्न ते करत आहेत.” असेही सोनिया यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली.
फक्त एका खुर्चीसाठी जनतेला खोटी माहिती आणि आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे उद्योग यांच्याकडून सुरू आहेत. यामुळे अशा लोकांच्या हाती सत्ता आल्यास देशाच्या लोकशाही पद्धतीवर घाला येईल असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
काँग्रेसने आजवर व्यक्तीकेंद्र न राहता सर्वांना घेऊन विकास केला. गेल्या दहा वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती साधली आहे. देशाची एकता अबाधित रहावी यासाठी काँग्रेसचा प्रत्येक नेता, कार्यकर्ता कटीबध्द राहीला असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.