राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी पाणी पळविण्यात पटाईत आहे. मते दिली नाहीत तर पाणी बंद करण्याच्या धमक्या अजित पवार देत आहेत. पाण्यावरून धमकावत राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. दिंडोरीतील महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ शनिवारी सुरगाणा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात देशात व राज्यात कुपोषण, गरिबी, महागाई, भ्रष्टाचार आदी घटकात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. पेट्रोल, डिझेल व घासलेटचे भाव गगनाला भिडले. भारनियमन मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण भाग अंधारात बुडाला आहे. सत्तेत आल्यास हे चित्र बदलू, असे मुंडे म्हणाले. महाराष्ट्रातील पाणी महाराष्ट्रातच राहू दिले जाईल, असेही मुंडे यांनी नमूद केले.