शिवसेनेतील बिघडलेली माणसे फोडायची आणि त्यांना आपल्या पक्षात आयात करुन उमेदवारी द्यायची हा शरद पवारांचा एकमेव धंदा आहे. पवारांचे समर्थक त्यांचा उल्लेख ‘जाणता राजा’ असा करतात. मात्र, या देशात जाणता राजा एकच झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पवारांचे वर्णन ‘भ्रष्टाचाराचा महामेरु..हिंदुस्थानाचे लुटारु..श्रीमंत भोगी’, असे करावे लागेल, या शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात शरद पवारांवर टिकेचे आसूड ओढले. बारामती भागात गुरांना चरावयासाठी राखीव असलेली जागा पवारांनी आपल्या विद्या प्रतिष्ठानसाठी हडप केली. भ्रष्टाचारी, बॅंका लुटणारे, गरिबांच्या जमिनी हडप करणारे, बोगस डॉक्टरच्या पदव्या मिरविणाऱ्यांना उमेदवारी देऊन पवारांनी आपण कसे ‘श्रीमंत भोगी’ आहोत हे दाखवूनच दिले आहे, असा टोलाही उद्धव यांनी यावेळी लगाविला. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि डॉ.श्रीकांत िशदे यांच्या प्रचाराची जाहीर सभा सेंन्ट्रल मैदानावर आयोजित करण्यात आली होती.राहूल गांधी यांनी मुंबईतील सभेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महायुती निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असून राहूल यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सोनीया गांधी एकगठ्ठा मतांसाठी शाही इमामांचे दार ठोठावत असतील, तर तुम्ही देखील एकगठ्ठा मते शिवसेनेला टाका, असे आवाहन उद्धव यांनी यावेळी केले.